Vasudev Patil

Tragedy Others

2  

Vasudev Patil

Tragedy Others

पंचक भाग :-- दुसरा

पंचक भाग :-- दुसरा

9 mins
578



      भाग::-- दुसरा


 सकाळी सकाळीच दत्ता भट आपलं तंदुल पोट सांभाळत सांभाळत हवेलीवर वच्छा ताईची भेट घेण्यासाठी पळाला.बाल्याला जाऊन आज दोन दिवस झालेले.जयाप्पा व नंतर बाल्या गेल्यानं घरात गर्दी होतीच.वय झालेल्या वच्छा ताईंस जयाचं नाही पण बाल्याचं खूप दु:ख वाटत होतं. बाल्याचं झोळीच्या दोराचा फास लागून जाणं हा धक्का सुंताबाईस अजुनही सहन होत नव्हता. नावास कुंकवाचा धनी असलेला जयाप्पा गेल्यानं सुंताबाईस सुटल्याची भावना होती पण बाल्याचं जाणं तिला उध्वस्त करत होतं. बाल्याचं जाणं तिला आपण 'अंतूची' अपराधी असल्याचं अधोरेखीत करत होतं.अंतू!.. ,अंतू....! कुठं गेला असावा?

" ताई !,ताई! " ताईला हळू आवाजात बोलवत घाईत आलेल्या दत्तानं कोपऱ्यात बोलावलं.

ताईनं गुडघ्यावर हाताचा जोर देत उठत त्याला सुंताच्या खोलीत नेलं.

" ताई अंतूचा तपास लागला. मुलानं कंपनीतून त्याचा नंबर मिळवत त्याच्याशी बोलला ही. आपला अंतू गवसला." एका दमात दत्तानं ताईच्या कानात कुजबुजत सांगितलं.

'अंतू ' नाव ऐकताच खोलीच्या अंधाऱ्या कोपऱ्यात दोन दिवसांपासून एक ही अश्रू न गाळता दु:ख तसच साठवून बसलेली सुंता विचलीत होत तिच्या गालावर कुणालाच न दिसणारे अश्रू ओघळले.

"दत्ता नीट व सविस्तर सांग बाबा.कुठाय माझा लेक अंतू? आता तर त्याशिवाय तरणोपाय नाही बाबा." वच्छा ताई थरथरत कुणी ऐकणार नाही या धोऱ्यात कळवळली.

 जयाप्पाची तब्येत खालावत असतांनाच सयाजीच्या हालचाली वाढत होत्या.म्हणून सदा सर व दत्ताची मदत घेत महिन्यांपूर्वीच वच्छा ताईनं मृत्यूपत्र करायचं ठरवलं होतं.सदा सरांचा जवळचा नातेवाईक पुण्यात वकील होता. व दत्ता भटाचा मुलगा ही पुण्यात होता.म्हणून वकीलाकडं सदा सर व दत्ताजी महिन्यांपूर्वीच गेले होते. सारी बोलणी आटोपून परतत असतांनाच रेल्वेस्टेशनजवळील फुलाच्या दुकानासमोर गाडी थांबली.फुलवाल्यांनं घाईत उठत "सरोदे साहब अभी माला लगा देता" म्हणत उठत त्यानं फुलमाळ दिली.गाडी निघाली.गाडीत बसलेल्या व्यक्तीवर नजर जाताच दत्ता भट उडालाच.

"आरं पिना बाळा या गाडीत आपला अंतू आहे बघ! थांबव थांबव गाडी" दत्ताजी गाडीमागं धावत ओरडू लागला.पण गाडी निघून गेली.तोच रेल्वेस्टेशन मधून दत्ता शेठच्या गाडीची उद् घोषणा झाली.पिनानं वडिलांना "मी करतो तपास तुम्ही चला तोवर" सांगत फुलवाल्याकडं चौकशी केली. फुलवाल्याचं कायमचं कटमर असल्यानं त्यानं सविस्तरपणे माहिती असलेली जुजबी माहिती दिली.अंतू सरोदे 'कनस्ट्रक्शन' मध्ये मोठ्या हुद्द्यावर असल्याची माहिती मिळताच पिना वडिलांकडं आला पण तोपावेतो गाडी सुरू झाली होती. त्यानं धावत धावत मी पुर्ण माहिती काढून कळवतो एवढं सांगत निरोप घेतला. दत्तानं परत आल्यावर वच्छा ताईस ही माहिती कळवली होती.पण नंतर कोणती कन्स्ट्रक्शन नाव माहित नसल्यानं माहिती मिळेना दत्ता भटाचा पिना दररोज फुलवाल्याकडं जाऊ लागला.पण त्या दिवसापासून अंतू फुलवाल्याकडं आलाच नाही. आणि मग नेमकं दत्ता भटास मुलानं अंतूचा तपास लागल्याचं कळवलं होतं .नेमकं एक महिना अंतू सांगलीकडच्या साईडवर होता.सह्याद्री पर्वतात साईड असल्यानं रेंज ही नाही. व फुलवाल्यास नंबर ही माहित नव्हता.तिथलं काम आटोपताच तो परत आल्यावर फुलवाल्यानं पिनाशी त्याची गाठ घालून दिली.अंतूनं पिनाला पाहताच पुन्हा त्या कडवट आठवणी नकोच म्हणून बोलणंच टाळलं. त्यानं त्याला उडवून लावत सरळ निघून गेला. पण अंतू माग काढत त्याची कन्स्ट्रक्शन व नंबर मिळवत वडिलांना कळवला होता. दत्ता तेच सांगण्यासाठी वच्छा ताईकडं आला होता.

 वच्छा ताईंनं एकातांत दत्ता मार्फत नंबर लावला. सुरूवातीस दत्ता बोलला.

"अंतू पोरा... !"

"कोण?"

"पोरा मी ..मी.. भट ..दत्ता भट...तुला पिना भेटला .पण तू .."

"कोण? माफ करा राॅंग नंबर " म्हणत फोन कट केला गेला.

दत्ता भटानं पुन्हा लावला. 

" एक मिनीट फक्त ऐकून घे मग तू हवं तर कट कर वा उचलू नकोस पण ऐकून तर घे" म्हणत दत्तानं वच्छा ताईकडं फोन दिला.

" अंत्या....अंतू.... " गळा दाटला ,आवाज थरथरला.

"......."

" अंतू बोलू नकोस हवं तर मावशीसोबत पण ऐकून तर घे!"

" बोल...?" अंतूचा प्रथमच बोल घुमला.

" चार पाच वर्षात एकदाही फिरकला नाहीस. ठिक आहे पण आता या तुझ्या मावशीचा भरोसा नाही पोरा. मला माहितीय मी तुझी अपराधी आहे. पण माझ्यासाठी नव्हे तर निदान सुता साठी तरी एकदा तारणीत ये"

" बरं ठेवू का फोन मला दुसरं ही कामं आहेत" सुंताचं नाव निघताच तिकडंनं घाई होऊ लागली.

" लेका ऐक, जया गेला.नी ज्याला तू पाहिलं नाही.....असा बाल्या ...बाल्या ही गेला. नी आता......" वच्छा ताईचा स्वर भरून आला.बोलणं मुश्कील झालं.

" जाणारे गेलेत. त्याच्याशी मला कसलंही देणंघेणं नाही...जिथं आपल्यांनीच मला उभा जाळला त्यात दुसऱ्यांसाठी मी का दु:खं करत जळावं?"

"अंतू एक ..एकदा तरी येना तारणीस.नमाझ्यासाठी नाही पण जी हळद लावुनही उजळली नाही.तुझ्यासाठी जी अजुनही.... त्या सुंतासाठी तरी.....पाया पडते मी" वच्छा ताई रडत थरथरू लागली.

" माझ्यांनीच मला जितेपणी जाळलंय.मी पुन्हा त्या जगात पाऊलही ठेवणार नाही.आणि एक पुन्हा फोन ही करु नकोस " म्हणत फोन बंद झाला.

कोपऱ्यात सुंताच्या काळजात भावनाचा महापूर आला.'बाल्या तू जरी राहिला असता तरी मला दुसरं कोणी नको होतं' मनातल्या मनात आक्रोश सुरू झाला.

वच्छा ताईस सयाजीच्या हालचाली पाहून स्वत:ची नाही पण सुंताची काळजी वाटू लागली.म्हणून काही ही करून अंतूनं यायलाच हवं असा तिनं विचार करत भले स्वत: पुण्यास जाण्याचा विचार केला. दत्ता भटाला तिने गुपचूप परत पाठवलं.पण तरी या गोष्टी सयाजीला कळाल्याच.त्याच्या डोळ्यात आग पसरली.आपण एक एक काटा काढतोय तर आणखीनच अडचणी वाढतायेत.त्यानं पुन्हा पुढच्या चाली आखल्या.

.

.

कात्रज परिसरात आलिशान फ्लॅटमध्ये दुपारी लवंडूनही अंतूस झोप येईना. त्यानं उठत काॅफी बनवली.काॅफीचे घोट घेता घेता ' हळदीचा डाग' हे वच्छला मावशीचं बोलणं छळू लागलं. आख्खं आयुष्यच छिन्न विछीन्न करून कुठल्या डागाची गोष्ट करता हेत हे? काॅफीचे घोट तो खाली ढकलू पाहत होता पण काॅफी घशात उतरेना.

 तो आपल्याभोवतीच जणूकाही घरघर फिरू लागला. मावशी मामा, सुंती, जया, सया , तात्याराव, काशीराव त्याच्या सोबत गोल गोल फिरू लागले .जणू काही लहानपणी सुंतीसोबत आपण लपाछपी खेळतोय.सालीनं आपली जिंदगीचीच चिलम तंबाकू करून टाकली. नी मावशी म्हणतेय जया गेला तू येऊन जा.का जाऊ मी? अरे हा मावशी काय बोलली? बाल्या गेला....? बाल्या आला तर मग हळदीच्या डागावर बसलीय ...हे कसं मग? की...?

जाऊ दे पण मी जाणार नाही.

तो पलंगावर आडवा झाला नी आयुष्यपट खोलू लागला.

 .

.

  न कळत्या वयात आई वडिल गेले.मामानं आणलं. पहिलं लग्न मोडलेली वच्छी मावशी आपणास सांभाळू लागली. एक दोन वर्षांनी लहान सुंती व अंतू दोन्ही मामी मावशीच्या मांडीवर ' वारणी'त खेळू लागलो, वाढू लागलो.

 पट बदलला.तारणीतील मोठे शेतकरी तात्याराव नेहेतेची पहिली पत्नी वारली.मुलबाळं नसलेले श्रीमंत असलेले तात्याराव दुसरा घरोबा शोधू लागले.

 वारणीत मामाकडं बोलणं घातलं.वच्छी मावशी दुसऱ्या लग्नास तयार होतांना धूर्त मावशीनं थोराड तात्यारावांना अट घातली. जर मूलबाळ झालं तर ठिकच पण पोट पिकलंच नाही तर माझ्या बहिणीचं पोरकं लेकरू 'अंतूस' दत्तक घ्यावं लागेल. थोराड तात्यारावाच्या मनात बसलेल्या वच्छीमावशीसमोर तात्याराव तयार झाले.

 वच्छी मावशी वारणीहून तारणीस आली.अंतू सुंतीबरोबर वारणीत शिकू लागला.एक एक पायरी चढत जिल्ह्याच्या काॅलेजात जाऊ लागला.

तात्यारावांना मुलबाळ झालंच नाही.मग मावशीनं अंतूस तारणीलाच ठेवलं.नी तात्यारावांना अंतूस दत्तक घेण्यासाठी लकडा लावला.लग्न करतेवेळी होकार देणाऱ्या तात्यारावांनी वय झालं नी विचार पालटवले.

 चाळीस एकराचं रान होतं.मात्र भाऊ काशीनं त्याच्या हिश्याचं चाळीस एकर विकत विकत व्यसनात सट्टा,जुगार, पत्त्यात सारं उडवलं.काशीस जया व सया दोन मुलं ती ही तशीच उर्मट व मग्रूर. पण तात्यारावांचा जीव भाऊ व पुतण्यात अडकू लागला.सरतेशेवटी रक्तच ते.रक्तासाठी धडपडू लागलं.पण वागणूक पाहून वच्छा मावशी त्यांना फटकू देईना.वाद वाढले.तात्यारावांनी अंतूलाच घेऊ असं झुलवत ठेवत तीस एकराचं रानं वरच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेत जयाच्या नावावर केलं.तात्यांनी गावात अंतूस दत्तक घेतोय अशी हूल उठवत दत्तक विधानाची तयारी चालवली.वच्छी मावशी भुलली.त्याच गडबडीत तात्यांनी अंधारात ठेवत सह्या घेत तीस एकर जयाच्या नावावर केलं.मात्र दहा एकर वच्छी मावशीच्या नावावर करून ठेवलं. बिंग फुटलं.मावशी चवताळली.पण तो पावेतो साऱ्या कायदेशीर बाबी उरकल्या होत्या. मावशीला उपायच उरला नाही. तीस एकराचं रान जयाच्या नावावर जातय म्हटल्यावर मावशीनं मग निर्णय बदलत जयालाच दत्तक घेण्याचं ठरवलं.

 पण.. पण.. तारणी, वारणीत राहता राहता अंतू व सुंती एक होणार होती किंबहूना मामा व मावशींनीच त्यांना एक केलं होतं पण ती एवढी एकरुप होतील हे मामा व मावशीस उमगलंच नाही. मावशीनं आधीच अंतूला दत्तक घेणार व सुंतीला सून करणार हे नातं पक्कं केलेलं.म्हणून मामा व मामीची काहीच हरकत नव्हती. अंतू तारणीतून अपडाऊन करत इंजिनिअरींग करत होता तर सुंती वारणीहून अपडाऊन करत बी.एड करत होती त्यावेळेसच बालपणाची प्रित बहरली. मावशी व तात्यारावांचे दत्तक वरून वाद चालू असतांनाच तात्याराव ह्रदयविकारानं गेले. मग क्रियाकर्म आटोपताच तीस एकर जातच आहे मग मावशीनं घाई करत स्वत:हून जयास दत्तक घेतलं. अंतूस सुंती द्यायला तयार असणारा मामा बिथरला.जया तीस एकराचा मालक मग अंतू भाचा असला तरी काय करायचं? त्यानं वच्छाताईस सपशेल नकार देत जयासाठी सुंती करत असेल तर ठिक अन्यथा अंतूस मी देणार नाही असं साफ सुनवलं व अंतूस वारणीस येण्यास मज्जाव केला.तात्याराव गेले, तीस एकर रान गेलं म्हणून मावशीला स्वत:विषयीच अनिश्चीतता वाटायला लागली.मग तिनं विचार केला.आपल्या नावावरचं दहा एकर अंतूस देता येईल पण तीस एकराचा मालक जयाला मुठीत ठेवायचं तर मग सुंती जयालाच देऊ.जया सुंतीचं लग्नाचं पक्कं झालं.कफ्फलक होत चाललेले जया सयांना तीस एकर रान ,शिवाय त्यावर सुंतीसारखी सुस्वरूप मुलगी म्हणजे सोने पे सुहागा! ते एका पायावर राजी झाले.कारण त्यांना मावशी सहजासहजी जमिन देईल अशी त्यांना शाश्वती नव्हतीच. काकांनी नावावर केली पण मावशी जर कोर्टात गेली तर वांदे होऊ नयेत म्हणून अंतू व सुंतीचं माहित असूनही जयानं विरोध न करता लग्न तर करू मग नंतर पाहू असा विचार करत लग्नास तयार झाला.

 सुंतीस आपलं लग्न जयाशी ठरवलं जातय हे कळताच ती बिथरली.तिनं वडिलांना साफ डुरकावत नकार दिला.भले अंतूस जमिन मिळो वा ना मिळो पण मी अंतूला सोडणार नाही.तिस एकर सोडून अख्खी पृथ्वी जरी जयाकडं असेल तरी जया मला नको. अंतूला तर जमिनीशी काहीच देणंघेणं नव्हतं.त्याला स्वत:वर विश्वास होता. पण तो काही च बोलू शकत नव्हता. कारण न कळत्या वयात आई वडील गेल्यावर मामा व मावशींनी आपल्यास सांभाळलं.मग आपण त्यांना कसा विरोध करणार? पण तरी सुंतीशिवाय आपण जगूच शकत नाही म्हणून त्यांनं मावशीस व मामास हात जोडून विनवलं.

 मावशे तुझी जमीन तू जयाला सोडून भिकाऱ्याला जरी दिली असती तरी मला त्याचं काही सोयर सुतक नाही.व वाईट तर मुळीच वाटत नाही.कारण तो तुझा अधिकार आहे.पण लग्नाआधी तू सुंतीलव मला मांडीवर घेतलंय तेव्हापासुन तू जे नातं लावलंय ते तोडू नकोस! नी मामा मला आई वडील आठवत नाही.तु नी मावशीच माझं सर्वस्व आहात माझ्यावर विश्वास ठेवा.मी सुंतीला सुखी ठेवेन."

मामा मामी एक ही शब्द बोलेनात.

"अंतू यांना ठरवू देत .तू घाबरू नको.मी तुझ्याशिवाय कुणाला च स्विकारणार नाही.का पाया पडतोय तू यांच्या" सुंती फुत्कारत बोलली.

मामा मामी मावशी सुन्न.कुणीच काही बोलेनात.अंतू मनातून हादरला. त्याला कळून चुकलं की मामा जमिनीसाठी तर मावशी म्हातारपण सुरक्षित करण्यासाठी आपल्याला बलिदानाच्या वेदीवर चढवणारच. तो विदीर्ण काळजानं उठला व मळ्यात निघाला. नंतर काही वेळानं सुंतीही मळ्यात आली. 

  आंब्याच्या झाडाखाली झोपलेल्या अंतूला उठवू लागली.

" सुंती तुला ही ते मनवतील."

"चल उठ माझ्याकडं इलाज आहे.मग वडील आत्या गपगुमानं लग्नास राजी होतील"

 त्या राती अंतू सुंती मळ्यातच मुक्कामाला थांबली. अंतू बिनघोर झाला.

  पण तरी ही पुढच्या चार दिवसांत शेवटच्या वर्षाचा निकाल घेण्यासाठी अंतू जिल्ह्याला गेला त्याच दिवशी सुंतीचं लग्न मंदिरात जयाशी झालं. अंतू उध्वस्त झाला. वारणीत येताच त्याला मामा मामी व सुंती दिसली नाहीत .तो तारणीत परतला तर हळदीच्या अंगानं जया पाठोपाठ सुंती मंदिरातून उतरतांना दिसले. मामा मामीनं जयाला नकार कळवण्याच्या निमीत्तानं सुंतीला तारणीला नेलं.जया, सया , मावशीनं आधी तयारी करूनच ठेवली होती. सुंतीला कळताच ती जयाला तोंडावर धुडकावू लागली.पण मामा मामीनं मावशीनं हातात ईखाची कुपी घेत सुंतीला लग्नासाठी धमकावलं. तीन जीव जातील त्यापेक्षा .....बस्स तिथंच सुंती कचरली.नी....

 .

.

 अंतू उठला.बाहेर फिरायला गेला.त्यानं कडवट आठवणी झटकल्या.जया जावो की कुणीही जावो परत तारणीत परतायचं नाही म्हणजे नाही. असं त्यानं पक्कं केलं. त्यानं नंबर चं सीम बदलवलं.

 दोन तीन दिवसानंतर ' सना कन्स्ट्रक्शन' मध्ये बाॅसनं अर्जंट मिटींग लावली. अंतू काॅन्फरन्स हाॅलमध्ये प्रवेश करण्याआधी मागे त्याला बाहेर गेटवर भटाचा पिना दिसला. त्याची नस तडकली. तो तसाच आत निघून गेला.

बाॅसनं अजंती धरणाची रेंगाळणारी साईडबाबत साऱ्यांना सुनावलं. 

"मि. अनंत सरोदे आपण या साईडवरची जबाबदारी सांभाळा. कारण तुमच्या शिवाय ती साईड स्पिड पकडत नाही आहे.लवकरात लवकर तुम्ही पुण्याहून निघा."

अंतूला अजंती धरणाचं नाव ऐकताच तारणी आठवली. कारण तारणीच्या जवळच हे धरण बांधलं जातंय म्हणून मागेही तो सांगलीच्या साईडवर मुद्दाम निघून गेला होता.पण आता मात्र टाळणं शक्य नव्हतं.मिटींग संपताच बाहेरनिघणाऱ्या अंतूकडं पिना पळतच आला.

"अंतू दादा! वच्छा ताई (मावशी) गेली.तुझा फोन डेड येतोय.म्हणून मी आलोय.

.

.

.

" सुक्काळीच्या सयाजीला तेव्हाच सांगत होतो,जया पंचकात गेलाय विधी कर! पण नाही ऐकलं. आता भोग म्हणा फळं.बाल्या गेला,वच्छा ताई गेलीय आता अजुन तीन कोण?"

तिकडं दत्ता भट सदा सरांजवळ बडबडत होता.पण दत्ता भटाला तरी

 कुठं माहित होतं की बाल्या व वच्छा ताई गेली की कुणी पाठवलं?

कुणी..?

कसं..?

का..?


क्रमशः



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy