गोठलेली मनाची नाती
गोठलेली मनाची नाती
काल अचानक दवाखान्यात जाण्याचा योग आला.... तिथे गेल्यावर एक सद्गृहस्थ माझ्या मिस्टरांना भेटले त्यांच्या ओळखीचे असावे बहुतेक.... ते बिचारे त्यांची कहाणी सांगू लागले...
गुरुजी माझ्या बायकोची पत्रिका बघा हो जरा... माझी बायको कधी जाईल ते सांगा मला ......
ऐकून मला धक्काच बसला.. काय बोलतोय हा माणूस ? बरं त्याचं स्वतः च वय देखील खूप जास्त वाटत नव्हतं... मग बायकोचं किती असेल..... आणि नेमके झाले तरी काय? विचार सुरू झालेत ...
असे प्रश्न नका विचारू दादा... हे बोलले.
काय करू गुरुजी मी, अहो थकलो मी आता, देव इतकी परीक्षा का घेतोय माझी, एकदाची उचल म्हणा बिचारीला.....
असले काही तरी बोलून तो मोकळा होत होता ...
मग मात्र माझ्याच्याने राहवेना ... शेवटी मी विचारलेच... दादा नेमके काय झाले आहे, सांगाल का....
ताई... अहो 4 वर्ष झालेत माझी बायको अंथरुणाला धरून आहे, तिचे सर्व काही करावे लागते. माझ्याकडून जे आणि जेवढे शक्य होते ते सर्व केले मी... पण आता तर माझ्याकडचे पैसेही संपले आणि ताकत ही... काय करू मी.
दादा तुम्हाला मुलं नाहीत का... मी सहजच विचारले ...
आहे ना ताई .. 3 मुलं आहेत मला. एक मुलगी आणि दोन मुलं.... पण म्हणतात ना ताई पूर्ण गाव मामाच आणि एक नाही कामाचं... तशी गत झालीय माझी. मुलगी तर चांगल्या घरी दिलीय मी, अमेरिकेला असते. व्हिडिओ call वर बोलते आमच्याशी कधी कधी...
एक मुलगा बडोदा ला असतो, आणि दुसरा मुलगा हैद्राबाद ला असतो. लांबचा पल्ला आहे ताई. आपल्यासाठी कसा वेळ मिळेल यांना . बरं हीचं गेल्या 4 वर्षापासून असेच चालले आहे....
पण नेमकं काय झाले त्यांना... माझा प्रश्न...
तिला लिव्हर कॅन्सर झाला आहे ताई.
लिव्हर ला गाठ झाली होती ती चेक केली तर dr. म्हणाले कॅन्सर आहे. ज्या दिवशी सर्व कळलं तेव्हा दोन्ही मुलं आले होते भेटायला. पण आता त्या गोष्टीला 3 वर्ष झालीत मुलं तर आलीच नाहीत पण फोन वर पण विचारणा नसते की बाबा तुम्ही कसे आहात वगैरे वगैरे.... ताई या मुलांना लहानच मोठं करावं, आपल्या पोटाला चिमटे द्यावे आणि यांचे हट्ट पूर्ण करावेत. आणि मोठी झाल्यावर ही मुलं आपल्यापासून इतके दूर जातात की यांना आपण हक्काने हाक देखील मारू शकत नाही.
बघा ना... 4 वर्षापासून ती पडून आहे. खर्च तर रोजचा वाढत आहे. होते नव्हते ते सर्व पैसे तिला लावले. डॉ. म्हणताय की आता काहीच उपयोग नाही.
मुलीने परवा फोन केला तिला म्हटलं बाळा येऊन जा आईला भेटायला, तर म्हणाली बाबा माझे काही म्हणणे नाही तुमचा जावई च ऐकत नाही....
ताई अहो माझी बायको रोज वाट पाहते मुलं येतील, मुलगी येईल.... गेल्या 4 वर्षात कुणीच फिरकले देखील नाहीत... मधला काळ कोरोना चा होता आम्ही समजून घेतले पण आता , पण आता यायला काय हरकत आहे. जाऊ द्या ताई आमचे संस्कारच कमी पडले असतील.
म्हणूनच मी म्हटले की देवाने आता तिला उचलून न्यावे . हे दुर्दैवी क्षण पाहण्या पेक्षा आणि शरारिक त्रास सोबत मानसिक त्रास देण्यापेक्षा तिला सरळ उचलून न्यावे. हतबल झालोय हो ताई मी.... मी तरी काय करू...
ते दादा जोरजोरात रडू लागले. आम्ही दोघांनीही त्यांना मुद्दामच आवरले नाही. कारण त्यांना मोकळं होऊ देणं हेच महत्वाचे होते. थोड्या वेळाने शांत झाले.
मग मी त्यांना सहजच म्हटले दादा वहिनी भेटतील का मला, कुठे आहेत त्या... ते दादा मला त्यांच्या जवळ घेऊन गेले, साधारण अर्धा पाऊण तास मी त्यांच्याशी बोलत बसले. नाही धीर नाही दिला मी कारण त्यांनीही बिनधास्त बोलावं हेच खूप महत्त्वाचं होतं माझ्यासाठी. आणि बाहेर आले.
"प्रत्येक वेळी आजारी माणसासोबत बोलताना त्याला आजार झाला आहे असे जाणवू न देता जर त्याच्याशी मोकळ्या गप्पा केल्या तर तेव्हढा वेळ का होईना पण तो त्या परिस्थिती पासून चार हात लांब असतो, ते दुःख ती व्यक्ती पूर्णतः विसरलेली असते..... असा माझा अनुभव आहे."
हे पहा दादा आता तुमच्या पुढे सर्व चित्र तर क्लिअर झाले आहे ना. मग कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही. हे जग असच आहे. इथे ज्याला त्याला ज्याची त्याची पडलेली असते. मग ती आपली स्वतः ची मुलं असली तरीही. प्रत्येक आई बाबा संस्कार देताना अगदी योग्य तेच संस्कार देतात. फक्त ते घेण्याची जबाबदारी मुलांची असते. ती संस्कारांची शिदोरी किती घ्यायची, किती जवळ बाळगायची, हे त्यांचे त्यांना चांगले च समजते, त्यामुळे आपण स्वतः ला का दोषी ठरवायचे...?
काय म्हणावे याला कर्मगती की नशीब...? आपण म्हणतो की हे सर्व प्रारब्ध असते. पण मग या जन्माची त्या दोघांची थोडीफार देखील पुण्याई नाही का ? जर त्यांची पुण्याई नसती तर त्यांचे तीनही मुलं आज इतके सुखी असते का ?
आणि जर समजा त्यांची ह्या जन्माची पुण्याई मुलांना दिली गेली असेल... तर मग त्या माता पित्याच काय...? त्यांनी काय करावं ?
खरे तर हल्ली मी आणि माझा संसार यातच ही पिढी रमते आहे. बाकी त्यांना नाती वगैरे या सर्व गोष्टींशी काहीही देणे घेणे नसते. खरच जर हे असेच सुरू राहिले तर .......?
कोणाचे नेमके चुकते आहे , आई वडिलांचे संस्कार चुकलेत? की, बदलत्या काळानुसार मुलांना समजून घेतले हे चुकले ? , की मुलांचा हेकेखोरपणा....? की परिस्थिती....?
हे सर्व प्रश्न भेडसावून सोडतात . हे मात्र नक्की.