विशाल विलास कदम

Inspirational

4.1  

विशाल विलास कदम

Inspirational

अपरिचित इतिहास

अपरिचित इतिहास

3 mins
509


शिवाजी महाराजांबद्दल आजही समाजात अनेक गैरसमज पसरलेले आहेत. त्यांच्याविषयी अजूनही अनेक चुकीचे व इतिहासात नसलेले, ज्यांचे काही पुरावेही नाहीत असे अनेक गैरसमज केवळ लोकांच्या भावनेचा आधार घेऊन पसरवले जात आहेत.


तसेच महाराजांविषयी अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लोकांना ज्ञात नाहीत. पण आता हळूहळू आधुनिक इतिहास अभ्यासकांकडून त्या उलगडण्यात येत आहेत त्याबद्दल त्यांचे धन्यवाद!


तर अशाच काही अपरिचित गोष्टी आणि महाराजांविषयी लोकांच्या मनात असलेले काही ठळक गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न या लेखात केलेला आहे.


शिवाजी महाराजांचे पहिले चरित्र म्हणजे कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर यांनी लिहिलेले “शिवभारत!”

हे चरित्र शिवाजी महाराजांनीच नेवासाकरांना लिहिण्यास सांगितले होते. या ग्रंथात ३१ अध्याय पूर्ण असून ३२व्या अध्यायाचे ९ श्लोक आलेले आहेत. ग्रंथ अपूर्ण राहिला असून तो पूर्ण होण्याअगोदरच परमानंदचा मृत्य झाला असावा.


छ्त्रपतींचं पहिलं चरित्र : शिवभारत

या ग्रंथात महाराजांचे पूर्वज मालोजी राजे, शाहजी राजे आणि महाराज स्वतः असा तीन पिढ्यांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न नेवासाकरांनी केला आहे.


शिवाजी राजे हे शहाजी राजे व जिजाबाई यांचे सहावे अपत्य होते.

महाराजांचे सर्वात थोरले बंधू संभाजी राजे (ज्यांना कनकगिरीच्या वेढ्यात अफझलखानाने दग्याने मारले होते) व शिवाजी राजे यांच्यामध्ये ४ अपत्यांचा जन्म झाला जी काही कारणामुळे जगली नाहीत. शिवाजी महाराजांची साथ जिजाबाईंना अखेरपर्यंत लाभली! ही माहिती वर उल्लेख केलेल्या “शिवभारतात” आलेली आहे.


शिवाजी राजे हे एक उत्तम धनुर्धर होते.


याचा उल्लेख “शिवभारत” आणि “श्रीशिवदिग्विजय” या बखरीत मिळतो! कार्तलबखानाला ऊंबरखंडाच्या प्रसंगात शिवाजी महाराजांनी हरवलं याचं वर्णन शिवभारतात आलेलं आहे.


या प्रसंगात महाराज घोड्यावर बसलेले असून त्यांनी पांढरेशुभ्र वस्त्र परिधान केलेले आहेत व त्यावर केशराचा शिडकावा केलेला आहे, घोडा रुंद मानेचा व धिप्पाड छातीचा असून त्याच्या दोन्ही बाजूला तुणिर व त्यात बाण भरलेले आहेत.


धनुर्विद्येसोबतच महाराज मल्लविद्या, युद्धनीती, राजकारण अशा अनेक विद्यांमध्ये पारंगत होते असा “श्रीशिवदिग्विजय” बखरीत उल्लेख आढळतो.


महाराजांनी मराठी भाषेच्या वृद्धी आणि सरंक्षणासाठी “राजकोष” रचवून घेतला!

१७व्या शतकात मराठी भाषेत अनेक यवनी किंवा दख्खनी-उर्दू शब्दांची घुसखोरी झाली होती ज्यामुळे राज्यकारभारात येणारे बरेचसे शब्द हे उर्दू होते. म्हणून महाराजांनी रघुनाथ नारायण हणमंते ऊर्फ रघुनाथ पंडित यांना नवीन राजकोष रचण्याची आज्ञा केली.


रघुनाथ पंडित व त्यांचा सहकारी धुंडिराज लक्ष्मण व्यास यांनी मिळून हा ग्रंथ पूर्ण केला व अनेक यवनी शब्दांना संस्कृत किंवा गीर्वाण पर्यायी शब्द दिले. या ग्रंथाचे १० विभाग आहेत ज्याला “वर्ग” असे म्हणतात ( राजवर्ग, कार्यस्थानवर्ग, भोग्यवर्ग, शस्त्रवर्ग, चतुरंगवर्ग, सामंतवर्ग, दुर्गवर्ग, लेखनवर्ग, जनपदवर्ग, पण्यवर्ग).


या ग्रंथात यावनी, उर्दू भाषेतल्या काही शब्दांना दिलेले पर्यायी शब्द पुढीलप्रमाणे – आफताब = सूर्य, चाकर = दास, पलंग = मंचक, पातशाह = राजा.


शिवाजी राजांनी ८ वर्षांत २६० किल्ले जिंकून घेतले!

४ फेब्रुवारी १६७० रोजी महाराजांनी पुरंदरचा तह न स्वीकारता मुघलांशी युद्ध सुरु केले व पुढच्या आठ वर्षांत महाराजांनी चौफेर मोहिमा सुरु ठेवल्या व एकंदर २६० महत्त्वाचे किल्ले जिंकले!


महाराजांनी अफझलखानाला तलवारीने मारले!

होय! असा उल्लेख आला आहे शिवभारतात!! यालाच प्रत्यंतर पुरावा मिळतो तो नुकत्याच उजेडात आलेल्या “प्रतापदुर्गामाहात्म्य” या ग्रंथामध्ये – या ग्रंथानुसार महाराजांनी “आसित” हे हत्यार वापरून खानाला मारले.


म्लेंच्छक्षयदीक्षित शिवाजी महाराज

संभाजी महाराजांचं संस्कृतात एक दानपत्र आहे. पुण्यात S. P. कॉलेजच्या मागे शिक्षण प्रसारक मंडळाचं कार्यालय आहे तिथे हे दानपत्र आहे. त्या दानपत्रात ते आपल्या वाडवडिलांचं वर्णन करतात. त्यात ते महाराजांना “म्लेंच्छक्षयदीक्षित” (म्लेंच्छ = परकीय मुस्लिम आक्रमक, यांचा नाश करण्याची दीक्षा घेतलेले) म्हणतात!


हिंदू धर्माचे रक्षक

हेनरी रेविंग्टनने (महाराजांवर पन्हाळ्यावर तोफा डागणारा) महाराजांना एक पत्र पाठवलं होतं ( English records on Shivaji नावाच्या पुस्तकात हे पत्र छापलंय) त्यात तो पत्राची सुरवातच –


To Sevagy, Generall of the Hendoo Forces (शिवाजी, हिन्दुसेनापती यांना)


अशी करतो!


मशीद पाडून उभारलं त्र्यंबकेश्वराचं देऊळ

त्र्यंबकेश्वराचं देऊळ हे मशीद (शिवलिंगाच्या ठिकाणी बांधली गेलेली मशीद) पाडून बांधलेलं आहे! देवळाचा अगदी पाया रचण्याच्यापासून ते संपूर्ण बांधकामाचे हिशोबाचे सर्व कागदपत्र अस्तित्वात आहेत!


त्र्यंबकेश्वर!

गोव्याचं “सप्तकोटीश्वर” व तिरुवन्नमलई येथील ‘शोणाचलपतीचं मंदिर’ ही देखील अशीच २ उदाहरणं!


मुस्लीम सत्ता उलथवण्याची आकांक्षा

महाराज त्यांचा भाऊ व्यंकोजी यांना लिहिलेल्या एका पत्रात असं म्हणतात की,


मी तुर्कांना मारतो आणि तुझ्या सैन्यात तुर्क आहेत तर तुझा विजय कसा होईल?


(जुन्या कागदपत्रांत “तुर्क” हा शब्द मुसलमान या अर्थाने वापरला जातो)


आशा आहे, ही नवी माहिती वाचून आपल्या लाडक्या राजा शिवछत्रपतींची नवी बाजू तुम्हाला दिसली असेल!


श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!


Rate this content
Log in

More marathi story from विशाल विलास कदम

Similar marathi story from Inspirational