नशीब
नशीब
जन्माच्या सहाव्या दिवशीच म्हणे
सटवाई लिहिते, नशीब आपल्या भाळी
अन् बरे वाईट असते आपले नशीब
साराच दोष देत असतो आपण कपाळी.
घडलं काही विपरीत की दोष देतो
नशिबाला अन् गुमान राहतो पडून
नियतीपुढे काही नाही चालत बाबा
आपणच म्हणतो स्वतःला गप्प बसून.
माझ्या मते, लिहिले असेल सटवाईने!
पण आपण स्वस्थ का म्हणून बसायचे?
असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी
म्हणून उगीच चूपचाप नाही राहायचे.
आपला हात जगन्नाथ लक्षात ठेऊन
स्व बलावर सगळी कामे उरकुन घावी
देव देवता व नशीब असू द्या नावाला
स्वतःची हिंमत,विश्वासावर खात्री असावी.
आंधळे पांगळे नशिबाला कोसतात का?
आत्मबलाचा विजय आपण पाहतोच
नशीब असलं वाईट तर त्यावर मात
करून जगणे माणसाचा धर्म असतोच.
नशीब म्हणून काढू नका वेगळा अर्थ
हातावरच्या रेषांवर ठेऊ नका भरवसा
स्वकर्तृत्वावर आणि आत्मविश्वासाने
विसंबून येऊ द्या विजयाचा कवडसा.