खंत
खंत
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
इंदुमतीबाईनी सुधाकररावासोबत 45वर्षांचा सुखीसंसार करून समाधानाने लेकी,सुना, नातवंडांच्या गोतावळ्यात अखेरचा श्वास घेतला. त्या गेल्यानंतर मात्र सुधाकररावाना त्यांच्या आठवणीत दिवस वैऱ्यासारखा भासू लागला..... एक दिवस त्यांचे नीटनेटके ठेवलेले कपाट त्यांनी उघडले आणि सापडली एक जीर्ण,जुनी डायरी...सुंदर अक्षरांत कितीतरी कविता लिहिल्या होत्या इंदुमतीने...
लळा जिव्हाळा शब्दच केवळ...
कुणा न कळले माझे हे मन
हातातून जो सुटून गेला..
मुठीत परतून येईल का क्षण...
अजून मनावर असे कोरले
जुन्या आठवांचे ते गोंदण...
दोन किनारे दोघे आपण.....
सुधाकररावांना एकदम गदगदून आले...
वडिलांच्या मागे तीन बहिणी उजवताना,तिन्ही मुलांचे पालनपोषण आणि फिरतीची नोकरी करताना,संसाराच्या रामरगाड्यात इंदूला केवळ गृहीतच धरले होते.. तिच्याही काही आशा आकांक्षा असतील हे कधी विचारातच घेतले नव्हते त्यांनी. इंदुमती पैलतीरावर पोचल्यानंतरच खऱ्या अर्थाने ती त्यांना कळली होती. ... ..
सुधाकररावांना पहिल्यांदाच तसबिरीमधल्या इंदुमतीच्या हसऱ्या चेहऱ्यामागची खंत जाणवली होती.