एक छोटीशी आठवण
एक छोटीशी आठवण
तीन-चार वर्षाआधीची गोष्ट आहे. पावसाळ्याचे दिवस होते. सर्वीकडे मुसळधार पाऊस सुरू होता. जिकडे-तिकडे पाणीच पाणी होते. एक दिवस मला काही काम होते त्याकरिता मला बाहेर जायचं होतं. सकाळी पाणी कमी होताच पाण्याचा अंदाज बघून मी बाहेर पडलो. जे काम करायचे होते ते काम करून वापस निघायला गेलो, तसं पावसाने जोरदार हजेरी लावली. मी बस स्टॅण्डवर जायच्या आधीच पाणी सुरू झाल्यामुळे एका दुकानासमोर पाणी लागणार नाही असा उभा राहिलो. पाणी एवढं जोरदार होतं की सर्व रस्ते दिसेनासे झालेले. सर्वीकडे पाणीच पाणी भरलं होतं. गाडीची चाकंही अर्ध्यापेक्षा जास्त बुडालेली दिसत होती, काहींच्या तर सायलेन्सरमध्ये पाणी जात होतं. भर रस्त्यात मुसळधार पाण्यात आणि तुडुंब भरलेल्या रस्त्यात लोकांच्या गाड्या बंद पडत होत्या. काही वेळाने म्हणजेच एक दीड तासानंतर पाऊस थोडा कमी झाला. कमी म्हणजे बारीक पाऊस सुरु होता पण तो थांबणार नव्हता. म्हणून मी तिथून निघून बस स्टॅण्डवर आलो, पण बघतो तर काय सर्व बस स्टॅण्डमध्ये पाणीच पाणी. तिथे एकही बस नव्हती. तुडुंब भरलेलं होतं बस स्टॅण्ड आणि बस स्टॅण्डच्या बाजूला एक नाला होता त्या नाल्याचेही पाणी त्या बस स्टॅण्डमध्ये पसरले होते. (शहरांमध्ये जिकडेतिकडे कचरा आणि प्लॅस्टिक अधिक प्रमाणात असते. त्यामुळे कदाचित दुरून वाहत आलेल्या पाण्यासोबत प्लास्टिक आणि कचरा ही आलेला असेल. त्यामुळे तो नाला ब्लॉक झाला आणि पाणी नाल्यावरून वाहू लागलं) त्या समोरचा रोड पाण्याने भरलेला. वाहनांची ये-जा जरा बंद झाली होती. मात्र पाऊस कमी झाला होता, त्यामुळे सर्व लोक ते दृश्य आपल्या मोबाईलमध्ये घेत होते, त्यात एक मी पण होतो.
सोबतच टीव्ही न्युजवाले, पेपरवाले इत्यादी लोकसुद्धा आलेले. सर्व आपापल्या पद्धतीने फोटो घेत होते. गाड्यांचे फोटो, तुडुंब भरलेल्या त्या बस स्टॅण्डचे फोटो, त्यात बुडालेली एका इलेक्ट्रिक डीपी, तिचेही फोटो घेत होते.
आता मात्र मेन रोडचे पाणी थोडे कमी झालेले व काही गाड्या सुरू झाल्या. पण बस स्टॅण्डमधील पाणी आताही भरलेली होते. मला वापस घरी जायचे होते. बस नसल्यामुळे मी ऑटो शोधायला गेलो. ऑटोवाल्याने ऑटो भरल्याशिवाय जाणार नाही, असे सरळ सांगितले. (आमच्याकडे आताही ऑटो एक-दोन सिट नाही नऊ ते दहा सिटा घेऊन जातात) ऑटोमध्ये एकही प्रवासी नसल्यामुळे मी उड्डाणपुलाखाली डिव्हायडरवर उभा राहून आजूबाजूची हालचाल बघत होतो. माझ्या बाजूला एक मुलगी आपल्या तोंडावर स्कार्फ बांधून एका हाती बॅग आणि दुसऱ्या हाती थैली घेऊन उभी होती. वातावरणामुळे वेळेचा अंदाजही कळत नव्हता, तिने हलक्या आवाजात मला टाईम विचारला! तेव्हा जवळजवळ एक वाजला असेल, मी तिला मोबाईलमध्ये बघून वेळ सांगितली आणि पुन्हा आपल्या मोबाईलमध्ये आजूबाजूचा नजारा घेत मग्न झालो. काही वेळाने तिने पुन्हा विचारले, तुम्ही कुठे जात आहे? मी उत्तर दिले हिंगणा आणि मी पण विचारले तुला कुठे जायचे आहे? ती म्हणाली 'लता मंगेशकर' मी म्हटलं तर आपला रस्ता एकच आहे. काही वेळ आम्ही तिथेच उभे राहिलो. ती मला बोलली, तुम्ही जेव्हा जाणार तेव्हा मलाही सांगा मलाही जायचं, मी तिला हो बोललो.
आता पाऊस थांबलेला होता तरीही बस स्टॅण्डला एकही गाडी नव्हती. कारण तिथले पाणी कमी झालेलं नव्हतं. मग अर्ध्या-पाऊण तासाने ऑटोवाला ऑटो घेऊन फिरत होता. आणि प्रवासी घेत होता. ऑटो भरत आलेला पाहून मीही ऑटोमध्ये बसलो आणि त्या मुलीलाही सांगितलं. आता आम्ही समोरासमोर एकमेकांच्या बसलेलो, ऑटो पूर्ण भरल्यानंतर तो निघाला. नंतर तिने आपला स्कार्फ सोडला व निवांतपणे बसली. मग आम्ही दोघेही एकमेकांसोबत गप्पा मारत बसलो. काय करतोय, कुठे असतोय इत्यादी. त्यावरून कळले की ती मेडिकल स्टुडंट आहे. तिचे पहिलेच वर्ष आहे आणि अकोल्याची प्रॉपर आहे. असंच गप्पा मारता मारता आता तिचा स्टॉप येणार होता. ती बोलली 'पुन्हा भेटूया' तिचा स्टॉप आला आणि ती आपल्या स्टॉपवर उतरली. ऑटोवल्याला पैसे दिले आणि मला एक छोटीशी स्माईल देत बाय बोलून निघाली. मलाही समोर जायचे होते. पण तेव्हापासून पुन्हा भेटायची वेळ कधी आलीच नाही. त्या हॉस्पिटलमध्ये बरेच वेळा पण कधी तिचा माझा संपर्क आला नाही. नावसुद्धा एकमेकांचे आम्हाला माहीत नव्हते म्हणून कधी भेटीची आशा मी ठेवलीच नव्हती अशीच ही मैत्री छोटीशी.
पण आता मात्र कोरोनामुळे ही वेळ आली आणि पुन्हा आमची नकळत भेट झाली ती अशी.
शनिवारचा दिवस होता 21 मार्च आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे जनता कर्फ्यु 22 मार्चला होता. त्यामुळे सर्व गाड्या वाहने आणि सर्व इकडे बंदच राहणार होते. त्यामुळे मी गावी जायचं ठरवलं आणि सिटी बसमध्ये बर्डीकरिता निघालो. थोडं समोर जाताच लोकमान्यनगरमधून ती मुलगी गाडीत चढली. माझ्या बाजूला एक सिट रिकामीच होती. तसं गाडीत भरपूर सिटा होत्याच रिकाम्या. पण ती येऊन माझ्या बाजूला बसली. मी तिला ओळखलेच नाही. पण तिने मात्र मला ओळखले. नाव मात्र तिला माहीत नव्हते. आठ ते दहा मिनिटानंतर ती माझ्याशी बोलली, कुठे राहता, काय करता. मीही सहजपणे सांगितले. नंतर तिने जुनी पावसाळ्यातील आठवण काढत विचारले, आता ओळखलं का? तेव्हा माझ्या लक्षात आले आणि चांगल्या मित्रासारखे गप्पा मारत गेलो आता नावही माहीत झाली आणि नंबर ही एक्सचेंज केलीत अशीही आमची छोटीशी मैत्री.
या कोरोनामुळे पुन्हा भेटली.