दहिहंडीचा थरार
दहिहंडीचा थरार
आपलं सर्वांचं लाडकं दैवत म्हणजे श्रीकृष्ण भगवान...या सृष्टिचा रचयिता,स्वामी! प्रेमाची रसमयी मुर्ती...संपूर्ण विश्वाचं आराध्य दैवत आणि चैतन्यही...या भूमंडळात कृष्णाचं प्रागट्य श्रावण महिन्याच्या कृष्ण अष्टमीला झालं...या नंदनंदनाने मथूरेत जन्म घेतला व गोकुळात त्याने अनेक लीला केल्या..अनेक राक्षसांचा वध केला व धरणीमाता राक्षसमुक्त केली..कृष्णाचे अनेक खेळ,त्याच्या अगाध लीला,त्याने राधा व गोपीकांसोबत केलेला रास ही सगळी आनंदाची पर्वणीच होती...आजही कृष्ण व राधा रास खेळतात अशी वृंदावनात मान्यता आहे..राधाकृष्ण म्हणजे अद्वैताचं प्रतिक..भक्तिच्या उदात्त अवस्थेचं प्रतिक...गोकुळात रमणारा मुरलीधर कृष्ण म्हणजे समस्त गोप गोपिकांचे स्फुर्तिस्थान..त्यांचे दैवत..कान्हा बालपणी गोकुळात मित्रमंडळींना घेऊन गोपिकांची मटकी फोडायचा..दही-दुध-लोणी गट्टम करण्यासाठी सार्यांचा खोडकरपणा गोपिकांना जेरीस आणायचा.ती माखनचोरी करून कान्हाने प्रत्येक भारतीयाच्या मनाची चित्तचोरीच केली..खरंच अद्भूत कन्हैय्याच्या लीला व अद्भूत त्यातिल आध्यात्मिक रहस्य....
मी अनुभवलेला दहीहंडीचा थरार-
मंडळी,मी अनुभवलेला दहीहंडीचा थरार हा मी ज्या शाळेत नोकरी करायचे त्या शाळेतील आहे..मी शाळेत नविनच नोकरीला असतांना दहीहंडी झाली त्यावर्षीचा अनुभव केवळ संस्मरणीय असाच होता...गोपाळकाल्याच्या दिवशी शाळा मैदानावरच भरली होती..प्रत्येक वर्गाला लाईनने बसवले होते...मुलांप्रमाणे मुलीही उत्साहाने कार्यक्रमात सहभागी होणार होत्या..पहिल्यांदा मुलींचे दहीहंडीचे कार्यक्रम होणार होते तेही वर्गाप्रमाणे..दहीहंडीसाठी मोठ्ठी दोरी बांधण्यात आली होती..मधोमध हंडीत दही,लाह्या,खोबरं एकत्र करून हंडी बांधण्यात आलेली होती..हंडीला हार ,फुले लावण्यात आले होते..मुलांचा उत्साह तर शिगेला पोहोचला होता..आधी मुलींची दहीहंडी झाली पण कोणालाही हंडीपर्यंत पोहोचता आले नाही..हिरमुसलेल्या मुली खाली बसल्या..त्यानंतर मुलांची दहीहंडी सुरू झाली..प्रत्येक वर्गातील १० -१२ तरतरीत मुलं एकमेकांवर चढून हंडीचा वेध घेत होते..एकावर एक मुलांचे मजले चढत होते..आठवी नववीचे मुलं खूप प्रयत्न करत होते..त्यांच्या दोन्ही वर्गांना ते जमलं नाही..मग दहावीचा वर्ग आला..सरासर मुलं एकमेकांवर चढली..आणि थोड्याच अवधित हंडीला हात लावणार नी काय सांगू खालच्या मुलाच्या हालचालीने आख्या गड खाली आला..मुलं खाली कोसळली...पण वरचा मुलगा मात्र हंडीला धरून दोरीला टांगूनच राहीला..अधांतरी..सगळ्यांनी श्वास रोखले..त्याने मोठ्या हिमतीने हंडी नारळ घेऊन फोडली नी टाळ्यांचा कडकडाट झाला...दहावीची मुलं नाचू लागली..टेपवर गाणी लागली," गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल ब्रिजबाला.."सगळ्या मैदानावर जल्लोष झाला नी त्या मुलाला खाली आणन्यात आलं...मुलांनी त्याची मिरवणूक काढली...
गोपाळकाला व त्याचे अध्यात्मिक महत्व-
गोपाळकाला म्हणजे गोकुळात कान्हा आपल्या सवंगड्यांसोबत जेवायला बसतांना करायचा तो काला..सगळ्यांनी आणलेली शिदोरी एकत्र करून करायचा तो खरा गोपाळकाला...
दही,दुध,लोणी,ताक,पोहे,लाह्या,फुटाणे,खोबरं,साखर,
कोथिंबीर,जि-याची फोडणी असा तो खमंग काला म्हणजे सर्वांचा आवडता पदार्थ -गोपाळकाला..दहीहंडीच्या काल्याची चव अमृतालाही नसेल असे संतसज्जन म्हणतात...अहो काला म्हणजे काय तर लोभ,मोह,मद,अहंकार,मत्सर,काम या सर्वांचे मिश्रण तोच हा काला..या हंडीवर विजय मिळवणे म्हणजे गोविंद पावणे...गोविंदाला जे आवडतं त्यातली ही महत्वाची गोष्ट ..सर्व विकारांवर विजय मिळवणे..अजून एक अर्थ कान्हाला सर्व पदार्थांमध्ये दही दुधासारखे सात्विक अन्न सर्वात जास्त प्रिय म्हणून आपणही सात्विक अन्न खावे व खिलवावे असा एक अर्थ...ज्यामुळे आपली वृत्तीही सात्विक बनते..अजुन एक अर्थ हा की आपण एकट्याने अन्न ग्रहण न करता सार्यांनी मिळून कान्हाला दाखवून मग तो प्रसाद ग्रहण करणे होय..कारण गोकुळातही आधी कान्हाला खाऊ घातल्याशिवाय कोणीही अन्न ग्रहण करत नसे...ती प्रथाच होती..इतका जीव होता त्याच्यात..सगळ्यांचा जीवलग सगळ्यांचा मित्र..प्रिय मित्र -कृष्णकन्हैय्या!!
