काव्य चकोर

Tragedy Others

2  

काव्य चकोर

Tragedy Others

आठवणी गणपती उत्सवाच्या

आठवणी गणपती उत्सवाच्या

3 mins
636


गणपती आणि नवरात्रोत्सव जवळ आले की, मला प्रकर्षाने एका मित्राची आठवण येते तो म्हणजे माझा बाल मित्र विजय गणपत ठाकूर. विजय म्हणजे सळसळता उत्साह..कोणालाही क्षणात आपलंस करून घेणारा किमयागार..व्यक्तिमत्वही रुबाबदार...शिवाय नम्र त्यामुळे परिसरात तो सगळ्याना सुपरिचित होता....

असा हा विजय माझा खास मित्र होता.. गणपती यायच्या आधी साधारण तीन महिने हा माझ्या मागे लकडा लावायचा.. सुनील मखर बनवणार ना या वेळी...?? मी पण मग नाही म्हणून त्याची फिरकी घ्यायचो...त्याचा पडलेला चेहरा पाहून मग मलाच दया यायची आणि म्हणायचो करू काहीतरी बघुया...इतक ऐकल तरी त्याची कळी खुलायची..काय करणार कस करणार, मला असंच मखर हव असा अट्टाहास त्याने कधीच केला नाही...तुम्ही म्हणता ना फेसबुकवर "तू फक्त हो म्हण" आणि "तुझ्यासाठी काहीपण" असाच विश्वास होता मैत्रीमध्ये.. मखर बनवायचं काम सुरु झाल की, नियमित येवून बसायचा काय हव नको ते विचारात रहायचा...पडेल ते काम मदतरूपी करत बसायचा...पण विचारायचा नाही ह्यातील माझ मखर कोणत म्हणून..? मी सुद्धा शेवटपर्यंत सांगायचो नाही...गणपती येण्याच्या दोन दिवस आधी त्याच्या घरच्या कामात मग्न ह्यायचा...मधेच येऊन कानोसा घेऊन जायचा...अस करता गणपतीचा तो दिवस यायचा..

रात्रीपासून माझी तो चातकासारखी वाट पहायचा..पण मखर न्यायला म्हणून यायचा नाही...त्याला खात्री असायची कि मखर वेळेत लागणार आणि मी स्वतः येवून लावून जाणार याची..आणि मग मी सुद्धा ठरलेल्या वेळेत त्याच्या घरी हजर होत असे..माझ्या हातातील मखर पाहून त्याच्या चेहऱ्यावरचे खुशीचे भाव लपत नसत...त्या अपेक्षित असणारा मखर लागत होता..मग माझ कौतुक करता त्याच तोंड दुखत नसे...गणपती जाईपर्यंत येणार्या प्रत्येक पाहुण्याला तो माझ्या बद्दल सांगत असे...अश्या तर्हेने त्याचे सगळे पाहुणे नातेवाईक मला चांगलेच ओळखू लागले... काही वर्षांनी तो माहिमला रहायला गेला... तिथे गणपतीच पहिले वर्ष.. स्वारी माझ्याकडे शिरस्त्याप्रमाणे दोन महिने आधीच हजर.. मला म्हणाला सुनील ह्यावर्षी मी आखिल माहीम गणेशदर्शन स्पर्धेत भाग घेतो आहे..तुझ काय मत आहे..मी म्हणालो घेऊन टाक बघुया काय करायचं ते..मी सुद्धा पठडीतलच उत्तर दिल..त्यालाच माझा होकार समजून तो लागला कामाला...त्यावर्षी गणपतीच्या कृपेने त्याच मखर सुंदर आणि वेळेच्या आधीच तयार झाल..आधल्या रात्री मी ते लावलं..तिथेच तो म्हणाला सुनील आपण जिंकलो...आणि खरच झालंही तसच...ठरलेल्या दिवशी परीक्षक आले... परीक्षक होते चंद्रलेखाचे श्री.मोहन वाघ आणि सजावट होती तिरुपती बालाजीची.. मोहन वाघांच्या प्रश्नाची त्याने अगदी समर्पक अशी उत्तर दिली...मोहन वाघांनी सुद्धा कलाकृतीच खूप कौतुक केल..आणि आम्हा दोघांचही..त्या दिवशी आम्ही भरून पावलो अशीच अवस्था होती..यथावकाश निकाल जाहीर झाला..आमच्या कलाकृतीला प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आले...विजयची स्वारी एकदम खुश झाली..पेढे आणि स्मृतिचिन्ह घेऊन स्वारी घरी हजर झाली... अशीच जेमतेम दोन वर्ष उलटली...आणि एकेदिवशी घरी निरोप आला विजय ट्रेन मधून पडला..तसाच तडक सायन हॉस्पिटल गाठलं...तेथील दृश्य हेलावणार होत....सगळ्याना हसवणारा विजय आज स्वतःच जखमांनी विवळत होता..त्यारात्री जवळ जवळ १०० ते १५० मित्र हॉस्पिटल मध्ये तळ ठोकून होते...कालांतराने विजय बरा झाला पण जागेवर बसला..म्हणजे चालू शकत नव्हता..पर्यायाने नोकरी गेली होती..पण ऑफिसचा मालक दयाळू होता..विजयवर त्याचा विशेष जीव होता..उपचाराचा सारा खर्च त्यानेच केला होता..आर्थिक मदतही केली होती.. काही महिन्यांनी विजय बराच सावरला..मानसिक आधार देण्याच काम आम्ही मित्रांनी चोख केल होत..मी सुद्धा वेळ मिळेल तसा संध्याकाळी त्याच्या घरी जाऊन तासंतास गप्पा मारत असे..त्याच्या चेहर्यावर हास्य पेरण्याचा प्रयत्न करत असे...बघता बघता गणपतीचे दिवस येऊन ठेपले..विजयाच्या जीवाची घालमेल सुरु झाली...नोकरी नसल्या मूळे आर्थिक परिस्तिथी बेताची होती..आई वडील कामाला जात होते पण ते सुद्धा थकले होते..तुटपुंज्या पगारात कस तरी भागवत होते...त्याची घालमेल ओळखून मी त्याला आश्वस्त केले.

..सालाबादप्रमाणे गणपती येणार त्या दिवशी सकाळी मी त्याच्या घरी जाऊन मखर लावून गणपती मखरात बसवले...तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बरेच काही सांगून गेले... त्या गणपतीच्या पाच दिवसात आम्हाला पूर्वीचा विजय भेटला होता... दिवस सरत होते..वर्ष सरत होते..अधून मधून मी त्याच्याकडे जात असे त्याला पण थट्टा मस्करीला उत येत असे..गणपतीला न चुकता मखर लागत होता....गत स्मृतीना उजाळा मिळत होता..पण कुठपर्यंत? आमची पाठ सरतांच पुन्हा एकटेपणा विवंचना ह्यात हळू हळू तो खचत गेला...आणि एक दिवशी जगाला सोडून गेला...अपघातानंतर जेमतेम सहा सात वर्ष काढली ह्या कालावधीत बरंच काही शिकवून गेला...त्याच्या गणपतीच्या निमित्ताने होणार्या नवीन कला आविष्काराला तो पूर्ण विराम देऊन गेला... तो पूर्ण विराम देऊन गेला..


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy