गिधाड
गिधाड
का ! नाव उच्चारायला सुद्धा
किळस वाटते !
संपवून टाकलत ना आम्हाला !
अरे, तुमची मेलेली गुरं-ढोर
खाऊन आम्ही एकापरीने
तुमचा परिसरच स्वच्छ करित होतो
तुमच्या जिवंत गुरांवर आम्ही कधी
वक्र द्रुष्टी टाकली नव्हती
मग, तुम्ही का उठलात आमच्या जिवावर ?
नको तेवढी लोकसंख्या वाढविलीत
आणि आमच्या रानांना सुद्धा
आपली गावठाण बनविलीत
मेलेल्या ढोरांचा वास येऊ नये
म्हणून त्यावर विषारी औषध टाकू लागलात
किंवा त्यांना पुरू लागलात.
अरे ! मग आम्ही जगाव कशावर ?
कारण निसर्गानेच आम्हाला एवढं
दुबळ बनवलय की नाही आम्ही
पक्षीराज गरुडासारखे शिकार करू
शकत, नाही कावळ्या चिमण्यांसारखे
उष्ट्याखरकटांवर जगू शकत.
पण हे मानवां नको आनंदूस
स्वतःच स्वतःची संख्या
बेसुमार वाढवून
तू निसर्गाचा तोल ढाळलास
माझ्याच प्रमाणे इतर अनेक पशु-पक्ष्यांचा
तुझ्यामुळे अंत होत आला आहे
आणि तू मात्र निर्धास्त निर्ढावला आहेस
पण, तुला काय वाटलय, आमच्या
शिवाय तुझ्या जिण्याला काही अर्थ आहे !
नाही रे…
अरे, एकाच परमेश्वराची आपण लेकर
ज्याने तुम्हाला बनविले त्यानेच
आम्हाला निर्माण केले
ह्या पृथ्वीवर जगण्याचा जेवढा तुम्हाला
हक्क आहे तेवढाच आम्हालाही आहे.
बुद्धीमतेच्या जोरावर तू जरी
आमचा विनाश करित असलास तरी
लक्षात ठेव, ह्या गिधाडाचे हे निर्वाणीचे बोल
गिधाडांना दूरदृष्टी असते हे तुला
रामायणापासून ठाऊक आहे
त्याच दूरदृष्टीने मी तुझे भविष्य वर्तवितो की,
“ ज्याप्रमाणे तुम्ही ह्या पृथ्वीतलावरील
एक एक पशू-पक्षी नामशेष करित
चालला आहेस, तसेच एक दिवस
तुम्ही आपापसांत क्षुल्लक पाण्याच्या,
देशाच्या सीमेच्या किंवा धर्माच्या
नावाने लढून मराल आणि तेव्हा…
तेव्हा, तुमची ती कुजत ,सडत
पडलेली प्रेत खायला आम्ही
मात्र शिल्लक नसणार”.