ऑक्सिजन
ऑक्सिजन
अहो, ऐकलं का?
"काय म्हणताय राणी सरकार?"
जरा लाडात येऊन वसंतराव शारदाला म्हणाले.
अहो,"हा कोरोना पुन्हा थैमान घालत आहे.रविला आणि सायलीला इकडे यायला सांगा.अहो, त्यांच्या लग्नाला आता कुठे आठ महिने झाले आहेत.दिवाळी साजरी करून गेलेत ते तिकडेच! काळजी वाटते हो! त्याला सांगा,तुला एकट्याला पुरेल इतकी संपत्ती तुझ्या बापानं मिळवून ठेवली आहे.त्या नोकरीची आपल्याला काही गरज नाही.त्या दोघांचा जीव खूप महत्त्वाचा आहे.लॉकडाऊन पडायच्या आधी त्याला इकडे बोलावून घ्या बरं! ते दोघे इकडे आल्याशिवाय माझ्या जीवाला काही चैन पडायची नाही."
शारदेचे डोळे पाण्याने डबडबले.तिची समजूत काढत वसंतराव म्हणाले,"काळजी करू नका.मी कालच त्यांना सांगितले आहे,उद्याच्या उद्या मुंबई सोडायची.अग, उद्या सकाळ पर्यंत ते दोघे गावी पोहोचतील."
खरच!...
शारदाबाईंचा आनंद चेहऱ्यावर चमकू लागला.त्यांनी पदर खोचला आणि लेक व सुनेसाठी लाडू,चिवडा बनवायला घेतला.त्यांना ठाउक होतं,आपली सून एकुलती एक... लाडात वाढलेली आहे.तिला असं वरचा खाऊ लागतो. सकाळी शारदाबाई लवकर उठल्या.सफाई आवरून त्यांनी रवी आणि सायलीसाठी मस्त तुपातला शिरा बनवला.इतक्यातच त्यांना हाक ऐकू आली,"आई!एक आई!मी आलोय ग!"
धावतच शारदाबाई बाहेर आल्या.सुनेला आवेगाने मिठी मारणार तोवरच सायली म्हणाली," आई थांबा! आम्ही प्रवासातून आलोय ना! बाहेरच्या बाथरुममध्ये अंघोळ करून आत येतो.नंतर मग भेटू हं!
"बरं बरं! या तुम्ही फ्रेश होवून!तोवर मी आपल्यासाठी नाश्ता घेते.
आई, "तुझ्या हाताला वेगळीच चव आहे बघ! साजूक तुपातला शिरा! आहाहा! सायली आईकडून शिकून घे हं! असा शिरा मला फार आवडतो."
अरे रवी,ती अजून नवीन आहे.उगाच तिला दडपण देऊ नकोस.शिकेल रे हळूहळू!मी आहे अजून धट्टीकट्टी!तोवर मी करेन रे! माझ्या नंतर या घराची जबाबदारी तिचीचं आहे!"
हासत खेळत हे चौकोनी कुटुंब आयुष्याचा आनंद घेऊ लागलं.एक आठवडा मस्त आनंदात गेला.रवीला थोडी कणकण आली.एकदमच त्याचा खोकला वाढला.तशी शारदाबाईंच्या पायाखालची जमीन सरकली. अहो, भीती वाटते हो! रवीला बाळदमा होता. त्याला काही होणार नाही ना!"
शारदा,तु उगाचंच काळजी करतेस.आल्यापासून लेकाला तु तेलकट पदार्थ खायला घालते आहेस.त्यामुळे त्याला खोकला आला असेल.आणि मोठा आहे तो आता! बाळ दमा फक्त लहानपणीच असतो.तु उगाच काळजी करू नकोस.
दुसऱ्या दिवशी रवी दवाखान्यात गेला.वसंतराव त्याच्या सोबत गेले.डाॅक्टरांनी तपासणी केली.औषधे लिहून दिली.तरीही सर्वांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी असं डॉक्टर म्हणाले. शारदाबाई आणि रवीची टेस्ट पॉझिटिव्ह आली.दोघांना होम आयसोलेशन सांगितले.नवीन सुनबाई, वसंतराव त्यांची काळजी घेऊ लागले.चार ते पाच दिवस व्यवस्थित गेले.आणि सहाव्या दिवशी रात्री दोघांची तब्येत बिघडली.जवळच्याच कोरोना सेंटरमध्ये दोघांना अॅडमिट केलं.सायली खूपच घाबरली.वसंतराव धीराने राहिले.सुनेला धीर देऊ लागले.
"मी का म्हणून रवी आणि सायलीला इकडे बोलावलं असेल! इकडे आले आणि या कोरोनानं झडप घातली.त्या राक्षसाच्या भीतीपोटीच तर मी त्या दोघांना इकडे बोलावून घेतलं.पण या भयंकर राक्षसाने इथेही झडप घातलीच!"
शारदाबाईच्या मनात पुन्हा पुन्हा तेच विचार येत होते. डॉक्टर ओळखीचे होते म्हणून त्यांनी रवी आणि शारदाबाई यांना शेजारी शेजारीच बेड दिला होता. तेवढाच तो एकमेकांना आधार होता. रात्री शारदाबाईना ऑक्सीजन लावावा लागला. दुसऱ्या दिवशी रवीला श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला. पण ऑक्सीजनचा तुटवडा होता. पण रात्रीपर्यंत रवीला ऑक्सिजन जोडणं गरजेचं होतं. शारदाबाई हे सर्व बघत होत्या. त्या डॉक्टरांना म्हणाल्या,"मला आता थोडं बरं वाटतंय. माझा ऑक्सिजन काढा आणि माझ्या रवीला जोडा."
पण रवीने याला विरोध केला. रात्र झाली. डॉक्टर ऑक्सिजन उपलब्ध होतो का ते बघत होते. तोवर इकडे रवीला झोप लागली पण त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. पण आईला काही कळू नये म्हणून तो ते दाखवून देत नव्हता. पण शेवटी ती एक आईचं होती. शारदाबाई उठल्या. आजूबाजूला पाहिले. पण कोणीच दिसत नव्हतं. लेकाची अवस्था त्याना बघवली नाही. त्यांनी आपला ऑक्सिजन काढला आणि रवीच्या तोंडाला लावला. अर्धवट झोपेत असणाऱ्या रवीचा श्वास व्यवस्थित सुरू झाला. त्याला शांत झोप लागली. शारदाबाईंच्या चेहऱ्यावर आनंद चमकला.
काही वेळाने डॉक्टर ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन आले आणि ते चित्र पाहून अचंबित झाले. एका माऊलीने आपल्या लेकासाठी स्वत:चे प्राण पणाला लावले.