अबोला आईशी
अबोला आईशी
माझे नुकतेच लग्न झाले होते.यांच्या मित्राने आम्हाला जेवायला बोलावले आमचे जायचे ठरले. एक सुविद्य,संपन्न धनाड्य कुटूंब आमचे त्यांचे घरचेच संबंध.पण मी नवखीच होते. माझे यजमान मला जुन्या आठवणी सांगत होते.त्यांना शाळेचे दिवस आठवले म्हणाले जेमतेम परिस्थिती पण त्यातही आम्ही खुश ! मित्र नाते वाईक यात फरक नव्हता च , ज्या घरी खेळायला जायचो तिथेच जेवायचो.आईला काळजी नसायची आमची. खुप माया, प्रेम होते त्या काळी.
तो गरीब हा श्रीमंत हे तर आज कळायला लागले.आम्हाला आजही ती नाती आम्ही सर्वांनी टिकवून ठेवली.
माझे यजमान मित्राच्या आई वडिलां बद्दल सांगत होते . त्या काळी त्याची परिस्थिती हलाखीची होती,एक वेळेचे जेवायला मिळेल की नाही एवढी बिकट परिस्थिती.तरी आम्हाला जेवायला बसविणाऱ्या काकु त्यांना आठवल्या आणि त्यांचे डोळ्यातून अश्रू वाहू लागले.म्हणाले काकुंना अन्नपूर्णा म्हणू की मायेचा झरा! निखळ,निरागस हास्य, अमृत कुपी होती काकु ! माय माऊली ने शुन्यातून विश्व निर्माण केले.काका,काकु दोघेही कामावर जायचे,मेहनती होते उभयता!
काटकसर करुन पैसा मागे पाडला.घर बांधले,शेतीवाडी घेतली, मुलांना शिकवून मोठे केले.पोटाला चिमटा बसला पण हळहळ व्यक्त केली नाही नेहमी आनंदी.
आज ह्यांच्या मित्राची, काका, काकुंची भेट होणार होती यजमान खुपचं जास्त खुश होते मलाही उत्सुकता होती त्यांना भेटण्याची.घराजवळ गाडी थांबली.घर कसले बंगलाच तो पाहून अवाक झाले होते.भला मोठा दोन एकराचा बंगला,बाहेर शिपाई,घरात नोकर चाकर गाड्या मानमरातब सगळं कमावलं होत .
एवढे ऐश्वर्य मी प्रथमच पाहिले होते,त्याचा थाट पाहून मी थक्कच झाले.गजांत लक्ष्मी कशाला म्हणतात ते आज मला कळले.
चहा,नास्ता, मानपान झाला.हे म्हणाले काकु कुठे गेल्या दिसत नाही.वहिणी म्हणाल्या आई आतल्या खोलीत आहेत. हे लगेच उठले आणि आईच्या खोलीत जाण्यासाठी निघाले .मी त्यांच्या मागेच गेले.आई पडून होत्या, ह्यांनी काकु हाक देताच काकु उठून बसल्या आणि यांना बिलगून रडू लागल्या,त्यांचे रडणे पाहून आमचे अश्रू अनावर झाले,त्याचा आत्मा करदळत होता असे त्या क्षणी वाटले.हे म्हणाले काकु काय झाले सांगा? पण काकु काही बोलत नव्हत्या पण आम्हाला कळले काहीतरी वेगळं कारण आहे.ह्यांनी शपथ दिली आणि त्यांना विचारले. बाळा ! माझ्या सोबत कोणी बोलत नाही.नोकर जेवायला आणतात , कोणी आल्या गेल्या बरोबर मला बोलू देत नाही बैठकीत मला येऊच देत नाहीत.मनाई आहे .बस हे जे तुम्हाला दिसते ते वरवरचेच! रोज मरण मागते देवाकडे!
देवही बोलवत नाही काय पाप केलं असेल रे मी ! हे ऐकुन हृदय पिळवटून गेलं .करदळत होत्या काकु.
हे सर्व आम्ही उभयता ऐकत होतो तेव्हा मधून मधून एक दोन फेऱ्या सुनबाई , नोकर मारत होते.सुनबाई म्हणाल्याच काय झालं रडायला ?
मन खिन्न झाले.आणि बंगल्याची जी रंगत होती ती क्षणात फिकी पडली.खुप तिरस्कार आला मला त्या माणसांचा. काय गुन्हा असेल काकुंचा ? का अबोला धरला असेल पोटच्या पोराने ,सुनेचे एकदाचे मी समजू शकते पण तुम्ही रक्ताची आहात एका हाडा मासाची.जीने जन्म दिला तिच्याशी अबोला ? अंतर्मनात दडलेल्या अनुभवांची देवाण घेवाण काकु करत होत्या त्यांचे शर्ट सोडायला त्या तयार नव्हत्या.माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती . त्याच्याकडे जेवायचीच काय पण एकही क्षण राहण्याची इच्छा झाली नाही.मी त्यांना निघण्याचा इशारा केला.पण त्यांनी मला रोखले . म्हणाले आज आपण काकु सोबत जेवण करणार आहोत.मी काहीच बोलले नाही.हे विचारी आहेत मला ठाऊक होते काकुंना बरे वाटावे म्हणून हा निर्णय यांनी घेतला. लक्षात आले माझ्या. आणि माझा नाईलाज झाला.मनात सारखा एकच विचार काकुंचा , आता बंगला ,घरातील वस्तू ,त्यांचे वागणे बोलणे सर्वच मला बोचत होते.
अरे ! त्यापेक्षा चटणी भाकरी खाऊन आईला सुखाने वाढवणारी प्रेमळ माणसे तुमच्यापेक्षा श्रीमंत.पैशाने माणूस श्रीमंत होत नसतो तर तो मनाने श्रीमंत हवा.विचारांचे काहूर माजले होते जी माणसे आपल्या हाडा मासा च्या आईला विचारत नाहीत ती इतरांना काय विचारतील ? असा प्रश्न माझ्या समोर उभा राहिला.आणि केव्हाच ती माणसे माझ्या मनातून उतरली.जेवायची वेळ झाली बोलावणे आले यजमान म्हणाले ,आज मला काकुं सोबत जेवायचे आहे.मित्र व वहिनींना ते रुचले नाही पण त्याचा नाईलाज झाला.सर्व सोबत जेवलो.जेवण करुन आम्ही निघालो.आम्ही दोघेही घरी जाताना एकमेकांशी बोललो नाही.मनात तोच तो विचार घोळत होता.
आई ही ईश्वरी देण. आई मुळेच आपण या जगात जन्माला आलो.आईमुळेच हे जग आपल्याला बघायला मिळाले, हे विसरणारी आत्मसंकुचीत व्यक्तीमत्व आम्हाला आज पहायला मिळाले.
अरे ! आईने नऊ महिने पोटात वाढविले,आपले पालन पोषण केले,लाड केले,हट्ट पुरविले.आई,आई करुन पदराला चिकटलेले आम्ही आज आईशी अबोला धरतो. ज्यानी जन्माला घातले त्यांच्याशीच वैर ? दोष काय? तीने जन्म दिला हा तिचा दोष की तिने लाड केला हा तिचा दोष ? तिने जन्म दिला धरतीवर आणले,आपले कोड कौतुक केले.वाढवले,पोटाला चिमटा घेऊन शिकवले , काटकसर करुन संपत्ती गोळा केली .अर्धपोटी उपाशी राहून एवढे ऐश्वर्य निर्माण केले.हा तिचा गुन्हा की अपराध!
आपण आता मोठे झालो आता आईची गरज नाही नव्हे आईला काही समजत नाही.स्पष्ट सांगायचे झाले तर आई ही दुष्मन झाली आहे असेच मला जाणवले. साधे तिचे बोलणेही मुलांना रुतायला लागले.जेव्हा आई बोलेल तेव्हा तेवढ्या पुरतेच उत्तर दिले जाते.
काय प्रकार आहे हा! आई जरा काही बोलली तर अबोला ! कशाला सांभाळता आईला ? नुसता दिखावा ! नकाच सांभाळू तिला महिना दोन महिने वाईट वाटेल तिला नंतर सवय होईल एकटे रहाण्याची.रोज मरण्यापेक्षा एक घाव दोन तुकडे च करा ना ! कशाला मन दुखवता .
असे आधी कधी झाले का ? आपण प्रत्येक गोष्ट आईला विचारायचो,आईने जे सांगितले तेच करायचो. आई ओरडली की दुसऱ्या क्षणाला तिच्या कुशीत शिरायचो.एके काळी घास भरवणारी आई आज ओझं वाटू लागली.
आजच का ती गुन्हेगार झाली,विचार करा , आत्मचिंतन करा करावेच लागेल.अरे आज तिला तुमच्याकडून कुठली च अपेक्षा नाही.तिने कमावलेली संपत्ती तुम्हाला मिळाली घर,दार रहायला छप्पर तिच्यामुळेच.दोन वेळचे जेवण तुमच्या सोबत करावे दोन शब्द प्रेमाचे,एवढीच तिची इच्छा.
आई जवळ घडीभर बसा ,तिच्याशी गप्पा मारा.बरं आई,बरं आई तु म्हणशील तसं एवढे बोलले तरी चालेल.नका करु तिच्या मनासारखं पण प्रेमानी बोला.पिकलं पान ते कधी गळून पडेल सांगता येत नाही.आपण तिच्या जिवावर उभं आहोत एवढं तरी भान ठेवा.ती बोलेल ते ऐकुन घ्या.नाही पटलं तरीही.म्हातारपण आणि बालपण सारखं असतं म्हणतात.
आपण आपल्या मुलांचे लाड,हट्ट पुरवतोच ना! तिचे बोलणे वायफळ वाटत असेल ,लहान मुले नाही का वायफळ बोलत आपण दुर्लक्ष करतोच की !
तुमची इच्छा नसतांना सुद्धा त्यांच्या जवळ बसा.त्यांना आधार द्या .त्यांच्या चुका वाटतही असतील तर त्या कडे दुर्लक्ष करा.दोन घडीच त्यांचं जिवन आहे मग तर सर्व आपलंच आहे असं समजून आनंदी रहा आणि इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा .
"जिच्या हाती पाळण्याची दोरी,ती जगाला उद्धारी, हे माधव ज्युलियन यांचे वाक्य लक्षात असू द्या .