प्लॅस्टिक हटाव
प्लॅस्टिक हटाव
सरकार दरबारी झडली चर्चा दिला त्यांनी नारा
प्लॅस्टिकला आता कुणी देऊ नका थारा
दवंडी ऐकली मात्र अंगावर आला शहारा
आठवणींच्या भुतावळींनी फेर धरला गरारा
आठवली ती काळरात्र सव्वीस जुलैची काळी
काळोखातच कित्येकांना तिने धाडिले पाताळी
मुसळधार पावसाच्या कोसळत होत्या सरींवर सरी
क्षणोक्षणी वाढत होते पाणीच पाणी वरी वरी
पळून जायचे म्हटले तरी जागाच उरली नव्हती
हाहा: कार आक्रोशाने थरकापलेलो होतो आम्ही
मग या आक्रीताची केली कारणमीमांसा
तेव्हा त्याच्या मुळाशी माणसाचीच करणी आसा
वाट वाहत्या पाण्याची अडवली होती कुणी ?
तर इकडून तिकडून सरसावलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांनी
तोंडामध्ये कोंबले बोळे बोलतीच बंद झाली
नदी,नाले,ओढे यांची मुस्कटदाबी झाली
जलप्रलय होताच मग सरकार जागे झाले
अवघ्या प्लॅस्टिक जगतावर कोसळून की पडले
सर्वच प्लॅस्टिक पिशव्यांवर लादली गेली सर्रास बंदी
आणि भल्याभल्यांची मात्र उडाली घाबरगुंडी
प्लॅस्टिकवरती बंदी येताच नाना सबबी झाल्या सुरू
याचे त्याचे म्हणणे ऐकता मन लागले विचार करू
प्लॅस्टिक नव्हते तेव्हाही जगतच होतो आपण
आणतच होतो वाणसामान ,भाजी आणि कापड
तेव्हा असायच्याकी आपल्या साध्या कापडी पिशव्या हातात
रंगीबेरंगी काही तर राहायच्या ऐटीत खिश्यात
फाटायची नव्हती भीती नि सांडायची नव्हती धास्ती
पुन्हा पुन्हा वापर त्याने कच-याचीही वाढ नव्हती
तेव्हा आता नागरिकांनो,'इको फ्रेंडली' होऊ या
अडगळीतल्या पिशव्यांना हवा पाणी दाखवू या
टाकून द्या एकदाच सारा प्लॅस्टिकचा तो पसारा
जुन्या कपड्यांमधून वाढवा पिशवी उद्योग न्यारा