आई आणि लेकरू
आई आणि लेकरू
बाभूळगावात उंबरशेत वस्तीवर एक आजी आजोबांचे जोडपे राहत होते. मी शाळेत जाताना रस्त्याच्या कडेलाच त्यांचे घर होते.रस्त्यावरून जाणारा प्रत्येक व्यक्ती त्यांना नमस्कार करून पुढे जात असे.कोणी घरी वळालेच तर आजी बिना चहाचे कधी कोणाला पाठवत नसे.वरून खूप आनंदी,सुखी कुटुंब वाटत होते.
आजोबा आजीचे दुसरे लग्न होते.आजीचे पहिले यजमान मिलिटरी मध्ये शहीद झाले होते.त्यांना एकही आपत्य नव्हते. आजोबांचे पहिले बिऱ्हाड एक मुलगा व मुलीला जन्म देऊन बाळंतआजारामुळे तान्हे बारा दिवसाचे बाळ मागे ठेवून देवाघरी गेले होते. त्यानंतर दहा-पंधरा दिवसातचं आजी या घरी लग्न करून आली होती.
तिने आपल्या सवतीच्या मुलाला पोटच्या पोरागत शेळीचे दूध पाजून मोठं केलं. दुसरी पत्नी असल्या कारणाने तिचे पाहिले नाव बदलून तिला सर्व पहिल्या पत्नीच्या नावानेच हाका मारत.पुढे तिलाही त्या नावाची सवय झाली.
तिला एक मुलगा दोन मुली झाल्या.ती आपल्या स्वतःच्या मुलांचा कमी लाड करत कारण तिला कायम भीती असे लोक म्हणतील स्वतः ची मुले झाल्यापासून ही सवतीच्या मुलांचा रागराग करते त्यामुळे ती थोडी दबलेली घरात वावरायची. एकत्र कुटुंब त्यात नवऱ्याचे काही चालत नव्हते. अश्यात तिने आपल्या संसाराचा गाडा ओढला होता.
आता या घरात आजोबा-आजी दोघेच होते.एकत्र कुटुंबाचे स्वरूप विभक्त कुटुंबाने घेतले होते.सर्व मुलींची लग्न होवून त्यांना सुनाही आल्या होत्या.सावत्र मुलगा शहर ठिकाणी स्थायिक झाला होता.सावत्र असला तरी तो आई वडिलांना काय हवे नको सर्व पाही.उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत आजी-आजोबांचे घर नातवंडांनी गजबजे. इतर वेळी मात्र ही दोघेच एकमेकांसाठी होती.नातवंडे आल्यावर आजीला काय करू आणि काय नाही असे होई. ती नातवंडांत स्वतःला विसरून जाई. हे सर्व छान आयुष्य असताना आजी मनात कुठे तरी आपल्या पंधरा वर्षांपूर्वी दूर गेलेल्या मुलाचा विचार करून दुःखी होत होती.
हो.तिचा स्वतःचा मुलगा जो अभ्यासात खूप हुशार होता.पण शालेय जीवनातील चुकीच्या मित्र संगतीमुळे व्यसनाच्या आहारी गेला होता.गणितात नापास झाल्यामुळे त्याचे दहावीचे वर्ष वाया गेले होते.तीन-चार वेळा परीक्षा देऊनही तो पुन्हा पास झाला नव्हता.चोरी,लुटमारी यात त्याने प्राविण्य मिळवले होते.पुढे त्याने एका मुलीच्या प्रेमात पडून संसार थाटला होता.त्यांना एक गोंडस मुलगी ही झाली होती.एक दिवस काय झाले माहीत नाही.तो घरातून सहकुटुंब गायब झाला.तो आजतागायत पंधरा वर्षे झाली घरी आला नव्हता.आजी याच विचारात गुरफटली.कुठे मी कमी पडले?माझा सावत्र मुलगा मला स्वतः च्या मुलाप्रमाणे जीव लावतो आणि माझा रक्ताचा मुलगा माझ्या जवळही नाही.मेला की जिवंत आहे ते ही माहीत नाही.या विचाराच्या अतिरेकाने आजीला हार्ट अटॅक आला.
आजी-आजोबांचा मुलगा(सावत्र) त्यांना आजारपणामुळे स्वतः कडे घेवून गेला.महिन्यातून दोन दिवस आजी आजोबा गावी येत.घराची डागडुजी करत व पुन्हा आपल्या लेकाकडे जात.मुलगा,सून,नातवंडे त्यांना खूप छान सांभाळत.पण आजी या सुखातही आपल्या मुलाचे दुःख गोंजारत होती.तो सापडावा यासाठी खूपदा न्यूज पेपर मध्ये टीव्ही ला आपण यांना पाहिलेत का? मध्ये जाहिरात देवून झाली होती. पण त्याचा कुठेही तपास नव्हता.शेवटी आजी मुलाची वाट पाहत स्वर्गवासी झाली.तिच्या मृत्यूची बातमीही वर्तमान पत्रात झळकली.तरी तिच्या मुलाची त्यानंतरही काही खबर नव्हती.
आता या मुलाला सर्वजण विसरले होते.एक दिवस बहिणीला अचानकच हरवलेला भाऊ बस स्थानक वर भीक मागताना दिसला.भावाला आता परत घरी यावे वाटत होते.तो बायको,दोन मुली,दोन मुले घेऊन गावी आला.सावत्र भावाने त्याला गावाकडील सर्व सोपवले.आजही व्यसनाच्या आहारी होता.त्याची बायको आजवर आपण नवऱ्याला चुकीची साथ दिली म्हणून पस्तावा करत होती.पण आपल्या माणसांच्यात आल्यामुळे खुश होती.हा आनंद खूप काळ टिकला नाही.
थोड्या दिवसांनी चित्र पालटले.नवरा खूपच दारू पिऊ लागला.बायकोला मारहाण करून दागिने मागू लागला.तिने नकार दिला तेव्हा एक दिवस नशेत त्याने तिच्यावर रॉकेलचा डबा ओतून तिला संपवले.हा प्रकार मुले पाहत होती,पण रोकू शकली नाहीत.दुसऱ्या दिवशी दारूची नशा उतरता त्याने सर्व गमावले होते. तान्ह्या बाळासह चार चिमुकली पिले मागे सोडून एक आई,बायको चिमणी पाखरागत उडून गेली होती.आज पुन्हा आई आणि लेकराची
ताटातूट झाली होती.
*****
★तात्पर्य:- प्रत्येक आईला मूल प्यारे असते. पण मुलाच्या छोट्या चुकांवर वेळीच सावध झालो तर,मोठा अपराध टळू शकतो.