एका श्रीमंताची माणुसकी
एका श्रीमंताची माणुसकी
श्रीधर मेहता. मुंबईमधील एक प्रसिद्ध उद्योगपती.फक्त व्यवसाय आणि पैसे आहेत म्हणून नाही तर एक चांगला माणूस म्हणून त्यांचं नाव आदराने घेतले जायचे. श्रीधर यांनी प्रामाणिकपणे अपार कष्ट करून हे यश, वैभव संपन्न केले होते. श्रीधर, त्यांची बायको, आणि त्यांची एकुलती एक मुलगी असा त्यांचा परिवार. मुंबईमध्ये उच्चभ्रू परिसरात त्यांचा एक बंगला, दोन गाड्या एवढंच काय ते त्यांची भौतिक संपत्ती होती. त्यांची मुलगी सई ती सुद्धा खूप शिकलेली, सुंदर, सर्वांना आवडेल अशी होती. तीला आपल्या वडिलांचा नेहमी अभिमान वाटत असे.तीला फक्त नेहमी प्रश्न पडायचे, " आपले आई वडील एवढे साधे का राहतात?? इतर श्रीमंत माणसांसारखे आपल्याकडे खूप गाड्या नाहीत, आपण खूप खर्चही का करत नाही??" ती जेव्हा असे प्रश्न आपल्या वडिलांना विचारायची ते फक्त तिला एवढंच म्हणायचे आपल्याला काही कमी पडत नाही मग कशाला उगाच वायफळ खर्च करून कष्टाचे पैसे वाया घालवायचे त्यापेक्षा गरजू लोकांना मदत करावी आणि राहिलेला पैसा साठवून ठेवावा. कधी गरज लागेल सांगता येत नाही. सईला सुद्धा त्यांचे विचार पटत असतं.
श्रीधर यांना त्यांच्या व्यवसायमध्ये चांगला नफा होत असतं. त्यांचे सगळे कामगार आणि त्यांच्या कंपनी मधील माणसं आपल्या मालकाला देवमाणूस मानायचे. कारण ते सुद्धा आपल्या सगळ्या लोकांची आस्थेने विचारपूस करत असतं. काही वर्षांनी अचानक एका भयंकर विषाणूमुळे संपूर्ण जगावर संकट आले. त्याला थोपवण्यासाठी सरकारने लॉकडाऊनचा पर्याय निवडला होता. लॉकडाऊनमुळे संपूर्ण जग थांबलं. सर्व उद्योगधंदे, सर्व दैनंदिन जीवन थांबलं. त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. लोकांवर बेरोजगारी, उपासमारीची वेळ यायला लागली होती.परंतू श्रीधर मेहता यांच्यासारख्या अनेक लोकांमध्ये अजून माणुसकी शिल्लक होती.
श्रीधर यांनी कंपनी बंद असूनही आपल्या एकाही कामगाराला कामावरून कमी केले नाही उलट त्यांनी आपल्या सगळ्या कामगारांची जबाबदारी घेऊन त्यांना दोन वेळच पौष्टीक जेवण कसं मिळेल याची सोय केली. असं करता करता पाच- सहा महिने गेले. त्या नंतर हळू हळू सगळं पूर्ववत होत गेलं. सरकारने उद्योगधंदे सुरू करण्यासाठी परवानगी दिली. परंतु श्रीधर यांना आता काळजी वाटू लागली होती. त्यांच्याजवळची जी काही साठवलेली पुंजी होती ती आता संपत आली होती. त्यांना ऑर्डर येत होत्या पण त्यांच्याजवळ कच्चा माल घेण्यासाठी पुरेसे भांडवल नव्हते. आणि कामगारांना पगार देणे लगेच शक्य नव्हते. त्यांना काळजी वाटत होती जर कंपनी बंद करावी लागली तर आपलं आणि आपल्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांचं कसं होईल. हे सगळं ते आपल्या बायकोला बोलून दाखवत होते. याआधी त्यांनी कधीही कोणासमोर हात पसरले नव्हते.त्यामूळे यावर मार्ग कसा काढायचा याचा विचार ते करत होते. त्याच विचारात ते झोपून गेले. दारामागे उभी असलेल्या सईने हे सगळं ऐकलं होतं. सईने मनाशी ठरवलं काही झालं तरी आपण आपल्या वडिलांना मदत करायची.
सईने लगेच एक फोन केला तिच्या एका शब्दावर आणि श्रीधर यांचे नावं ऐकून त्यांच्या कंपनीला लागणारा कच्चा माल तिला मिळणार होता. दुसऱ्या दिवशी श्रीधर विचार करतच कंपनीमध्ये आले. समोरील दृश्य बघून त्यांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. नेहमीप्रमाणे सर्व कामगार हजर होते आणि कामसुद्धा जोरदार चालू होते. तेवढ्यात समोरून सई, सईची आई, आणि श्रीधर यांचा मॅनेजर आले. त्यांनी सगळ्यांनी मिळून श्रीधर यांचं स्वागत केले. त्यांना अजूनही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नव्हती.
आपल्या वडिलांचा संभ्रम दूर करण्यासाठी सईनेच मग बोलायला सुरुवात केली. "बाबा, तूम्ही काळजी करू नका. हे सगळे लोकं आपले आहेत. तूम्ही जसं संकट काळात त्यांना एकटं सोडलं नाही तसच ते ही आता आपल्याला एकटं पाडणार नाहीत. आजपासून आपल्या कंपनी मध्ये दिवसरात्र काम सुरू राहणार आहे आणि आपण आपली ऑर्डर वेळेत पूर्ण करून देणार आहोत. हे मी नाही तर ही आपली लोकंच तुम्हाला सांगत आहेत. पाच- सहा महिने तुम्ही त्यांना जपलत आता ते आपल्याला आणि आपल्या कंपनीला जपणारं आहेत." हे सगळं बघून आणि ऐकून श्रीधर यांच्या डोळ्यांत अश्रू आले.
त्या नंतर काही महिन्यातच पुन्हा एकदा कंपनीला चांगला नफा झाला. आणि श्रीधर यांच्या सगळ्या अडचणी दूर झाल्या होत्या. कंपनीला जो काही अधिकचा नफा झाला होता तो सगळा त्यांनी आपल्या कंपनीतल्या लोकांना वाटून टाकला होता.हे सगळं बघून सईला आपल्या वडिलांचा फारच अभिमान वाटत होता. आपल्या वडिलांनी फक्त पैसाच नव्हे तर जीवाला जीव देणारी माणसं देखील जोडली होती हे देखील तिला कळलं होत. आणि त्याचप्रमाणे तिला पैशांचा सदूपयोग आणि पैशाचं महत्त्व देखील कळाल होत.
"संकटं येतात आणि निघून जातात राहते ती फक्त संकटाच्या वेळी केलेली मदत आणि जपलेली माणुसकी."
