शिक्षण कोणते गरजेचे
शिक्षण कोणते गरजेचे
काल सहजच एका भांड्यांच्या दुकानात गेली होती. तसे तर मला भांड्यांच्या दुकानात आणि भाजी बाजारात फिरायला खूप आवडते. खूप छान वाटते. असो....
तिथे एक मुलगी व तिचे आई वडील आलेले होते त्या मुलीचे कदाचित लग्न ठरलेलं असावे. कारण खरेदी मोठ्या प्रमाणात चालली होती. परंतु अती उत्साह फक्त तिला एकटीलाच होता असे सारखे वाटत होते. तिच्या आई वडिलांचे सोबत येणे म्हणजे तिची कदाचित जबरदस्ती असावी. सर्व संसाराच्या वस्तूंची खरेदी होत होती. ती ही आनंदाने सर्व पारखून, निरखून घेत होती.
अर्थात यात काही नवीन नाही. प्रत्येक मुलीचा नव्याने संसार सुरू होत असेल तर ती मुलगी उत्साही असतेच. शिवाय आई बाबंचीही तितकाच आनंदाने सहभाग असतो. परंतु तोच संसार जर त्यांच्या मनाविरुद्ध होत असेल तर मात्र आई , बाबा आणि घरातील कुठलाही व्यक्ती आनंदी असू शकत नाही. असेच काहीसे हिच्या बाबतीत घडले होते.
न राहवून मीच त्या काकूंना म्हटले अहो काकू ती इतक्या उत्साहाने सर्व खरेदी करतेय तर तुम्ही पण तितकेच उत्साही रहा की.... का मूड खराब आहे तुमचा?
तिच्या आईने मला कोपऱ्यात नेले आणि म्हणाली की," उत्साह कुणाला नाहीये पोरी, पण ही ज्या मुलाशी लग्नाचा हट्ट धरून बसलीय ना तो मुलगाच मुळात आम्हाला पसंद नाही बघ.... पण ही पोरगी ऐकतच नाही."
म्हणजे काय झाले असे नेमके....? मी त्यांना प्रश्न केला....
ताई आमची मुलगी खूप हुशार आहे हो, अभ्यासात नेहमी एक नंबर यायची. अभ्यास कर असे तिला कधीही सांगावे लागले नाही. आणि आज ती CA झाली आहे. आमची परिस्थिती साधारण आहे. पण मुलगी हुशार आहे म्हणून पैश्यांकडे न पाहता तिला आम्ही तिच्या मर्जीप्रमाणे शिकू दिले. CA होऊन ती आमचं खूप नाव पण कमवत आहे....
मग अडचण कुठे काकू...? पूर्ण न ऐकता मी मधेच त्यांना प्रश्न केला.
ताई ज्या मुलाशी तिचे लग्न आहे ना तो फक्त दहावीचं झाला आहे आणि शिवाय आमच्या जातीतला नाही. एक वेळ तिच्या प्रेमविवाह साठी आम्ही जात पण सोडू. पण निदान शिक्षण तरी बघायचे ना. पण नाही ती आमचं काहीच ऐकून घ्यायला तयार नाही. आम्ही सर्व प्रथम जेव्हा विरोध केला तेव्हा तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मग शेवटी आम्ही पण विचार केला की ही जीवाचे काही बरे वाईट करून घेण्यापेक्षा ती म्हणेल ती पूर्व दिशा.... काय करणार सांगा आता.
पण मग मावशी तो कमी शिकला असेल पण मनाने खूप चांगला असेल, तिने काहीतरी तर पाहिले असेल ना त्याच्यात ? नाहीतर एवढा मोठा निर्णय ती का म्हणून घेईल ?
नाही ताई... आम्ही सर्व चौकशी केली. मुलगा रेल्वे प्लॅटफॉर्म वर पोती उतरवतो, आणि दारू पण खूप पितो. शिवाय त्याचे मित्र सुद्धा हेच म्हणत होते की त्याला वाईट सवयी खूप आहेत. अहो ताई ही पोरं प्रेमात आंधळी होतात. पण आपल्याला कळतं ना.... म्हणून आम्ही विरोध केला तर ही बया हात कापून घ्यायला निघाली. शेवटी तिच्या अण्णांनी घेतला निर्णय लग्न लावून देण्याचा.....
सर्व परिस्थिती लक्षात घेता खरच खूप वाईट ही वाटले आणि हल्लीच्या काळात नेमकी शिक्षणाची गरज कोणती, पदवी शिक्षण द्यावे की संस्कार शिक्षण द्यावे....? असा प्रश्न सारखा मनात घोळत होता....
प्रेम विवाह होतात मी नाही म्हणत नाही. पण मग त्या प्रेमापुढे आपल्या आई वडिलांनी आपल्या जन्मापासून तर आत्ता पर्यंत किती खस्ता खालल्या याचा थोडाही विचार या मुलांच्या डोक्यात येत नाही का....? कुठलेच आई वडील मुलांसाठी चुकीचा निर्णय घेत नाही. पण मग ते का नाही म्हणतायेत याचे कारण नको कळायला का आपल्याला...? ज्यांनी तुम्हाला जन्म दिला, सांभाळलं , आज त्यांच्या पेक्षा 2 दिवस आधी भेटलेला व्यक्ती जास्त प्रिय वाटतो. का ? की आपण मुलांना शिक्षण सोबत संस्कार द्यायचे विसरतो...?
शेवटी त्यांच्याकडेही पर्याय नसतो आणि ते संमती देतात. पण मग ती संमती ते मनापासून देतात का...? आणि समजा देव न करो पण उद्या जर काही बरं वाईट झालेच तर शेवटी आपण परतणार कुठे, आपल्या आई वडिलांकडे च ना...?
उच्च शिक्षण घेतले म्हणजे आपण खूप मोठे झाले आहोत. आपण आपले निर्णय घ्यायला सज्ज आहोत. असे यांना वाटते . आणि नंतर मग अश्या वेळी ती मुलं आपल्या आई वडिलांना कमी लेखू लागतात.
काही वेळेस वाटते या मुलांची निर्णय क्षमता कमकुवत झालेली आहे. कारण योग्य काय , अयोग्य काय... याचा या मुलांना विचार करताच येत नाही....
प्रेम करणं म्हणजे गुन्हा आहे असे नाही, हो पण आई वडिलांना इमोशनल ब्लॅक मेल करूंन ते मिळवणं म्हणजे नक्कीच गुन्हा असे मला वाटते.