आम्ही महिला, किती सबला
आम्ही महिला, किती सबला
आई ,बहिण, पत्नी नाते
निभवते नारी अनेक.
रात्रंदिन झिजवते काया
सासर माहेरात लेक.
"आम्ही महिला किती सबला " या प्रश्नाचे उत्तर द्यायचे असेल तर मी म्हणेन की आम्ही महिला सबलाच आहोत. सोळाव्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली . संत ज्ञानेश्वरांना उपदेश करणारी मुक्ताईच होती .कारण जेव्हा संत ज्ञानेश्वर ताटी लावून बसले. या जगाचा त्यांना वीट आला. तेव्हा माझ्या मुक्ताईनेच त्यांना उपदेश केला. तुम्ही असे ताटी लावून बसलात या अज्ञानी जगाचा उद्धार करेल तुमचा जन्म असा रडण्यासाठी नाही तर या विश्वाच्या कल्याणासाठी आहे. आणि "हे विश्वची माझे घर" म्हणण्याची दृष्टी मुक्ताईने संत ज्ञानेश्वरांना दिली .आणि संत ज्ञानेश्वरांनी ज्या लोकांनी त्यांचा छळ केला त्यांच्ये कल्याणच व्हावे म्हणून पसायदान मागितले.
शिवाजी महाराज घडले ते जिजाऊंमुळेच . झाशीची राणी लक्ष्मीबाई , संविधान लिहून जगाला आदर्श लोकशाही देणारे आंबेडकर यांना घडवतांना रमाबाई यांनी शेणाच्या गोव-या विकून आपला संसार चालविला आणि स्वत.. तीस रूपये पाठवले अशी महिला प्रत्येक कर्तबगार पुरूषमागे स्रीच असते . अनादी काळापासून देवावर जेव्हा संकट आले तेव्हा आदिशक्ती महिषासुरमर्दिनी दुर्गेने महिषासुराचे मर्दन करून देवांना भयमुक्त केले.
तूच दुर्गा, तूच चंडिका तूच भवानी
तूच असूरांना मर्दिले तूच महिषासुरमर्दिनी.
आज असे कोणतेच क्षेत्र नाही की जिथे महिला नाही . अंतराळवीर कल्पना चावला सुनिता विल्यम्स डाॅक्टर इंजिनिअर ड्रायव्हर शिक्षिका कंडक्टर सर्वच क्षेत्रात महिलांनी कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. पुरूष जेव्हा नोकरी करतो तेव्हा तो फक्त आपली नोकरीच करतो . त्याला घराची कोणतीच जबाबदारी नसते परंतु महिला घर लहान बाळांची जबाबदारी सांभाळून नोकरी करते म्हणजेच महिला दोन्ही जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडत असते . म्हणून आम्ही महिला अबला नसून सबलाच आहोत.
साहित्य क्षेत्रात सुध्दा महिला मागे नाहीत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या प्रगल्भ विचारांनी माणसांना ज्ञान दिले. आणि साहित्य क्षेत्रात एवढी दिग्गज असतांना सुध्दा चक्क उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी विद्यापीठ हे नामकरण करण्यात आले. हा महिला सबला असल्याचा पुरावा आहे.
संतपरंपरेत सुध्दा मुक्ताई जनाई मीराबाई अश्या कितीतरी महिलांनी सिध्द केले की पुरूषांपेक्षा स्त्रिया या कुठेही कमी नाहीत.
म्हणून बहिणाबाई म्हणतात .
माझी मुक्ताई मुक्ताई
दहा वर्षाच लेकरु
चांगदेव योगियान
तिले मानल रे गुरु.
चौदाशे वर्षाचा योगी पण दहा वर्षांच्या मुक्ताईला गुरू मानल.
स्रीया या घरदार सांभाळून आणखी बाहेरही सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत.राजकारणात सुध्दा स्वर्गिय इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील . आमच्या लोकसभेच्या स्पीकर मीराकुमारी सुषमा स्वराज सोनिया गांधी सुप्रिया सुळे अशी कितीतरी नावे आहेत की महिला कुठेच कमी नाहीत .
जन्मा घालते देवाला
जन्म सार्थक बाईचा.
ब्रम्ह विष्णू नि महेश
पाया पडती बाईचा.
महिला ह्या सबलाच आहेत कारण देवादिकांना सुध्दा जन्म ही स्रीच देत असते.
जेव्हा जीवनात एखादी अघटीत घटना घडते पती देवाघरी जातो तेव्हा स्री ही घर आणि बाहेरची जबाबदारी समर्थपणे पार पाडून यशस्वी संसार करते. पण त्यावेळेला या जागेवर जर स्री मरण पावली तर तर या घराचे घरपण नाहीसे होते .आणि सर्वजण म्हणू लागतात की घर उघडे पडले. तो माणूस एक दोन वर्ष सुध्दा एकटा राहू शकत नाही. लगेच लग्न करून मोकळा होतो.
नवरा आजारी पडला म्हणून पासष्ट वर्षांची लता भगवान खरे ह्या हिंमत न हारता जिद्दीने अनवाणी पायाने धावून मॅरेथॉन स्पर्धा जिंकली आणि बक्षिसाच्या रक्कमेतुन त्यांच्यावर उपचार करुन प्राण वाचविले. अश्या ह्या कर्तृत्ववान महिला सर्व जगासाठी आदर्श देतात .
म्हणूनच महिला ह्या अबला नसून सबलाच आहेत.
नारी नाहीच अबला
घेते गगनी भरारी.
शिक्षणाची ढाल हाती
नाही कुणाला भिणारी.