Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Daivashala Puri

Tragedy Inspirational Others

4  

Daivashala Puri

Tragedy Inspirational Others

!! देवदूत !!

!! देवदूत !!

7 mins
249



गांधी बाई या शाळेवर एक महिण्यापुर्वी हजर झाल्या होत्या. पाचवीचा वर्ग होता. 

शाळेची घंटा वाजली. गांधी बाई वर्गावर आल्या आणि हजेरी पट उघडून उपस्थिती घेऊ लागल्या.

बालाजी मोरे -- हजर बाई, 

लिला जाधव--हजर बाई,  

सीमा-- हजर बाई, राधा ,--- एकनाथ,--- कोडिंबा--- हे सर्व हजर होते.

 मीरा.... उत्तर नाही आल्याने बाईंनी वर पाहिले रोजच्या प्रमाणे आजही मीरा आलेली नव्हती. तेवढ्यात हळूच आवाज आला, मी आत येऊ बाई ? " मीरा वर्गाच्या दारात खाली मान घालून उभी होती . बाई म्हणाल्या,"ये आत " ती आपल्या जागेवर बसण्यासाठी निघाली. बाईंनी पाहीले की तिचे कपडे तिच्या अंगावरील ड्रेस ब-यापैकी भिजलेला होता ...बाईंनी तिला विचारले," तुझे कपडे ओले कसे काय झाले...पाऊस वगैरे तर कांही नाही...आणि काय गं तुला रोजच उशीर कसा होतो? बघ उद्या पासून वेळेत नाही आलीस तर वर्गात घेणार नाही... लक्षात ठेव..."

बाई जरा प्रेमळ स्वभावाच्या होत्या .


मीरा कांहीही न बोलता आपल्या जागेवर बसली....

तेवढ्यात बाई म्हणाल्या, "काल तुम्हाला दिलेला गृहपाठ सर्वांनी केला ना? एकेकांनी मला आपापली वही आणून दाखवा " सर्वांनी बाईंना आपापल्या वह्या आणून दाखवल्या फक्त मीराने अद्याप दाखवली नव्हती. बाई म्हणाल्या, "मीरा तुझी वही आण पाहू " 

बाईंचे हे बोलणे ऐकून मीरा घाबरून गेली.. व जागेवरच बसून राहिली. मग बाई तिच्याकडे आल्या व तिची वही पाहिली तर मीराने गृहपाठ केलेलाच नव्हता. 

बाई म्हणाल्या, " मीरा, गृहपाठ का केला नाही. तुझी तब्येत वगैरे खराब नाही ना ?" मीरा कांहीच बोलली नाही पण तिच्या डोळ्यातून पाणी होते. 

दुसरे दिवशीही मीरा उशीराच शाळेत आली आज ही गृहपाठ केलेला नव्हता.. परत तिसरे दिवशी..चौथे दिवशी तेच... रोज रोज मीराला समजुन सांगून बाई कंटाळून गेल्या....त्यांना तिचाआता खूप राग यायला लागला होता...

एकदा वर्गामध्ये प्रश्नोत्तरांचा तास सुरू झाला. बाईंनी पहिला प्रश्न मीराला विचारला तिने बरोबर उत्तर दिले...मग दुसरा...तिसरा त्यादिवशी बाई सर्व प्रश्न फक्त मीरालाच विचारत होत्या. मीरा प्रश्नांची अचूक उत्तरे देत होती. बाई आणि वर्गातील सर्व च विद्यार्थी अवाक होऊन आश्चर्याने मीरा कडे पहात होते. कधीच वेळेवर शाळेत न येणारी, गृहपाठ न करणारी मीरा कशीकाय प्रश्नाची उत्तरे देऊ शकते याचे सर्वांना नवल वाटत होतं. 

बाई मग मीरा जवळ गेल्या आणि तिच्या डोक्यावरून मायेनी हात फिरवत म्हणाल्या, " बेटा, तू एवढी हुशार आहेस. पटा पटा सगळया प्रश्नांची तू अचुक उत्तरे दिली मग तू रोज शाळेला वेळेवर का नाही येत. शाळेला दांडी का मारते खूप वेळा. गृहपाठ का नाही करीत?" 

नेहमी प्रमाणे आत्ता ही मीरा कांहीच न बोलता खाली पहात राहीली....

पुन्हा दुसरे दिवशी ही नेहमी प्रमाणे मीराला उशीर वगैरे वगैरे....


     रविवारचा दिवस होता.आज महाजनांच्या घरी गांधी बाईंना हळदी कुंकाच्या कार्यक्रमा साठी बोलावणे होते... महाजन बाईंना गावातील लहान मोठे सारेच आदराने माई/माईसाहेब म्हणत असंत... त्यांचे घर गावातील प्रतिष्ठित व खूप श्रीमंत घर होते ...

बाई संध्याकाळी ६ च्या सुमारास हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला गेल्या.... ब-याच बायका जमल्या होत्या आपापसात गप्पा चालल्या होत्या... तेवढ्यात , "ज्युस घ्या हो सगळ्यानी " माई बोलल्या...

ज्युस देणारी 

ज्युस देत देत गांधी बाईं जवळ आली व हातात ज्युसचा ग्लास द्यायला लागली तेंव्हा एकमेकींची नजरानजर झाली.... बाईंनी पाहीले तर काय ती मीरा....

बाईंनी मीराला लगेच विचारले,"मीरा तू इथे कशी काय बेटा ?" त्यावर माई म्हणाल्या, " आमच्या कडे मीरा कामाला येते.. सकाळी - संध्याकाळी. खूप गोड मुलगी आहे हो... काम देखील फार स्वच्छ निटनेटके असते तिचे."

बाई क्षणभर गोंधळून गेल्या. 

 बाईंना समजेना काय बोलावे...

त्या थोडावेळ गप्पच राहिल्या... नंतर माईंना म्हणाल्या, " अजून ती खूप लहान आहे. तिचे शाळेत जायचे, छान खेळायचे वय आहे हो " त्यावर माई म्हणाल्या," 

हो ना! बिचारीला भावंडांसाठी काम करावे लागते .     

बाई म्हणाल्या ," म्हणजे कसंकाय " 

माई सांगत होत्या," मीराचे वडील एका कारखान्यात कामाला होते. मीरा आणि लहान तीन भावंड , आई बाबा असा सुंदर परिवार होता त्यांचा....  

पण एक दिवस कारखान्यात काम करता करता मीराच्या बाबांचा हात मशीन मध्ये गेला ...दुस-याच दिवशी मालकाने कांही पैसे दिले आणि त्यांना कामावरून कमी केले... त्या पैशात तिच्या वडलांचे कसेबसे दवापाणी झाले.. 

घरातील कर्त्या पुरुषालाच घरात बसावे लागले ... आणि अचानक सारे कांही बदलून गेले. 

घरात कमवणारे कोणीच नाही...घरात पैसे ही नाहीत. आणि खाणा-यांची संख्या तर जास्त. 

 मग आता एवढ्या सगळ्यांनी काय खायचे, पोट कसे भरायचे सर्वांचे  हा प्रश्न पडला. 

मग तिची आई दुस-यांची कामे करून कसे तरी घर चालवत होती...

पण देव पण बघा ना, मीराच्या आईला दमाच्या आजार झाला. आता तिलाही जास्त काम होत नाही. पावसाळ्यात तर  तिला दम्याचा खूप त्रास होतो. 

वडील एका हाताने जे काम मिळेल, करता येईल ते करीतच असतात पण कुटुंबात खाणारे खूप लोकं असल्याने ते सर्व अपुरेच पडते. 

मग जेवणासाठी रडणारी भावंडे. आई बाबांचा मुलासाठी तीळ तीळ तुटणारा जीव. घर चालवण्यासाठी त्याची चाललेली धडपड मीरा रोज पहात असायची... पण ती तर बिचारी. 

 आईच्या आजारामुळे एक एक काम सुटत होते. आमचे काम ही तिने होत नाही म्हणून सोडले. 

 घरात रोज खाण्याचे वांधे व्हायला लागले....

मीराला हे सर्व पहावत नव्हते. आणि मीरा काम शोधायला लागली. तिची आई ज्या ज्या घरी काम करीत होती त्या त्या घरी तिने विचारले पण कोणीही कामावर ठेवले नाही तिला. शेवटी ती आमच्या कडे आली काम माघायला. मी पण नाही बोलले...पण ती खूपच गयावया करीत होती...म्हणून मी थोडे पैसे तिला देऊ लागले. पण ते पैसे तिने घेतले नाही. मीरा खूप स्वाभिमानी मुलगी आहे हो .., " हात जोडून  म्हणाली माईसाहेब हे पैसे असेच मी घेऊ शकत नाही. मला काही तरी काम द्या." 

ती ऐकायलाच तयार नव्हती...म्हणून मी छोटेसे काम तिच्याकडून करून घेतले आणि मग पैसे दिले. " 

एक दोन दिवसांनी पुन्हा येऊन काम माघत होती. "माईसाहेब, तुम्ही मला काम दिले तर माझ्या घरात तेवढाच आधार 

होईल " असे ती म्हणाली.  

हळूहळू मीरा रोजच आमच्या कडे येऊन काम करून पैसे घेऊन जायला लागली होती... नंतर आम्हाला तिची सवय झाल्या सारखे झाले व ती आली नाही तर चुकल्या चुकल्या सारखं वाटायचं. आणि असे करता करता नित्यनेमाने  तेंव्हा पासून मीरा आमच्या कडे कामाला येते. 

तिची आई एकवेळच कामाला येत होती पण मी मीराला दोनवेळा बोलावते. कमीत कमी तिला दोन टाइम इथे जेवता तरी येईल. तेवढीच आपल्या कडून मदत . पगार ही भरपुर देते. त्या बोलतच होत्या. मीराचे खूप कौतुकही करीत होत्या."

पण हे सर्व पाहून आणि ऐकून गांधी बाईंच्या डोक्यात मात्र विचारांचे काहूर माजले होते... त्यांना मीरा बद्दल पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे ती शाळेत वेळेत का येत नाही, रोजचा गृहपाठ का करीत नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे आता मिळाली होती....


 मीराला कशा प्रकारे मदत करता येईल हाच विचार त्यांच्या डोक्यात येत होता. त्याच विचारात त्या घरी गेल्या पण त्यांचे विचार चक्र कांही थांबेना. रात्रभर विचार करून बाईंनी एक निश्चय केला... 

दुसरे दिवशी गांधीबाई सकाळी लवकरच महाजनांच्या घरी गेल्या . गांधी बाईंना पाहून माई म्हणाल्या," या बाई बसा."

बाईंना पिण्यासाठी मीरा  पाणी घेऊन आली. 

माई काळजीच्या सुरात म्हणाल्या," बाई शाळेत, घरी सर्व ठीक आहे ना "

बाई म्हणाल्या ," होय माई सर्व ठीक आहे.." दोघीही पुन्हा गप्प झाल्या. थोडा वेळाने मौन घालवत माई म्हणाल्या," मुलं बाळं सारे घरी ठीक आहे ना?" बाईंनी फक्त मान हालवली...आणि म्हणाल्या," माई, मला थोडे बोलायचे आहे...पण कसे बोलू कळंत नाही.." 

माईंचा स्वभाव खूप मायाळू दयाळू परोपकारी होता. माई म्हणाल्या," बोलांना,असे मनात ठेवायचे नसते. बोला. " 

बाई बोलू लागल्या," माई , मला मीरा बद्दल बोलायचे होते " "मग बोलाना कांहीच हरकत नाही "

 बाई बोलू लागल्या," माई, मीरा खूपच गोड शांत स्वभावाची अतिशय हुशार मुलगी आहे हो " 

माईसाहेब म्हणाल्या," हो हो खूप गोड स्वभाव आहे तिचा. " 

बाई म्हणाल्या, " ती खूप लहान आहे.... खेळण्याचे हे वय आहे तिचे तर तिला काम करावे लागते आहे बिचारीला .......त्यामुळे तिला शाळेत वेळेवर यायला जमत नसेल . दिलेला गृहपाठ देखील पुर्ण करू शकत नाही बिचारी " 

त्यावर माई म्हणाल्या,

"हो ना. मला ही आवडत नाही तिने असे काम केलेले. पण तिला अशीच मदत द्यायला गेलं तर ती घेत नाही." 

" पण माईसाहेब असे लहान मुलांना कामाला ठेवणे गुन्हा समजला जातो . यालाच तर बालमजुरी म्हणतात ." बाई म्हणाल्या, 


 " अरे बापरे ! हे तर मला कांहीच माहिती नाही हो बाई. मग आता काय करायचे. 

तुम्हीच सांगा बाई आता कसे करायचे. ती व तिच्या घरचे मग काय खातील ? " 

मग गांधी बाई म्हणाल्या,"माई, या वर एक उपाय आहे.. पण तो तुमच्या मदती शिवाय शक्य होणार नाही. सांगू का?"

 "हो सांगा ना " माई म्हणाल्या. 

बाई म्हणाल्या ," आपण या कुटुंबाला या संकटातून बाहेर काढू शकतो " 

माई लगेच म्हणाल्या, "ते कसे सांगा ना बाई. वाटेल ती मदत करू... आपण संपुर्ण प्रयत्न करू मीराच्या घरासाठी"

बाई म्हणाल्या," 

पण माई या साठी तुमचे संपुर्ण सहकार्य लागेल "

माई म्हणाल्या,

"हो मी संपूर्ण सहकार्य करायला तयार आहे...... मी काय करू शकते ते सांगा. " 

त्यावर बाई म्हणाल्या, "

मीरा अशीच कोणाचीही मदत घेणार नाही त्यामुळे तिच्यासाठी एक चागंला योग्य उपाय आहे. 

    माई, शाळेतील एक किंवा कितीही विद्यार्थी कोणीही व्यक्ती  विद्यार्थी दत्तक घेऊ शकते. त्या विद्यार्थ्यांचा संपुर्ण खर्च ती व्यक्तीच करते..... परंतु दत्तक मुला सारखे त्यांच्या घरी राहण्याचीही गरज नाही व त्यांच्या मालमत्तेवर अधिकार ही मिळणार नाही. 

तसे जर कोण मिळाले तर मीराचे चांगले शिक्षण आणि संगोपन होईल .. "

माई म्हणाल्या," हो का? हे तर मला माहितीच नव्हते. हे तर मी अगदी सहज करू शकते. त्यासाठी मला काय करावे लागेल ते सांगा "

बाई म्हणाल्या,"

माई तुम्हाला शाळेत येऊन एक फार्म भरावा लागेल फक्त " 

माई म्हणाल्या," आपण उद्याच हे काम करू ." 

बाई पुढे बोलू लागल्या,"

माई, दुसरे म्हणजे तिची तीन तीन भावंडे. त्यांना जर एखाद्या आश्रम शाळेत टाकता आले तर उत्तम होईल. "

माई म्हणाल्या,"बरं . माझ्या ओळखीचे एक भले गृहस्थ आहेत. त्यांची आश्रम शाळा आहे. त्यांना शब्द टाकून बघते. "

मग गांधी बाईंना खूप समाधान वाटले.....दोघींनी आणखी थोडावेळ गप्पा मारल्या आणि बाई आपल्या घरी परतल्या. मनात खूप आनंदी झाल्या होत्या बाई......


दुस-या दिवशी बरोबर दहा वाजता माई शाळेत आल्या त्यांनी फार्म घेतला , वाचला आणि भरून दिला . मग मुख्याध्यापक सर माईंना मीराच्या वर्गात घेऊन गेले. वर्गात गांधी बाई होत्या. मुख्याध्यापकांनी मीराला बोलावले आणि म्हणाले," मीरा बेटा या माईसाहेब आहेत ..... यांनी तूला विद्यार्थी म्हणून दत्तक घेतले आहे ."

मीरा माईसाहेबांकडे पहातच राहिली..

माईसाहेबांनी तिला जवळ घेतले आणि म्हणाल्या," हो आज पासुन तुला माझ्या घरचे काम करावे लागणार नाही. तुला नियमानुसार मी आता मदत करू शकते." 

पण मीरा आनंदी न होता माईंना मीराचा चेहरा चिंतातूर दिसला .....

माईंच्या लक्षात आले....मीराला तिच्या घरच्यांची चिंता होती..

माई लगेच म्हणाल्या," मीरा तू आता काळजी करू नको .तुझ्या भावंडाची देखील लवकरच व्यवस्था होईल. त्यांच्यासाठी ही माझे बोलणे झाले आहे...त्यांना तीघांनाही आश्रम शाळेत ठेवण्यात येईल. आणि दोन दिवसांतच अपंगाना मिळणा-या सवलती मिळण्यासाठीचा तुझ्या बाबांचा अर्ज, गांधी बाई भरून पाठवणार आहेत.."

हे सगळं ऐकून मीराला गहिवरून आले....

तिच्या डोळ्यांत पाणी होते.... तिने दोन्ही हात जोडून माईसाहेबांच्या पायावर डोके ठेवले. काय बोलावे तिला कळंतच नव्हते . तिच्या डोळ्यातील भाव सर्व कांही सांगत होते....


   माईसाहेब बोलंत होत्या," मीरा बेटा, तू सर्वात पहिले तुझ्या गांधी बाईंचे आशिर्वाद घे बघू....

 या एवढ्या चांगल्या कामाचे सर्व श्रेय फक्त गांधी बाईंना द्यावे लागेल... मला तर यातले कांहीच माहिती नव्हते... गांधी बाईंनी मला सर्व समजावून सांगितले त्यासाठी वेळ काढून पुढाकार घेतला म्हणूनच हे चांगले काम मला करता आले.... 

अशा अनेक मीरा आपल्या आजुबाजुला असतील त्यांना गांधी बाईंसारखी शिक्षिका मिळावी...... हीच अपेक्षा......



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy