ती आणि तिचा संघर्ष....
ती आणि तिचा संघर्ष....
कोकणातील एका सुदंर गावातील ही कथा आहे. त्या गावातील मुलीची कथा आहे. त्या मुलीचे नाव आहे रमा. रमाचा जन्म एका मध्यवर्गीय कुटुंबात झाला. तिचे बाबा, मोठा भाऊ मुंबईला कामाला होते. त्यामूळे घरची परिस्थिती चांगली होती.एकटीच मुलगी असल्यामुळे तिचे खूप लाड व्हायचे. वरून मामाचं घर पण गावात, त्यामूळे तर सगळ्यांची लाडकी वेडाबाई होती. लाडकी असल्यामुळे जेवण , घरातील कामे करायला कोण सांगत नसे.रमाला शेतीचे कामे देखील येत नव्हती.सकाळी शाळेत जायची, दुपारी घरी आल्यावर काही घरात कामे असतील तर करायची नाहीतर मैत्रिणींसोबत रानातील भाजी, उन्हाळ्याच्या सुट्टीत काजू , आंबा, चिंच,बोर, आवळे, आणायला जा . असं तिचं आयुष्य चाललं होतं.
जुन्या काळात मुलींची लवकर लग्न करुन दिली जात असे. असंच तिच्याबरोबर पण झालं ,जसं रमाला अठरा पूर्ण झालं, तसं तिचं लग्नं करुन टाकायचं असं घरच्यांनी ठरवलं. तिच्यासाठी मुलगा पाहण्यात आला. आणि पहिलेच्या काळात मुला - मुलींच मत ग्राह्य धरलं जातं नसे. आई बाबा जे ठरवतील ते बरोबर आहे असचं सगळे मानायचे. तिचं लग्न झालं . माहेरी चार माणसात वाढलेली ती अचानक पणे पंधरा माणसात येऊन पडली. अचानपणे एवढ्या माणसात राहणं म्हणजे एका मुलीसाठी किती अवघड असतं.
रमाचा नवीन प्रवास सुरू झाला. रमाला नाही जेवण बनवता आणि नाही शेतातील कामे करायला यायची. तरीसुद्धा तिने हार नाही मानली. ती जेवण बनवायला, पेरणी, लावणी करायला शिकली. काही वर्षांनी रमाला तिच्या नवऱ्याने मुंबईला आणले. रमासाठी मुंबई काही नवीन नव्हती. तिचे वडील मुंबईला कामाला असल्यामुळें तिचं मुंबईला येणं व्हायचं.त्या मुंबईच्या खोलीत तिला पकडून आठ माणसं राहायची. तिचा नवरा, तीन दिर, तिच्या दोन मुली आणि नणंद. घरची सून असल्यामुळें सगळी कामे हिलाच करावी लागे. रमा सकाळी उठून सगळ्यांचे डबे करायची. नाश्ता पाणी, सगळ्यांचे कपडे भांडी धुणे. रमा मोठी सून असल्यामुळें तिची सगळी कर्तव्य ती पार पाडत होती. असं अठरा वर्षे तिने संसारात स्वतःला वाहून दिलं होत. अचानक रमावर तिच्या नवऱ्याने एकेदिवशी संशय घेण्यात आला की तुझं बाहेर काहीतरी चालू आहे. असं म्हणताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्यांच्यासाठी तिने तिचं आयुष्य खर्चिक केलं त्याचं माणसांनी माझ्यावर संशय घेतला.
त्यावेळी रमाला समजलं कोणीही कोणासाठी नसतं. ज्यांच्या भावडांसाठी सकाळीं लवकर उठून डबा करायचे. घरातील एवढ्या माणसांची कामे करण्यातच दिवस निघून जायचा की, माझ्या मुलींकडे सुद्धा मला जास्त लक्ष देता यायचे नाही.आणि ह्याच माणसांनी असं करावं. त्यावेळी तिची कोणीही साथ दिली नाही. तीची काहीही चूक नसताना तिला शिक्षा का? त्यावेळी तिने ठरवलं ज्या घरात मला आदर, मान, विश्वास नाही त्या घरात राहायचं नाही . ती तशीच घर सोडून निघून गेली. त्यावेळी तिच्या पाकीटमध्ये फक्त ₹200 रुपये होते. तिला काय करायचं कळत नव्हत, कुठे जायचं कळत नव्हत. कारण मुंबई शहर एवढं मोठं की जाणार कोठे? त्यादिवशी तिने ती रात्र रस्त्यावरच काढली.
दुसऱ्यादिवशी सकाळी तिला जाग आली. सुंदर पहाट तिला प्रोत्साहन देत होत की तु खचून जाऊ नकोस, नव्याने उभारी घे . ते वाईट स्वप्न समजून विसरून जा. आयुष्याने एक दुःख जरी दाखवलं असेल तर तुला सुख पण नक्की दाखवेल. तिने ठरवलं की आपण आता मागे वळून पहायचं नाही जशी वाट भेटेल,तस पुढे जायचं. माणसाला परिस्थिती खूप काही शिकवते. रमा तिच्या आईबाबांकडे गेली.रमाचे आई वडील चांगले होते.त्यामूळे तिला घरात घेतले.आपल्या मुलीची काहीही चूक नाही हे त्यांना माहीत होते.रमाच्या माहेरच्यांनी तिला या प्रकारातून बाहेर पडण्यासाठी खूप मदत केली.ती सगळं विसरून आपलं आयुष्य आनंदाने घालवत होती. पण तिला समाज जगून देल तर ना. नवऱ्याने टाकलेली, तोंड काळं करुन आलेली असं लोक तिला म्हणायचे. हया रमामुळे आमच्या मुली पण बिघडतील ,असली कीड गावात नको असे लोक काय काय म्हणायला लागले. रमाला हे ऐकून खूप त्रास होत होता. तिच्या आईबाबांना देखील बोलायला लागले. लोकांनी त्यांच्या घरी येणं जाणं बंद केले. एकेदिवशी तर ह्या लोकांनी कहर च केला, रमा पाणी भरण्यासाठी विहिरीवर जात होती. तेव्हा गावातील बायकांनी तिच्या तोंडाला काळं फासलं. माणसांनी तिची पूर्णपणे अवहेलना केली. रमाच्या आईबाबांनी तिला घर सोडून निघून जा तू, असे सांगितले. तुला इथे सुखाने कोणीही जगून देणार नाही. ती गाव सोडून मुंबईला निघून आली.रमाला आता आईबाबांचा सहारा संपला होता.ती आता एकटी पडली होती. पण ती खचून गेली नाही.तिने काम शोधायला सुरुवात केली. पण रमाला काम काही कुठे भेटत नव्हते. इथे ज्याच्याकडे डिग्री आहे त्याला जॉब भेटत नाही तर हिला कोठून भेटणार. असं करता करता दोन दिवस गेले काम काही भेटत नव्हतं. आणि हातातील पैसे पण संपत चालले होते.
एकेदिवशी असंच काम मागता मागता रमाला एक NGO मध्ये काम करणारी बाई भेटली. त्या बाईने हिला काम द्यायचे ठरवले ती रमाला NGO मध्ये घेउन गेली. तिथे अशा अनेक बायका होत्या. काहींचे नवरे वारले होते, घर सोडून आलेल्या बायका, काहींच्या नवऱ्यानी तर त्याना सोडून दिलेलं होत. हे पाहून रमाला थोड दुःख तिचं कमी वाटत होतं. NGO मध्ये रहायची देखील सोय होती. त्यामूळे रमाला घर भाड्याने घेण्यासाठी धडपड करावी नाही लागली . NGO मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कुटिरोद्योग, वळवणीचे पदार्थ, सुखे खाण्याचे पदार्थ यांचे उद्योगधंदे केले जात होते. त्यातून स्त्रियांना आणि एनजीओ ला देखील काही पैसे मिळायचे. तिचा हा नवीन प्रवास सुरळीत सुरू होता. तिला भिन्न भिन्न प्रकारची माणसे भेटत होती . तिला दररोज नवीन काहीतरी शिकायला भेटत असे . रमाने सासरी असताना जेवण करायला शिकली होती. तिच्या हातालाही चव होती . त्यामूळे आपण अजून प्रगती केली पाहिजे असं तिने ठरवलं. तिने एक ढाबा चालू केला. रमाच्या हाताला चांगली चव असल्यामुळें तिचे कस्टमर वाढत गेले. रमाने ढाब्याचे रूपांतर हॉटेल मध्ये केले. तिची प्रगती वाढत गेली. त्यावेळी रमाने ठरवलं आपल्यासोबत जे झालं ते बाकीच्या स्त्रियांना भोगायला लागू नये. म्हणून रमाने ज्या बायकांना घरातून बाहेर काढलेलं, घटस्फोट झालेला इ. या स्त्रियांना मदत करायची. रमाने तिच्या व्यवसायामध्ये नोकरी देणे, त्यांच्या राहण्याची सोय, त्याच्या मुलाबाळांसाठी शिक्षणाची सोय केली. रमाने स्वःताच्या आयुष्याबरोबर बाकीच्या स्त्रियांचे पण कल्याण केले. प्रत्येक माणूस समाजाचे काहीतरी देणं लागतो. हे यातून रमाने सांगितले आहे.
माणसाने आयुष्यात कधीही हार मानता कामा नये. आयुष्यामध्ये जे काही घडतं ते चांगल्यासाठीच असतं. जर रमाने घर सोडलं नसतं तर ती आज हॉटेलची मालकीण नसती. माणसाने नेहमी प्रयत्न केले पाहिजेत. स्त्रियांनी कधीही स्वःताला कमी लेखू नका. पुरुषापेक्षा स्त्रियांमध्ये सहन करण्याची ताकद खूप जास्त असते. त्यामूळे आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करा. लोकं काय म्हणतील याचा विचार करू नका . लोकं फक्त बोलायला असतात मदतीला कोणीही येत नाही सगळं आपल्यालाच करावं लागतं.
