आठवण... हळव्या नात्याची
आठवण... हळव्या नात्याची
प्रांजली.... चहा झाला का? आणि ती भानावर आली. गडबडीने चहाचा एक कप आणि एक पेला घेऊन स्वयंपाक घरातून बाहेर आली... एक 'आहोना' कप दिला आणि दुसरा....ती तिथंच थबकली....आईंना कशी देणार?त्या तर नाहीत..हो... त्या गेल्या...पोटात गोळाच आला ....तशीच पुन्हा स्वयंपाक घरात गेली...आणि पुन्हा आईंच्या विचारात मग्न झाली...
आई. प्रांजलीच्या सासूबाई... त्यांनी प्रांजलीलाप्रथम पाहिलं ते तिच्या साखरपुड्यातच. अतिशय साधी राहणी आणि गूढ विचारी अश्या त्यावेळी त्या वाटल्या.पण दिसत तस नसतं... आणि नसतं तसच माणसाला असावं असं वाटत असतं.....प्रांजली च लग्न झालं आणि ती सासु आणि पतीराजांसोबत नौकरीच्या गावी गेली.आईनी त्यांच्या मनाप्रमाणे सगळं घर लावून घेतलं..प्रांजली ला याच जरा वाईटच वाटलं होतं.... पण मग तिच्या लक्षात आलं..हा तिचा संसार नाही,तर त्यांचा आहे.आईंच्या मनातील सुप्त इच्छा त्या पूर्ण करु पाहत होत्या..प्रांजलीला हळूहळू सवय झाली आणि आईंनी उभारलेल्या संसाराचा ती एक भाग होऊन गेली.
आईंना कामात हलगर्जीपणा कधीच चालत नसे. प्रांजली नवीन असल्यामुळे तिला सवय लागावी म्हणून त्यांनी मुद्दाम कितीदा तरी जास्तीची काम सांगितलेलं तिला जाणवायचं..पण त्यांना बोलायची हिम्मत कधीच झाली नाही आणि तसा प्रयत्नही कधी प्रांजली ने केला नाही. नवीन गोष्टी शिकत गेली..
आईंच्या आजारामुळे त्या खूपच खचून गेल्या.. इतक्या की.. त्यातून सवरताच आले नाही.. खूप प्रयत्न केले , पण शेवटी काळ कोणासाठी थांबत नाही... त्यांना देवाज्ञा झाली. पायाखालची जमीन सरकली..पोरकेपणा काय असतो याची जाणीव झाली.त्यांच जण खूप काही शिकवून गेलं. नात्यातील वीण कशी असते याचा अनुभव आला.त्यांना जाऊन आज वर्ष होत आला पण हे सगळं कालच घडल्यासारखं वाटत... एकमेकांच्या सहवासाने सासू-सुनेचे हे नाते मायलेकीत कधी फुलत गेले हे कळलेच नाही..आज मात्र प्रांजली एकटी पडली आहे.. कामात वेळ जात असला तरीही, मध्येच त्यांची आठवण येते आणि मन कासावीस होतं. एकटी असते तेव्हा नकळत हात त्यांना चाचपडतात, कुठे आहेत का याचा ठाव घेतात.... सापडतो तो फक्त एकटेपणा..त्यांच्याशिवाय जगणं कठीण आहे.... पण त्यांनीच दिलेली आठवणींची शिदोरी आणि आशीर्वादासह पुढे चालण्याचे बळ आणि शक्ती परमेश्वर देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना करून प्रांजली एक एक दिवस जगते आहे...