अनुभव हाच खरा गुरु
अनुभव हाच खरा गुरु
“अगं बघ आला हा पडून कुठे तरी .. म्हणाले होते तुला पाठवू नकोस तू त्याला बाहेर सायकल खेळायला .. ऐकणार ते कोण माझ ?”आजी काळजीने म्हणाली . “ अहो आई जाऊ द्या हो .. हेच तर वय असत शिकायच.. पडला नाही तर शिकणार कसं हा काही नवीन गोष्ट ??” आई आजीला म्हणाली.. पण ह्या संवादात एक गोष्ट मला कळली की धडपडल्या शिवाय आयुष्यात तुम्हाला काहीच नवीन शिकता येत नाही ..मला माझे लहानपणीचे दिवस आठवले की तेव्हाही आईने मला असाच गुरूमंत्र दिल होता की “सायकल शिकायची म्हणजे पडणं ही आलचं .. पडलं नाही तर शिकणार कसं ना ?? तोल सावरताना थोडा तोल जाणारच .. म्हणून माणूस पडतो पण परत उभा राहतोच की कारण त्याला मागच्या अनुभवातून कळलेल असत की काय केल म्हणजे आपण पडणार नाही .. हाच अनुभव आयुष्यात महत्त्वाचा असतो. थोडक्यात काय तर अनुभव हाच गुरु असतो .. अनुभव चांगला असो वा वाईट पण काहीतरी आयुष्याला पूरक असं शिकवून जातोच” .. आईचा हा मूलमंत्र मी आजही लक्षात ठेवून आहे .तेव्हापासून मला कळले आहे की आयुष्यात काही नवीन शिकायच असेल तर अनुभवासारख दूसरा गुरु असूच शकत नाही.
" मला नाही जमणार ग !!!!! मी नाही जाणार आज क्लासला .. मला आज तिथे भाषण करायच आहे .. मला सवय नाही ह्याची.. ही माझी पहिलीच वेळ आहे.. मला नाही जमल तर ?तिथे मला सगळे हसतील .. त्यापेक्षा न गेलेले बर आहे ना ?" स्नेहा रडत रडत म्हणत होती. " बर ठीक आहे नको जाऊ पण किती दिवस तू जाणार नाही असं ते तरी सांग ???" आई मुद्दाम तिला म्हणाली .. स्नेहा पाहतच राहिली कारण तिच्याकडे ह्या प्रश्नाच उत्तर नव्हत .."नाही न उत्तर तुझ्याकडे ?? अगं आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपण पहिल्यांदा करत असतोच की आणि ती जमते असं नाही ना .. पण त्या गोष्टींचा पहिल्यांदा अनुभव घेतला तरच कळत ना आपल्याला की ती गोष्ट जमत आहे की नाही ते .. म्हणून प्रत्येक नवीन गोष्टीचा अनुभव हा घेतलाच पाहिजे .. अनुभवा सारखा दूसरा गुरु नसतो ग राणी" आई समजून सांगत होती,स्नेहाला ती गोष्ट पटली आणि ती क्लासला जाण्यासाठी तयार झाली. "आई आता तू बघ मी कशी छान बोलते ते .. मला आधी खूप भीती वाटली की मी सगळ्यांसामोर बोलू शकेल की नाही? भाषण देता येईल की नाही?जमेल की नाही? पण तूझ बोलण एकूण मला तूझ म्हणण पटल आहे की आपण प्रत्येक गोष्ट कधी ना कधी पहिल्यांदा करत असतो .. आणि नाही जमल तरी एक अनुभव मला येईल आणि पुढच्या वेळी मी अजून तयारी करून चांगल सादरीकरण करेन .. पण आई एक सांगू का की तूच माझा खरा गुरु आहेस .. चलो येते मी आता क्लासला जाऊन " असं म्हणत स्नेहा निघाली.. घटना रोजचीच होती पण खूप काही शिकवून जाणारी होती .. आयुष्य एकदाच भेटत म्हणून प्रत्येक नवीन गोष्टीचा अनुभव हा घेतला पाहिजे मग तो अनुभव चांगला असो की वाईट पण आयुष्यभराची शिकवण देऊन जातो म्हणून अनुभव हाच खरा गुरु असतो.
