Prachi Kulkarni

Inspirational Others

4  

Prachi Kulkarni

Inspirational Others

झेंडावंदन

झेंडावंदन

3 mins
166


"आजची जमा किती रे डब्यात आपल्या" रम्याने विचारले.

त्यावर तुक्याने उत्तर दिले, 'असंल की 500- 600 रुपये'


रम्या विचारात पडला, गेले दोन महिने चिल्लर जमा करून देखील एवढेच पैसे जमले. जमलेल्या पैशात काय काय जमेल असा प्रश्न रम्याच्या मनात घोळायला लागला. पण दोघांनी ठरवलं, रात्रीच्या मीटिंगमध्ये यातून काहीतरी मार्ग काढू.

सगळ्या पोरासोरांचे रात्री भेटायचे ठरले होते. नेहमीच्याच ठिकाणी म्हणजे दगडी पुलाच्या खाली.


एक एक करून बरीच मुले गोळा झाली.यातला हरएक जण आपल्या कुवतीप्रमाणे काहीतरी काम करत होता.अतिशय हुशार रम्या हा या गँगचा बॉस. तो कारमध्ये लावण्यासाठी window covers विकायचा, तुक्या कार पुसायची मऊ फडकी, सच्या पेरू तर अनरी टिकल्या आणि बो असे काहीबाही विकत फिरायची. कोरोनामुळे सध्या बरीच जण मास्क देखील विकायची. कोणी मोठ्ठे - मोठ्ठे पेन तर कोणी खोटी फुले, काही जण तर चक्क मोठं डालगं घेऊन सिग्नल वर फिरायचे, सिग्नलवर फिरता फिरता, एकमेकांना मदत करता करता, ह्या सगळ्या मुलांची गट्टी झाली. 

आज त्यांची एक अतिशय महत्त्वाची मिटिंग ठरली होती आणि त्याचसाठी सगळे पुलाखाली जमले होते. रम्याने सर्व मुलांना सूचना दिली,'उद्याचा दिस फार इशेष आहे आपल्यासाठी. समद्यांनी अंघुळी करून, स्वछ कापडं घालून बरोबर सक्काळी 7 वाजता हितंच यायचे, बाकीची तयारी मी आणि तुक्या करतो.' मिटिंग संपली.मग पांगापांग झाली.

सगळेजण ज्या दिवसाची वाट पाहत होती तो दिवस उजाडला. रम्या आणि तुक्यानी एकदम जय्यत तयारी केली होती. पुलाखालची मोकळी जागा आरशासारखी चकाकत होती. मध्ये एका सपाट ठिकाणी खड्डा खणून त्यात एक निमुळती काठी घट्ट बसवली होती, त्यावर दोन दोऱ्या बांधल्या होत्या, तो छोटासा चौक रांगोळीने शोभित केला होता, बाजूला लावलेल्या उदबत्त्यांनी वातावरण सुगंधित झाले होते. मधल्या काठी जवळ एक खोके ठेवले होते.त्यात समारंभाची संपूर्ण तयारी ठेवली होती. हळू हळू सगळी जण जमू लागली. स्वच्छ कपडे घातलेली आणि मास्क बांधून तयार असलेल्या मुलांच्या चिवचिवाटाने पुलाखालचा परिसर गजबजून गेला. 

सर्वजण समारंभाच्या प्रमुख अतिथींची वाट पाहू लागली आणि एवढ्यात घंटा वाजली. गेली 10 वर्षे वाऱ्या- पावसाची पर्वा न करता घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचे काम करणाऱ्या हरिभाऊंची गाडी आली. सगळ्यांनी त्या घंटागाडीभोवती गराडा घातला आणि हरीभाऊंना उतरायला सांगितले. भाऊंना कळेना, आज मुले आपल्याला उतरायला का सांगत आहेत. हरिभाऊंना घेऊन मुलांची उत्साही टोळी पुलाखालच्या चौकात आली. हरीभाऊ कोड्यात पडल्यासारखे बोलले, "काय रे मुलांनो, काय हवंय? काही अडचण आहे का? लवकर सांगा, अरे आज 15 ऑगस्ट ,आपला स्वातंत्र्यदिन, मला पटापट कचरा गोळा करून झेंडावंदनाला नऊच्या आत डेपोत जायाचं हाय.

भाऊंचा फार वेळ जाऊ नये याची खबरदारी घेत रम्याने हरिभाऊंना सगळ्या कार्यक्रमाची थोडक्यात माहिती सांगितली.

आपल्या हस्ते ध्वजारोहण , हे ऐकल्यावर हरिभाऊंच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. त्यांनी मुलांना समजावले, "अरे, मी लहान मानूस, माज काय करतुत्व म्हनून मी झेंडा फडकवू रे, त्यापेक्षा हे कोपऱ्यावरलं पोलीस काका पण आले असते." यावर तुक्या म्हणाला " काका, अवो आपला देश स्वछ करणे हे सुदीक मोटच काम हाये की,म्हनून तू बी सैनिकच हायेस. स्वच्चतेला पूजनारा सैनिक"

हरिभाऊंचे काहीही ऐकून न घेता , त्यांच्या हस्ते पुलाखाली ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा झाला. झेंड्याला फुले वाहिली. सगळ्यांनी एका सुरात राष्ट्रगीत म्हटले. काठीवरचा तिरंगा देशभक्तांचा सॅल्युट घेऊन अभिमानाने फडकत राहिला. भाऊंच्या गळ्यात हार घालून आणि एक नवीन चांगला shirtpiece देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. जिलेबी खाऊन तोंड गोड करून प्रत्येक जण आपापल्या उद्योगाला लागला.

पण दगडी पुलाखाली ताठ मानेने म्हटलेले जन गण मन, उंच उंच आकाशात निनादत राहिले


Rate this content
Log in

More marathi story from Prachi Kulkarni

Similar marathi story from Inspirational