लॉकडाऊनची कथा
लॉकडाऊनची कथा
२२ मार्च...करोना
आज वीस तारीख, 22 तारखेला समदं सामसुम हुईल. आज उद्याच जुळणी कराय पायजे. रोजचं येगळं पण त्या दिशी बाहेर पडायला मिळणार नाही. त्यात लेकरं दोन घरात. कनवटीला पन्नाशीची नोट... शिरपा पाटील आज पगार देतो म्हणाला होता. घरातलं सामान संपलं होतं. मनातल्या मनात काय बाय आणायचं आठवत होती. पावलं झपाझपा चालली होती. शेवटी पाटलाच्या घराजवळ आली. आणि समोरूनच पाटील आलं. काय रखमा? पगार न्यायला??? आलते जी.. बर बर हे घे पगाराचं दिडशे. नि वर हे पन्नास घे कमी जास्ती ला. पोरं बाळ हायती. होय होय फेडीन कामात. असं म्हणून हात जोडून ती मनातल्या मनात पाटलाला दुवा देत चालू लागली.
उद्या उठलं की पहिला माल भरायचा पोरास्नी राजगिऱ्याचे, चुरमुर्याचे लाडू भडंग खोबऱ्याल त्याल.. सुंद्रीच्या केसांच्या जटा झालेत. या कामातनं तिच्याकडे बघायला येळच नाही.श्यपूनन केसं चमकुन जातील.बेनी अलीकडे लईच देखणी दिसायला लागल्या... बाळ्या सुद्धा काय कमी नाही, काळा सावळा असला तरी तरतरीत दिसतोय. मास्तर सांगत हुतं पोरगं दुसरीला हाय पर इंग्रजी फाडफाड बोलतयं.. रखमाचा ऊर भरून आला. तिला वाटलं, माझ्यासारखी सुखी मीच....
पण अचानक दाताखाली जीभ चावली गेली. आई ग तो बोका हाय की घरात टपूनच बसलेला असतो... पैशाच्या वासावर. त्याच्या नजरला नाय पडलं म्हणजे बरं... उद्याच सगळं सामान आणून ठेवते म्हणजे 22 तारीख आगदी दिवाळी गत जाईल.. बिगीबिगी रखमा घरी पोचली .पोरं वाटच बघत होती .आये खायला काय आणलीस?? तुम्हाला काय आणू बाबांनु.. जरा तुमच्या बाच्या मागं बी लागत जावा की... आणि अचानक शेंबूड वडत नाक पुसत बाळ्या वरडला, आये , तुला सांगून ठेवतो बघ.. द्यायचं असंल तर दे खायला, न्हायतर राहुदे.. पण उगाच नको त्या माणसाचं नाव नको घेऊ.... मला हसू आवरेना. आपला लोक लईच शाना झाल्यासारखं वाटलं तिला.. आणि कमरेला अडकलेलं कुरकुरेचं पाकीट काढून दोघात वाटून घ्या म्हणून सांगितलं.. तशी ती दोघं पळाली रखमा लगबगीने स्वयंपाकाला लागली बोका घरात यायच्या आधी पैसे दडवून ठेवणं भाग होतं .कुठं ठेवावं तिला कळत नव्हतं. तीनदा उतरणीला ठेवलेले पैसे पुन्हा-पुन्हा काढून ठेवत होती. चिंधित बांधून ठेवत होती .पुन्हा तिथंणं काढत होती. अडीचशे रुपये तिला अडीच हजारा सारखं वाटत होतं. इतक्यात नवरा डुलत आला. बाहेरूनच रखमाला लाखोली वाहत आला.. तिला ते नित्याचं होतं .
तो आत येताच तीन ते पैशाचं गाठुळ जळण्याच्या कोपऱ्यात टाकलं. ते त्या बोक्याच्या नजरेतून सुटलं नाही. आणि त्यांन जीभळी चाटायला सुरुवात केली .गालातल्या गालात हसत म्हणाला, रखमे जेवायला दे काहीतरी.. त्याचा सौम्यपणा पाहून तिलाही बरं वाटलं त्याला गपगुमान तिनं जेवायला दिलं. जेऊन तो अंगणातच पसरला.रखमानं गडबडीत बाळ्याला सुंदरीला हळूच बोलवलं.ताटलीत अर्धी भाकरी हाताने मुरगळून घातली. हाताने बारीक केली आणि वर आमटी वतली. वरपा.... म्हणाली ..तशी ती दोघं बिना आवाज करता बाकडं बघत बघत वरपू लागले. रखमानपण एवढ्यात उरकून घेतलं .आवाज न करता भांडी भरून ठेवली. तिथेच फाटकी वाकळ टाकली .दोघांना दोन्ही बाजूला घेऊन झोपी गेली. दिवसभरच्या कामाने कंटाळून गेल्यामुळे तिघेही झोपेच्या आधीन गेली .बाहेरचा बोका मात्र एक झोप काढून ताजा झाला होता .योग्य संधीची वाट बघत होता. एका अंगावरुन आतला अंदाज घेत होता .सगळी गाढ झोपली होती .तो हळूच उठला. वाटतच बाळ्या झोपला होता .घोटभर टाकल्याने त्याचा तोल जात होता. न आवाज करता जळणाच्या कोपऱ्यात हात घातला.. आणखीन जरा चाचपल्यावर हाताला कापडाचं गाठोड लागलं ..नि त्याचं डोळे चमकलं त्यांन ते गाठोड घेतलं गड जिंकल्याचा आनंद झाला. कधी एकदा घराबाहेर पडेतो असं झालं.. आणि आणि त्या नादात त्याचा पाय बरोबर पडला तो बाळ्या च्या हातावर.. मेलो मेलो.... बाळ्या वरडला.. सुंद्रु रडू लागली. रखमाला झोपत काय कळना. तसा बाळ्याचा बाप पळाला..बाळ्यानं वळखलं कुणीतरी चोर आसंल..... दुसरीतलं पोरगं त्याला पकडायं पळू लागलं. आई वरडली बाळ्या ,पळू नगंस माघारी फीर..
गाव जागा होईल या भीतीनं बाळ्याच्या बानं एक धोंडा घेतला आणि बाळ्याला हानला.. बाळाच्या कपाळाला भोक पडलं ..रक्ताची धार लागली ..आणि इतक्यात आई ग... मेलो.. म्हणून बाळ्याचा बा वरडला त्यानच फेकलेल्या दारूच्या बाटल्याच्या काचा पायात गुडघ्यात व अंगात घुसल्या होत्या. त्याला उठताही येईना ...हातातलं पैशाचं गटुळ ही लांब पडलं होतं ..हळूहळू रखमाच्या लक्षात सारं आलं. बाळ्याच्या कपाळाचे रक्त आठून घट्ट झालं होतं. रखमा येत होती.. शांतपणे पैशाचं गाठोडं घेतलं नि हात पाय घासत म्हणाली मुडद्या.. चांगले मराणं येणार नाही तुला... बांगड्या भर बांगड्या .............पोरा बाळांच्या मुखातला घास हिसकावून घेतूस व्हय.... कुठं पापं फेडशील? पड रात्रंदिवस करोनाच उचलून नेऊ दे तुला.......असं म्हणत ती शिव्याशाप देत होती.
बाळ्याचा बाप वरडत होता ,अगं अंगातल्या काचा तरी काढ की गं ..लय दुखतय ग..रखमा बघायला लागली तसं एक हात सुंद्रीचा व एक हात रखमाचा धरुन बाळ्या घराकडे नेऊ लागला.. घरी गेल्यावर रखमांनं ठरवलेला सर्व बाजार केला .घरात गोडधोड केलं .असं वाटत होतं आज दिवाळीच आहे बाळ्याचा बा अजून तिथंच पडला होता. आज 22 तारीख होती .तीन ताट केली होती .आज ताटात बरंच काय काय होतं वरण-भात शिरा कुरुड्या... ताटावर सगळी गपगार होती कोणी जेवना..बाळ्यान तिकडे बघितलं नि म्हणला, अजून एक ताट करा. आणि तो बा ला आणायला बाहेर पडला. आई आणि सुंद्री हसल्या.. स्वाभिमानपेक्षा संस्काराचा विजय झाला होता...
