जीवन उजळून टाकणारे क्षण
जीवन उजळून टाकणारे क्षण
मनुष्य जन्मात आलोच आहोत तर असंख्य घटना, असंख्य ठेवणीतले क्षण येणारच, कितीतरी ऐहिक भौतिक घटना, वस्तू, व्यक्ती आपल्याला हरपून टाकतात, हे सगळं नैसर्गिकच... कदाचित हे मायाजालच मनुष्य प्राण्याला भुलविणारं. छोट्यामोठ्या आनंद क्षणांना हरपून जाणं स्वाभाविकच, वाळवंटात मृगजळ तसे हे हरपण्याचे क्षण.
कितीतरी वर्ष याच हरपण्याचं कौतुक घेऊन मीही जगत होते, यात आनंद मानत होते. कधी या सकारात्मक ऊर्जेने स्वर्ग दोन बोटेही उरल्यासारखं वाटलं. पण सकारात्मकता म्हणजे काय असतं हे दोन प्रसंगांनी मला खूप चांगलं शिकवलं. यासाठी त्याची ऋणी आहे, ज्यानं हे हरपून जाणं माझ्या ओंजळीत अलगद, अगदी माझ्याही नकळत टाकलं.
ते हिंदी गाणं आहे ना, अकेला गया था मै ना आया अकेला, तशी अवस्था, वर्णन करताना शब्द थकतील. पहिला प्रसंग, आजीसोबत जायचं होतं, कामांचा डोंगर डोक्यावर असताना सुट्टी मिळणं अशक्य असताना, कशी गेले ते त्यांनाच माहिती, पण त्यांनी प्रकर्षाने बोलावलं होतं. गेले आणि त्यांनी अक्षरशः त्यांच्या कृपासिंधुत अमृतस्नान घडवलं, पाद्यपूजा काय, अन्नपूर्णेची पूजा काय, मी काय करत होते ते मलाही अनाकलनीय होतं. एक नास्तिक , अस्तिकतेकडे कसा जाऊ शकतो याचं स्वामींनी दाखवलेलं प्रात्यक्षिक, पुढचे काही दिवस , आणि आता आठवणीत येणार प्रत्येक क्षण भरभरून सकारात्मकता देणारा.
दुसरी सकारात्मक जाणीव म्हणजे माझ्या आयुष्यातला सुवर्णक्षण, कधीही रात्री झोपेतून उठूनही कोणी विचारावं तुझ्या आयुष्यातला सुखाचा क्षण कोणता आणि मी फक्त हेच सांगेन, एव्हाना अक्कलकोटला चारपाच फेऱ्या झालेल्या, पुलाखालून बरंच पाणी गेलेलं. सासरी वाड्यात घरात विठ्ठल, जगन्नियंता. पण मी मात्र अज्ञानी, दोन वर्षे झाली लग्नाला आणि देवाचं साल आमच्याकडे आलं, साल आल्यावर देवाला जायची प्रथा, छान एकत्र जाऊ मज्जा करू म्हणत सगळे घरातले निघालेलो, तीन तासांच्या प्रतीक्षेनंतर महाद्वारापाशी पोचल्यावर जे काही अश्रूंचा बांध फुटला आणि तिथून पुढे त्या समचरणांवर काहीही मागायचं, इतकंच काय तर परत फिरायचंही भान न उरण्याइतकी समरसता, हे सकारात्मक देणं आयुष्यभर स्मरणमात्रे उर्जेचं दान पदरात टाकणारं.
