तीन तेरा
तीन तेरा
नाम तुझे घेता देवा होई समाधान या अभंगाचे मधुर स्वर कानावर पडत होते. अभंग, गवळणी लावून तिवारी काकू सकाळ कशी तेजोमय करुन टाकायच्या. अभंगाचे स्वर कानावर पडताच चंदन झोपेतून पटकन उठला. वेडेवाकडे दात घासले, अंघोळ वगैरे करून फ्रेश झाला अन् सुदयाच्या बॅगमधून सेंटची बाटली काढून त्याचे दोन-तीन स्प्रे शर्टावर फिरवले. नि लगेच कॉलेजची बॅग पाठीवर टाकून घराबाहेर पडला. सुदया आपला निवांत घोरत पडला होता. तो आज कॉलेजला येणार नव्हता. सुदया अन् चंदन दोघेजण मित्र होते. बॅचलरमध्ये एक रूम करून हिंजवडी गावात राहत होते.
बाहेर धुकं पडलं होतं. चंदन आपला रोजच्या तीन-तेरा बसची वाट पाहत थांबला होता. गढी दिसायला अगदी सावळा, केस कसे अजय देवगन सारखे, डिक्टू दिलजले स्टाईल, पायात पॅरेगॉन चप्पल, हातात घडी, काळा-पांढरा पोशाख. कसं अगदी नटुन खटुन तयार...चंदनला फक्त तीन तेराची चाहूल लागली होती. आज तीन वर्षे झाली चंदन त्या बसची रोज अगदी मनोभावे वाट पाहत होता. सात वाजता ती बस हिंजवडीला यायची. तर गढी साडेसहालाच हजर ! चुकून बस चुकायला नको म्हणून..! कारण बी तसंच होतं, कारण जसा चंदन शिकण्यासाठी सोलापूर सोडून पुण्यात आला होता. अन् जसं त्यानं फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं होतं तसं त्याचं मन त्याच्याच वर्गातील एका मुलीवर जडलं होतं. तेव्हापासून चंदन त्या पोरीवर जीव टाकीत होता. वर्गातील केमिस्ट्री मात्र चंदनला खऱ्या जीवनात सापडली नव्हती. म्हणून त्याची लगबग चालली होती. कॉलेज सकाळी आठ वाजता सुरू व्हायचं. सायन्स असल्यामुळे अभ्यासाचा ताण असायचा आणि हा मुळातच मितभाषी असल्याने तो काय तिला आपलं प्रेम व्यक्त करीत नव्हता. यातच दोन वर्ष वार्यासारखी निघून गेली. मात्र चंदनला काय आपलं प्रेम व्यक्त करता आलं नव्हतं. हे शेवटचं वर्ष होतं म्हणून काहीही करून आता तिला सांगायचं कि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुझ्या शिवाय मी जगू शकत नाही, फर्स्ट इयर पासून मी तुझ्यावर प्रेम करतोय, तू माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस, माझ्या श्वासा-श्वासात तू आहेस, मी तुला मरेपर्यंत साथ देईल...असा विचार करीत चंदन बसस्टॉपवर थांबला होता.
निसर्गाने हिरवी पैठणी नेसली होती. हळूच सरी कोसळू लागल्या होत्या. आणि तेवढ्यात समोरून तीन तेराची बस येताना चंदनने पाहिली. मनातल्या मनात गुदगुल्या होत होत्या. त्याची नजर फक्त तिला शोधत होती आणि बस स्टॉपवर येताच तो पटकन वर चढला आणि तिला शोधू लागला. तेवढ्यात त्याला मागच्या बाकावर ती दिसली. आणि चंदनच्या जीवात जीव आला. कंडक्टरने बेल वाजवली आणि बस हलली. चंदन तिला पहात पहात बसण्यासाठी जागा शोधत होता. तेवढ्यात तिने चंदनला पाहिले. दोघांची नजरानजर झाली आणि चंदन कोसळलाच... त्याच्या तोंडातून आपसूकच शब्द बाहेर पडले...अवंतिका ! तिने त्याला जवळ बसायला सांगितले. तो तिला पाहतच बाकावर बसला. काय तिचं सौंदर्य ! पांढऱ्या रंगाची लेगजीन्स, गुलाबी रंगाचा टॉप, त्यावर गुलाबी फुलांचं डिझाईन, आकर्षक बांधा, एखादी अप्सरा चुकून पृथ्वीवर अवतरली असावी असंच तिला पाहिलं की वाटायचं...अतिशय तजेलदार, भावुक अन् हसरा चेहरा, बोलताना गालावर खळी उमटायची. अन् चंदनच्या हृदयाचे ठोके वाढवायची ! तिला पाहिलं की जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य यांचा विसर पडायचा. लांब केस, बहरत आलेल्या फुलावाणी उरोज आणि सर्वच कसं अगदी मनाला वेडावून टाकणारं होतं...
कंडक्टरने पास विचारला अन् दोघांनीही पास दाखवला. तेवढ्यात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आलं. चंदनने मनातल्या मनात देवाला साकडं घातलं की देवा अवंतिकाला माझी कर, तिला माझं प्रेम व्यक्त करण्यासाठीची ताकत मला दे. दोघेही एकमेकांना पाहत होते पण बोलायला कोणीच तयार नव्हते. हळूच हाताला हाताचा स्पर्श व्हायचा अन् विजा चमकल्यागत अंगावर शहारा यायचा. आजपर्यंत नुसते एकमेकांना पाहूनच ते आपलं पोट भरत होते. पण आता त्यांना व्यक्त व्हायचं होतं. पण कसं आणि कधी ? ते मात्र जमून येत नव्हतं. अवंतिकालाही तो आवडायचा. तीही त्याच्यासाठी झुरत होती. तो कबड्डी खेळत असला तरी त्याला पाहत बसायची. वेळप्रसंगी बॉटनीचा क्लास बंक करायची पण त्याला निहाळीत बसायची...परंतु तिचे आई-वडील खूप कडक स्वभावाचे असल्याने आणि त्यांना मुलांबरोबर साधं बोललेलंही आवडत नसल्याने तिचा कोंडमारा व्हायचा. तिलाही आता त्याचा स्पर्श, सहवास, साथ हवी होती. त्याच्याच स्वप्नात ती कुढत होती. पण दोघेही झाकली मुठ सव्वालाखाची प्रमाणे आपल्या भावना दाबून जगत होते. बस साडेसातला चिंचवडला येऊन थांबली. आणि हे दोघे त्यातून उतरली. समोरच त्यांचं महाविद्यालय होतं. मामासाहेब शितोळे महाविद्यालय चिंचवड. तिने तिच्या बॅगमधून छत्री काढली अन् चालू लागली. चंदन मात्र बाजूने चालू लागला. तर तिने त्याच्या डोक्यावर छत्री धरली आणि चंदनला हायसं वाटलं. दोघांची नजरानजर झाली आणि ते वर्गात निघून गेले.
दुपारच्या सुट्टीत सगळे मित्र-मैत्रिणी कॉलेजच्या गार्डनमध्ये शितलचा बर्थडे साजरा करायला जमले होते. शीतल अवंतिकाची बेस्ट फ्रेंड असल्याने तिने खास तिच्यासाठी एक गिफ्ट आणलं होतं. तर चंदन, यश, काजल आपलं केकवर तुटून पडली होती. सगळ्यांनी मिळून आनंदाने बर्थडे साजरा केला. मध्येच काजलला अचानक काय सुचलं काय माहीत ? ती म्हणाली तर आता आपण बर्थडे सेलिब्रेट केला, आता थोडा एन्जॉय करूयात ना ? यश बोलला काय करायचं ? तर ती बोलली आपण 'ट्रूथ & डिअर' गेम खेळूयात. तेवढ्यात अवंतिका म्हणाली आणि लेक्चरचं काय ? त्यावर शीतल म्हणाली बंक करूयात ना माझ्यासाठी...आणि मग सगळेच गेम खेळायला तयार झाले. अगोदर दोन-तीन राउंड होतात आणि अवंतिकावर राज येतं. मग यश अवंतिकाला प्रश्न विचारतो की आधी सांग ट्रूथ का डिअर ? ती विचार करते अन् सांगते ट्रूथ !यश म्हणतो अवंतिका समजा, तुला लग्न करायचं आहे पण अट एकच आहे ती म्हणजे आता आपण येथे जितकेजण जमलेलो आहोत त्यातीलच एकजण तुला निवडायचा आहे. तर तू कोणाला निवडशील ? अगदी ट्रूथ उत्तर हवय...ती म्हणते हा कसला प्रश्न आहे ? बाकीचे म्हणतात आधी उत्तर दे आणि हसतात...ती विचार करते व चंदनकडे एकटक पाहते तोही तिला पाहतो. अन् ती बोलते की, जर मला लग्न करायचं असेल आणि फक्त इथल्या पैकीच एकाची निवड करायची असेल तर....सगळेजण तिच्याकडे नजरा रोखतात...तर मी चंदनशी लग्न करेल !!सगळेजण तिच्याकडे व चंदनकडे एकटक पहात राहतात...
चंदन व अवंतिका तीन तेराच्या बसची वाट पहात चिंचवड बसस्टॉपला थांबलेले असतात. चंदन तिला हळूच विचारतो. एक विचारू का ? ती म्हणते विचार ना.
गार्डनमध्ये तू जे बोलली की खरं होतं का?
का ?
का म्हणजे, तुला कळत कसं नाही ?
काय कळत नाही ?
अगं कसं सांगू तुला ?
काय सांगायचंय तुला
अगं माझं मन कशातच लागत नाहीये, सारखं तुझ्याकडे बघावंसं वाटतं...
मग बघ ना ! तुला कोणी अडवलंय !
वेडीयस का तू ?
काय झालं मी वेडी व्हायला ?
तू मला आवडायला लागलीस यार..!!
अन् दोघेही शॉक होऊन एकमेकांकडे पाहू लागतात...त्यांच्या आनंदाला उधान भरून येतं. कितीतरी दिवसाचे साचलेले ढग आज गर्जून गर्जून कोसळत होते. सर्वत्र गारांचा पाऊस पडल्यागत दोघेही प्रेमाने ओलेचिंब झाले होते. आणि एक अनामिक ओझं हलकं झालं होतं. तेवढ्यात तीन तेराची बस येते. नि दोघेही आनंदातच आत जाऊन मागच्या सीटवर बसतात. दोघांच्या बॅगा गुढघ्यांवर ठेवून त्यांच्या खालून एकमेकांचे हात अगदी घट्ट पकडले गेले होते. मांडीला मांडीचा स्पर्श जाणवत होता. हृदयाचे ठोके गतिमान झाले होते. जगाला विसरून हे दोघे स्वतःमधीच लीन झाले होते. पायांनी पायाला दाबायला सुरुवात केली होती. बस गर्दीने भरली असल्याने कोणाचं कोणाला ध्यान नव्हतं. सगळ्यांचा कानोसा घेत ते स्पर्शाने न्हाहून गेले होते. तोंडातून शब्द फुटत नव्हते परंतु जे सुरू होतं त्यांना ते थांबवू शकत नव्हते...
त्या रात्री चंदनला रात्रभर झोप आली नाही. सकाळी लवकरच उठून त्याने बसस्टॉप गाठलं. तीन तेराच्या प्रतीक्षेत तो भविष्याची स्वप्न पाहू लागला. तेवढ्यात बस आली. अवंतिकाने त्याला पाहिलं. ती एकाच बाकावर बसली. दोघेही खूप आनंदी दिसत होते. मग चंदनने तिला हळूच विचारलं की आज आपण फिरायला जाऊयात ना प्लीज... नाही म्हणू नकोस. तिनेही त्याला नकार दिला नाही. ते मग थेट एक्स्प्रेस गार्डनला गेले. आणि एका झाडाच्या खोडाजवळ जाऊन बसले. आसपास बरेच जोडपे दिसत होती. कोण किसिंग करत होतं, कोण भांडत होतं तर कोण निवांत प्रेयसीच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपलेले दिसत होते. अन् ही मात्र एकमेकांना पाहतच बसली होती. खूप वेळ एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत असल्याने अवंतिकाच्या डोळ्यातून पाणी येयला लागतं. लगेच चंदन डोळे बंद करतो आणि म्हणतो मी हरलो...! अन् अवंतिका म्हणते अरे तू जिंकला असतास ना...मी हरत आले होते. चंदन म्हणतो की तुला हरवून मला जिंकायचं नाहीगं ! अन् लगेच अवंतिका भावुक होऊन त्याच्या गळ्यात पडते आणि रडू लागते. तो म्हणतो इतकं प्रेम करतेस माझ्यावर...?
काय सांगू तुला ? कदाचित यामुळेच देवाने मला कोणाशीच प्रेम होऊ दिलं नाही...आय लव यु....आय लव यु सो मच...तो तिला मिठीत घेतो. तिच्या गालावर ओठ टेकवून प्रेमाचा वर्षाव करू लागतो. तीही त्याला आपल्या हाताने कवटाळते. तो म्हणतो आता मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही...अशीच कायमची साथ देशील ? ती म्हणते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत...! अन् पुन्हा मिठी घट्ट होते.....
कोणीतरी त्यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल तिच्या घरी सांगितलेले असते. म्हणून तिच्या आईवडिलांनी तडकाफडकी तिचं लग्न ठरवलं होतं. ती खूप नाराज होती. परंतु आईवडिलांपुढे तिचा नाईलाज होता. तिला घराबाहेर जायला परवानगी नसल्याने ती चंदनसाठी खूप झुरत होती. तो काय म्हणेल ? तो कसा जगेल ? त्याने जीवाचं काय वाईट केलं तर...याला जबाबदार मीच असेल. असले विचार ती करू लागली होती. आणि अशातच तिचं लग्न झालं...कोल्हापूरच्या नातलगातीलच मुलगा होता. पैशाने मजबूत घराणं होतं. ती सासरी गेली अन् हिकडं चंदन तिच्या विरहाने मारायला लागला होता. त्याला जेंव्हा तिच्या लग्नाबद्दल समजलं, तेव्हा त्याने विश पेलं होतं. परंतु वेळेवर सुदा आला आणि त्याला दवाखान्यात घेऊन गेला. म्हणून त्याचा जीव वाचला होता. परंतु नंतर तो अचानकच कुठे गेला कोणाला पत्ता लागला नाही.
वासुदेव भलताच रंगील व व्यसनी माणूस होता. दारू अन् बाई याच्याशिवाय त्याला करमत नव्हतं. परंतु आपल्या बायकोकडे तो ढुंकूनही पाहत नव्हता. त्यामुळे अवंतिका पार लयाला गेली होती. तिला सारखी चंदनची आठवण येयची. त्या आठवणी आठवून ती दिवस काढत होती. पाय दाबायच्या यानिमित्ताने ती नवऱ्याजवळ जायची मात्र तो तिला कसलीच जवळ येऊ देत नव्हता. त्याला त्याच्या बाहेरच्या प्रेयशीतच सारस्व होतं. घरच्यांच्या हट्टापायी त्याने लग्न केलं होतं. तो तिचा खूप छळ करत होता. सासू समजूत काढत होती की, आज ना उद्या त्याला त्याची चूक कळेल...थोडा दम काड, सगळं ठीक होईल. परंतु अवंतिकाला ते असह्य झालं होतं. एके दिवशी ती खूप आजारी पडली. व ती थेट माहेरी आली. तिच्या घरच्यांनी तिला दवाखान्यात नेऊन बरं केलं. तिने सर्व हकीकत घरच्यांना सांगितली. तेव्हा मात्र तिच्या आई-वडिलांना धरणीमाय पाय ठेवायला जागा देत नव्हती. आपल्या हट्टापायी आपण स्वतःच्या मुलीचं वाटोळं केलं याचा त्यांना पश्चाताप होऊ लागला होता. त्यांनी काही माणसे बोलवून वासुदेवची समजूत काढायचं ठरवलं. परंतु तो सुधारण्यातला नव्हता. शेवटी त्याने तिला सोडचिठ्ठी दिली आणि अवंतिका बिन स्पर्शाची बाटली गेली.
त्यानंतर तिला घरच्यांनी अनेक पाहुणे आणले परंतु ते खूपच बेजोड होते. कोणाचे दोन दोन लग्न झाले होते. तर कोणी अर्ध्या वयाचा होता. यानं अवंतिका पार खचून गेली होती. ती सारखा सारखा चंदनचा विचार करत होती. तो जिथे असेल तिथे सुखी असावा अशी देवाला प्रार्थना करीत होती. एके दिवशी ती थेट हिंजवडीला त्याच्या घरी गेली. तर त्याचा मित्र सुदा घरी होता. त्याला पाहून अवंतिकाने चंदनबद्दल विचारले असता त्याने झालेली सर्व हकीकत तिला सांगितली. तिला स्वतःचा खूप राग येत होता. सदू म्हणाला त्याचा काहीच पत्ता नाही, तसं काही समजलं तर तुला सांगेन मी...पण त्याच्या डायरीत एक कविता मला काल सापडली, घे वाच....अन् अवंतिका त्याच्या डायरीतील ती कविता वाचू लागली....
ती
ती म्हणाली कसा आहेस
मी म्हणालो जिवंत आहे..
ती म्हणाली असं का बोलतोस
मी म्हणालो मग काय बोलू..
ती म्हणाली मलाच कळेना
मी म्हणालो मग ये माझ्याकडे...
ती म्हणाली ते आता शक्य नाही
मी म्हणालो मग माझं मरण फिक्स आहे..
ती म्हणाली तो कोणता काळ होता
मी तुला हो बोलले..
मी म्हणालो मी ही
तेच आठवतोय..
ती म्हणाली का..?
मी म्हणालो तुझ्या होकाराला नकार दिला असता तर..
ती म्हणाली तर काय..?
मी म्हणालो तर मरणाची वेळ माझ्यावर नाही तुझ्यावर आली असती..
ती म्हणाली मरणाचा विषय का आणतोस मधी
मी म्हणालो,
कारण तु जगण्याचा विषय सोडला आधी..
ती म्हणाली,
तु जिथं असेल तिथं कायम सुखी रहावं..
मी म्हणालो,
मग तु दुसऱ्याची होण्याअगोदर
देवाकडे माझ्या मरणाची प्रार्थना कर..
ती म्हणाली तुझी शेवटची ईच्छा काय आहे..?
मी म्हणालो,
तुझा चेहरा कायम माझ्या समोर असावा..
आणि मी म्हणालो,
तुझी शेवटची ईच्छा काय आहे..?
ती म्हणाली,
तु जर माझ्यावर खरं प्रेम केलं असेल
तर यापुढे कधीच तु तुझा चेहरा
मला दाखवू नको..
मग मी स्वतःशीच बोललो...
का केलं मी खरं प्रेम..?
माझं मन हळूच बोललं..
खोटं तर सगळेच करतात...
मी विचारलं, म्हणुन मी..?
मन बोललं..
कारण तु "ती" नाहीयेस !!
म्हणून मला असं वाटतय कि...
किती बरं झालं असतं ना
मी विसरभोला असतो तर..
काल काय झालं याची जाणीव झाली नसती
आणि उद्या काय होणार
याची कल्पनाही करता आली नसती
मी विसरभोला असतो तर......
कविता वाचून अवंतिकाला कापरं फुटलं होतं. ती खाली मान घालून हुंदके देत तिथुन निघून जाते.....
पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा चालू होत्या. त्यात वेगवेगळ्या जिल्ह्यातून कबड्डी संघ आलेले होते. स्टेडियम प्रेक्षकांनी तुडुंब भरलेले होते. अन् अचानक चंदन सोलापूरच्या संघाकडून खेळताना दिसला. थोड्या वेळाने खेळ संपला. सोलापूरने पुण्याला पराभूत केलं होतं. चंदन आपल्या संघाबरोबर ड्रेसिंग रूमकडे चालला होता. तेवढ्यात त्याच्या समोर त्याला अवंतिका उभी राहिलेली दिसली. आणि तो चॅटच पडला. काही न बोलता तो पुढे जाऊ लागला. परंतु अवंतिकाने त्याचा रस्ता आडवला व ती रडायला लागली. त्याने तिला एक बाजूच्या मोकळ्या खोलीत नेले व तिची विचारपूस केली. अवंतिका हमसू हमसू रडून त्याला सांगत होती. त्याची माफी मागत होती. थोड्या वेळाने त्याने तिला जवळ घेतलं व काळजी करू नकोस सगळं ठीक होईल असं सांगितलं. तो म्हणाला की तू दुसरं लग्न कर. त्यावर तिने कसले कसले नवरदेव तिला पाहायला येतात हे सांगितलं. व कोणता चांगला मुलगा तिच्याशी लग्न करेल ? असा प्रश्न केला. त्यावर तो बोलला की मी करेल तुझ्याशी लग्न..! त्यावर ती त्याला पाहतच राहिली व ती त्याला म्हणाली पण तुझ्या घरचे...माझ्या घरचे...समाज काय म्हणेल..? त्यावर तो बोलला की, "परिवर्तन परिवर्तन म्हणून परिवर्तन होत नसतं. त्यासाठी कधीतरी गैरवर्तनच करावा लागतं !!" मी तुझ्यावर प्रेम केलं होतं. तुझ्या शरीरावर नाही. आणि हे बघ अवंतिका "ज्यांचा प्रेमाचा पाया मजबूत असतो ना त्यांचं सेक्सचं फाउंडेशन आनंतकाळ टिकतं" असं मला वाटतं..! हे ऐकून ती त्याच्या हाताचे, गालाचे, मानेचे, ओठाचे किस घेऊ लागली. आणि त्याला मिठीत कवटाळून रडू लागली.
जेंव्हा अवंतिकाने घरच्यांना हे सर्व सांगितले तेव्हा त्यांना चंदनचा मोठेपणा व स्वतःचा छोटेपणा जाणवला. त्यांनी चंदनला घरी बोलावलं, आनंदाने पाहुणचार केला, झालेल्या चुकीबद्दल माफी मागितली व विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने त्यांनी अवंतिका व चंदनला एक केलं.