भटकंती
भटकंती
संध्याकाळचे सात वाजत आले आहे आणि मी सध्या माझ्या गावामधल्या निसर्गरम्य अशा परिसरात म्हणजेच आमच्या फॉरेस्ट मध्ये फिरायला आलो आहे...
आज या ठिकाणी पोहोचताना सूर्यनारायणाचे अप्रतिम दर्शन मला घडले, जणूकाही ढगांच्या या निबिड सावली मधून हळूच डोकावून तो या पृथ्वी मातेचा निरोप घ्यायला आला आहे....
खरंच किती अप्रतिम दृश्य होत ते, असं वाटलं जणू आजचा दिवस संपूर्ण झाला....
माझ्या मनाला नेहमीच सूर्यनारायणाने, त्याच्या दर्शनाने एक वेगळीच शांती दिलेली आहे मग ते त्याचं दर्शन सकाळचे असो किंवा आजच्यासारख या सांजवेळेच असो....
काहीही म्हणा पण पाऊस पडल्यानंतर निसर्गाचे जे अवलिया रूप दिसतं ते क्वचितच इतर ऋतूंमध्ये दिसत असेल... जाणवत असेल....
म्हणून तेच सुंदर रुपड बघण्यासाठी मी आज पाऊस ओसरल्यानंतर फेरफटका मारायला आलो....
सांज वेळेच्या थंडगार वाऱ्यावरती हळूवारपणे हलणारी ही वृक्षवल्ली आणि त्यासोबत आपल्या मधुर आवाजाने या वृक्षवल्ली ला परिपूर्ण करणारी ही सर्व पाखरे सर्व कसं वातावरण मंत्रमुग्ध करून टाकत आहेत...
हळूहळू पाखरे आपल्या घराच्या दिशेने गोळा होऊ लागली आहे. जणू काही, दिवसभर काबाडकष्ट केलेली असताना आता आपल्या पिलांना चारा देण्यासाठी आपल्या घराची आतुरतेने वाट त्यांनी धरावी अशा पद्धतीने ते त्यांच्या घरट्याकडे जात आहेत...
खरंच इथे बसल्यानंतर मनाला जी शांती मिळते ती अविस्मरणीय आहे...
माणूस या धकाधकीच्या जीवनात निसर्गाच सुंदर रूप अनुभवायला विसरू लागला आहे... अशा वातावरणात आल्यानंतर खरं तर समजतं की हे जीवन खुप सुंदर आहे. देवाने आपल्याला दिल आहे अगदी तसच खूप सुंदर आहे...
यामध्ये आपल्याला काय मिळाले नाही हे शोधण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे हे ओळखून जर आपण त्याचा आनंद घ्यायला शिकू शकलो तर मला वाटतं आपण आपल्या जीवनात खऱ्या अर्थान सुखानं राहू शकू....
इतरांच माहित नाही पण माझ्या मनाला मात्र सांजवेळी नेहमीच शांती मिळत असते... जेव्हा हा ओझरता थंडगार वारा हळुवार पणे माझ्या चेहऱ्याला स्पर्श करून जातो तेव्हा मला असं वाटतं जणूकाही तो माझ्याशी काहीतरी बोलू पाहत आहे.... सांगू पाहत आहे की जीवनाच्या बिनकामाच्या प्रश्नांचा अति विचार करण्यापेक्षा माझ्यापाशी येऊन बसत जा....
आमच्या फॉरेस्ट मध्ये तसा कावळ्यांचा आवाज जास्त असतो... पण इथे बसून ऐकत असताना तोही मधुर भासतो आहे...
मला माझ्या जीवनात काही अपेक्षा किंवा आशा असेल तर ती अशी आहे की मला या पृथ्वीवरच जितकं बघता येईल तितक सौंदर्य स्वतःमध्ये साठवायच आहे...
खरंच किती सुंदर असतो ना हा निसर्ग....
मी तर पुन्हा पुन्हा त्याच्या प्रेमात पडत असतो.... कारण आशा अपेक्षा या भावनांनी त्रस्त असलेल्या माणसापेक्षा नक्कीच तो जास्त प्रेम देतो..... सर्वांना सामावून घेतो...
बेधुंदपणे ज्याच्या प्रेमात पडावं...जे मागील ते ज्याने भरभरून द्यावं....अशा या निसर्गाच्या प्रेमात आज मी नव्यान पडलो आहे !!