हळवे नाते
हळवे नाते
प्रगती.... आग चहा झाला का?आणि ती भानावर आली. गडबडीने चहाचा एक कप आणि एक पेला घेऊन स्वयंपाक घरातून बाहेर पडली... एक 'आहोंना' कप दिला आणि दुसरा....ती तिथंच थबकली....आईंना कशी देणार?त्या तर नाहीत..हो... त्या गेल्या...पोटात गोळाच आला ....तशीच पुन्हा स्वयंपाक घरात गेली....आणि पुन्हा आईंच्या विचारात मग्न झाली...
आई. प्रगतीच्या सासूबाई...म्हणायला नातं सासूच होतं. पण त्यांना "आई "हाच शब्द जास्त संयुक्तिक. प्रगती खरचं भाग्यवान होती या बाबतीत.. तिला देवकी आणि यशोदा अश्या दोन आई लाभल्या. एकीने जन्म आणि संस्कार दिले तर दुसरीने त्याच संस्काराचा योग्य वापर करून संसार फुलवण्याची शिकवण.आईंनी प्रगतीला प्रथम पाहिलं ते प्रगतीच्या साखरपुड्यातच. अतिशय साधी राहणी आणि गूढ विचारी अश्या त्यावेळी त्या प्रगतीस वाटल्या.पण दिसत तस नसतं... आणि नसतं तसंच माणसाला असावं असं वाटत असतं.....प्रगतीच लग्न झालं आणि सगळेच नौकरीच्या गावी आले.आईंनी त्यांच्या मनाप्रमाणे सगळं घर लावून घेतलं..प्रगतीला याच जरा वाईटच वाटलं होतं.... पण मग तिच्या लक्षात आलं..हा संसार तिचा नाही,तर त्यांचा आहे.आईंच्या मनातील सुप्त इच्छा त्या पूर्ण करु पाहत होत्या..एकत्र कुटुंबात जन्माला आलेली स्त्री होती ती. लहान वयात लग्न झालं आणि सासर ही एकत्र कुटुंबच होतं. पती सरपंच असल्यामुळे यांच्या वाट्याला नेहमी काम आणि काम हेच होतं. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले तेव्हा घरच्यांनी भक्कम साथ दिली आणि कसबस त्यातून सावरत पोरांना रंगरूपाला लावलं. प्रगतीला हळूहळू त्यांची सवय झाली आणि आईंनी उभारलेल्या संसाराचा ती एक भाग होऊन गेली.
आईंना कामात हलगर्जीपणा कधीच चालत नसे. प्रगती नवीन आहे-तिला सवय लागावी म्हणून त्यां मुद्दाम कितीदा तरी जास्तीची कामं तिला सांगत आणि हे प्रगतीला जाणवायचंही.पण त्यांना बोलायची तिची हिम्मत कधीच झाली नाही आणि तसा प्रयत्नही कधी तिने केला नाही. उलट त्यांच्या सहवासात नवीन गोष्टी शिकत ती स्वतःच्या चुका सुधारू लागली.प्रगतीला लिखाणाची आवड आहे हे त्यांना कळलं तेव्हा त्यानी तिला मुद्दाम लिहित करणासाठी आणि त्याच रचनेला चाल लावून गाण्यासाठी प्रोत्साहन ही दिलं.सगळं कसं सुरळीत चालू होतं. एक दिवस आपल्या मुलाला कंत्राटी पद्धती ने नौकरी मिळाली आहे आणि ही कायमस्वरूपी नाही ही गोष्ट त्याना कळली. त्या मनातून हादरल्या. खरं तर कमी कशाचीच नव्हती पण आपल्यापासून ही गोष्ट लपवली गेली याचं त्याना जास्त वाईट वाटलं होतं. हळू हळू दिवस जात होते, पण मनातील हुरहूर कायम होती. आणि एक दिवस त्यांच्या मुलाला पर्मनंट पोस्टिंगची ऑर्डर अली. दिलेल्या परीक्षेत आपला मुलगा उत्तीर्ण झाला याच त्याना खूप कौतुक वाटलं. वयाच्या चाळीशीत मिळालेलं हे फळ म्हणजे परमेश्वराने त्या माऊलीला मिळालेली त्यागाची परतफेड च होती.पण हे सुख भोगण्याइतका वेळ त्यांच्याजवळ याच परमेश्वराने ठेवला नव्हता.
आईंच्या आजारामुळे त्या खूपच खचून गेल्या.. इतक्या की.. त्यातून सवरताच आले नाही.. खूप प्रयत्न केले , पण शेवटी काळ कोणासाठी थांबत नाही... त्यांना देवाज्ञा झाली. पायाखालची जमीन सरकली..पोरकेपणा काय असतो याची जाणीव झाली.त्यांच जाणं खूप काही शिकवून गेलं. नात्यातील वीण कशी असते याचा अनुभव आला.त्यांना जाऊन वर्ष होत आला पण हे सगळं कालच घडल्यासारखं प्रगतीला वाटत होतं.. एकमेकांच्या सहवासाने सासू-सुनेचे हे *हळवे नाते* मायलेकीत कधी फुलत गेले हे त्या दोघींनाही कळलेच नाही..आज मात्र प्रगती एकटी पडली आहे.. कामात वेळ जात असला तरीही, मध्येच त्यांची आठवण येते आणि तिचं मन कासाविस होतं. ती जेव्हा एकटी असते तेव्हा तिचे हात नकळत त्यांना चाचपडतात, कुठे आहेत का त्या? याचा ठाव घेतात.... सापडतो तो फक्त आणि फक्त एकटेपणा..