या चिमण्यांनो परत फिरा
या चिमण्यांनो परत फिरा
या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या.....
।।चिऊताई ।।
चिऊताई चिऊताई दार उघड....
सर्वांच्या ओळखीची गोष्ट ....हो ना .
चिऊताईच्या नव्याने ओळख झाली लॉकडाऊन मध्ये ..
दुचाकी चारचाकी वाहनांची गडबड नाही, रस्ते शांत, कसला गोंधळ नाही .
कुणी कुणाकडे येणारे जाणारे नाही ,
अशातच खिडकीततुन बाहेर बघताना लक्षात आलं एक चिमणी काडीकाडी जमवून रिकाम्या कुंडीच्या आधाराने घरटे तयार करतेय .
झालं मग ,लेकीच्या उत्साहाला उधाण आले ..
त्या वातावरणात हे नवे पाहुणे पाहून घर आनंदून गेलं.
लगेच सरबराई चालू, पाण्याचे मातीचे भांडे आणि खाण्यासाठी विविध धान्याने भरलेले दुसरे भांडे .
ते खाली पडू नये म्हणून केलेली पर्यायी व्यवस्था आणि दिवसभर त्या खात पित आहेत की नाही याकडे नीट लक्ष ठेवणे हा कार्यक्रम चालू झाला .
आता त्यांची आवडनिवड सुद्धा कळायला लागली .
हळूहळू त्या आमच्या घरचाच भाग झाल्या .
पुढे त्यांची पिल्लं त्यांना भरवणे ती गोड चिवचिव हे अनुभवण हा जणू एक सोहळाच होता . सगळ्यात सुंदर आणि ममतेने भरलेलं दृश्य म्हणजे चिऊताई तिच्या बाळाला चोचीत चोच घालून भरवते हा होता .
मोबाईल घेऊन तो क्षण टिपावासा न वाटता जसा च्या तसा मनात साठवून ठेवलाय कायमचाच ...
परत एकदा बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या . लॉकडाऊन संपला परत जगराहाटी चालू झाली काही , पण चिमण्यांशी जुळलेले हळुवार बंध तसेच राहिलेत ..
अजूनही रोज सकाळी आम्ही दाणापाणी ठेवतो आणि चिमण्यासुद्धा रोज न चुकता भेट देऊन ख्याली खुशाली देत घेत आहेत .
आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांचा सोबत कावळा साळुंकी आणि इतर मित्र परिवार सुद्धा येतो सोबत ,हक्काने . धकाधकीच्या जीवनात हे रेशमी ऋणानुबंध जपल्या जाणे म्हणजे एक प्रकारचा अनोखा ठेवा मिळण्यासरखे आहे .
।।चिऊताई।।
चिवचिव करत इकडून तिकडे
सतत चिमणी बागडत असते ,
चिऊ काऊंच्या गोष्टीतून
बालपणापासून भेटत असते ।
एक घास चिऊचा म्हणत
जेऊ घालत असते माऊली
घरासोबत चिऊलाही मिळत
असते तिची साऊली ।
चिऊताई सुदधा दाणा पाणी
कुठून कुठून आणत असते
चोचीत चोच घालून
पिल्लांनाही भरवत बसते ।
मोठे होतो आपण
चिमणी मात्र विसरून जातो,
पंख फुटून आपल्याला
घरट्याबाहेर उडत जातो ।
थकून जेव्हा निवांत होतो
घरट्यात परतुन जेव्हा येतो
वळून पाहता लक्षात येत
आपण आता एकटेच असतो ।
एकटेपण खायला उठतं ,
वेळ काही जात नाही
चिऊची गोष्ट सुद्धा
आता कुणी सांगत नाही ।
निराश मनाला उभारी येते,
जेव्हा चिमणी खिडकीत घरटं करते ,
चिवचिवाट पुन्हा ऐकू येतो
थकल्या जीवा विसावा मिळतो ।
घर पुन्हा नांदतं होत
खेळणं बागडण चालू होतं ,
चिऊताईच्या पिलांसोबत
आपलंही जगणं नवं होत ।
आपलंही जगणं नव होत ।।
लिहिताना नकळत या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या..हे गाणं आठवलं.
खुपदा शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घरट्यातून चिमणी पिल्ल बाहेर जातात.
घरट त्यांची वाट बघत असत...
त्यांची किलबिल आणि चिवचिवाट हवा हवासा वाटतो.
घरट्यातील चिमण्यांनी जमेल तसे परत माघारी यायला हवे आहे ..
सोबतच ज्यांनी खोट्या अहंकारापोटी, मोठेपणाचा आव आणून स्वतः च घरट्यातून आपल्या चीमण्यांना दूर सारले आहे .
आपल्या घरट्यात समावून न घेतां एखाद्या चिमणीला टोचून बाहेर हुसकावून लावले आहे ,
त्यांनाही कळेल का कधीतरी त्यांची चूक ?
देतील का ते आठवणीनी साद......
वेळीच लक्षात आलं तर ठीक..
कारण गेलेली वेळ परत फिरून येत नाही.....