द्वंद्व
द्वंद्व


माणूस एक असा प्राणी आहे जो काहीही करू शकतो. त्याने ठरवले तर अशक्य असं काहीही नाही. डोकं लढवून, मन लावून केलेले काम नेहमीच यशस्वी होते, लहानपणापासून असेच आपल्याला शिकवण्यात आले आणि ते खरे देखील आहे म्हणा. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही क्षण असे येतात जेव्हा त्याला सुचत नाही की निर्णय मनाने घ्यायचे की डोकं लढवून? सूर्या शेट्टीच्या आयुष्यात ही काही काळापासून असेच होत आले आहे.
सूर्या शेट्टी लहानपणापासूनच एक हुशार आणि होतकरू मुलगा होता. मुंबईमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेला सूर्या अभ्यासासोबतच सामाजिक कार्यातदेखील सक्रिय होता. सूर्या जे काही काम करत असे ते अगदी मनापासून करत असे आणि आपलं १००% देण्याचा प्रयत्न करत असे.
आजकाल सूर्याचे कसल्याही कामात लक्ष नसे. त्याचा चेहरा नेहमीच पडलेला असायचा. एक अतिउत्साही असलेला सूर्या अचानक मावळलेला सूर्या दिसत होता. काहीच मार्ग सुचत नसल्यामुळे शेवटी त्याच्या एका जवळच्या मित्राने त्याच्याशी बोलायचे ठरवले. या मित्राचे नाव होते गौरव. तिसरीत असल्यापासून गौरव आणि सूर्या एकत्र होते. खूप खोदून विचारल्यावर सूर्याने त्याच्या आयुष्यात घडलेल्या काही गोष्टी सांगितल्या. गोष्ट तशी सामान्यच आहे कारण कधी ना कधी सर्वांच्याच आयुष्यात हे द्वंद्व घडतच.
सूर्याचे मन, सूर्याचं डोकं आणि सूर्या यांच्यातील “लव्ह ट्रायंगल” कसं त्याच्या आयुष्यातील समतोल बिघडवत होते या संदर्भातील काही किस्से त्याने गौरवला सांगितले.
सूर्याच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घडामोडी सूर्याच्याच शब्दांत —
– गोष्ट १ –
मी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालो. अपेक्षेप्रमाणेच मला घवघवीत यश मिळाले होते. मी मित्रांमध्ये चांगलाच प्रसिद्ध होतो. पण आता माझ्याभोवती मुलीदेखील फिरू लागल्या होत्या. त्यातच माझी ओळख स्वप्नालीशी झाली. स्वप्नाली सुंदर होती पण अभ्यासात तिचा हाथ थोडा तंग होता. अभ्यासात तिला माझी चांगली मदत मिळेल या आशेने तिने माझ्याशी आपली असलेली ओळख वाढवली. आपण मैत्रीची सीमा ओलांडून कधी पुढे गेलो हे मला कळलेच नाही. आता आम्ही दोघेही सतत एकत्र राहण्याचे कारण शोधत होतो आणि एकाच कॉलेजमध्ये असल्यामुळे आम्हाला अशा संधीची वाट बघत बसायची गरज नव्हती. आमच्या भेटीगाठी आता अधिकच वाढल्या होत्या. यातच आमची बारावीची परीक्षा आली. स्वप्नालीला तिच्या दहावीपेक्षा खूप चांगलेच गुण मिळाले होते पण मी मात्र बॅकफूटवर गेलो होतो.
मी तसा मूळ कर्नाटकचा आणि स्वप्नाली राजस्थानची. स्वप्नालीच्या बोलण्याने आणि वागण्याने मला माहित होते की तिचा परिवार आमच्या नात्याला कधीच होकार देणार नाही. माझ्या डोक्याने मला तसे संकेत दिले होते पण मी मनापासून स्वप्नालीवरप्रेम करू लागलो होतो. माझ्या मनाने माझ्या डोक्यावर पूर्णपणे ताबा घेतला होता. या नात्यातील सर्व निर्णय मी आपल्या मनाने घेत होतो. माझं मन मला सतत विचारत होतं, “अरे सूर्या, मी तुला कधी चुकीचा सल्ला देईन का?” आणि तसेच माझं डोकं मला वारंवार सांगत होतं की यात मी गुरफटलो जाणार आणि झाले देखील तसेच. एका दिवशी अचानक स्वप्नालीने मला सांगितले आपल्यातील सर्व नातं संंपलं. या सर्व घडामोडींमुळे मी भलताच हादरलो होतो. माझं मन आणि डोकं यामधील युद्धात कोणीही जिंकले किंवा हरले असेल पण माझ्या आत्मविश्वासाचा मात्र दारुण पराभव झाला होता.
– गोष्ट २ –
स्वप्नाली प्रकरणामुळे माझ्यामध्ये भरपूर बदल झाले होते पण माझ्या महत्वाकांक्षामध्ये मात्र काही बदल झाला नव्हता. मला माहित होते मला माझ्या आयुष्यामध्ये काय हवे आहे फक्त ते मिळवण्यासाठी जो मार्ग मी निवडला होता तो मला स्वतःला साजेसा नव्हता. मला आपल्या शालेय दिवसापासून अभियंत्रक (इंजिनिअर) व्हायचे होते. मी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवला. माझे मन मला सांगत होते की मी एक चांगला कॉम्प्युटर इंजिनिअर बनू शकतो पण मला कॉम्प्युटर क्षेत्रात प्रवेश न मिळता टेलीकम्युनिकेशन मध्ये प्रवेश मिळाला. माझ्या डोक्याने मला म्हटले, ”मी आजपर्यंत तुझी साथ सोडलेली नाही. काय झालं जर तुला कॉम्प्युटर इंजिनिअर बनता आले नाही, माझा वापर करून तू एक चांगला टेलीकम्युनिकेशन इंजिनिअर नक्की होशील”. चार वर्षाचे अभियांत्रिकी शिक्षण घेऊन मी टेलीकम्युनिकेशन इंजिनिअर झालो तर होतो पण आपलं लहानपणापासून असलेले स्वप्नं पूर्ण झाल्याचा आनंद मात्र माझ्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. तेव्हा माझ्या मनाने टोमणा मारला.. “तुला ही माहित होते तुला काय करायचे आहे पण तू माझ्यावर विश्वास नाही दाखवलास. तुझ्या डोक्याने तुझ्यावर पूर्णपणे ताबा घेतला होता. तुझ्याकडे तुझ्या स्वतःच्या मनाचा कौल ऐकण्यासाठी वेळच नव्हता“. माझं मन आणि डोकं यामधील युद्धात कोणीही जिंकले किंवा हरले असेल पण मी मात्र कमालीचा निराश झालो होतो.
– गोष्ट ३ –
मी आता २३ वर्षांचा झालो होतो. स्वप्नाली नंतर माझा प्रेम या शब्दावरूनच नव्हे तर भावनेवरून देखील विश्वास नाहीसा झाला होता. या काळात मी काही अप्रतिम असे मित्र-मैत्रिणी जमवले. आता मी स्वप्नाली प्रकरणाला मागे टाकून आयुष्याकडे नव्याने पाहू लागलो होतो. मी पूर्णपणे आधीसारखा राहिलो नव्हतो पण जी प्रगती होत होती ती पण काही वाईट नव्हती. माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींमध्ये एक विशेष अशी मैत्रीण झाली होती.. तिचे नाव होते पूजा. पूजा आणि माझ्यामध्ये मैत्री पेक्षा वेगळंच काहीतरी शिजतंय हे आमच्या दोघांच्या मित्र-मैत्रिणींना माहित होते पण आम्ही दोघं हे कधीच मान्य करत नव्हतो. मला आयुष्यात काय हवे हे पूजाला माहित होते आणि असं म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, पूजाला माझ्या यशामागची ती स्त्री व्हायचे होते. मी देखील आपल्या आयुष्यातील निर्णय घेताना आता पूजाकडून सल्ले घ्यायचो.
पूजाचा वाढदिवस होता आणि तिला काहीतरी सरप्राईज द्यायचे असे ठरवले. पूजाला शिरा जाम आवडायचा आणि म्हणूनच आपल्या हाताने शिरा करून तिला सरप्राईज द्यायचा बेत मी आखला. ठरल्याप्रमाणे मी शिरा बनवला आणि पूजाला दिला. पूजाला वाटले माझ्या घरी शिरा बनवला होता आणि त्यातूनच थोडासा मी तिच्यासाठी आणला. पूर्ण शिरा संपल्यानंतर पूजाकडून शिऱ्याची स्तुती ऐकण्यात मला एक वेगळाच आनंद मिळत होता. अगदी निघताना मी पूजाला सत्य काय ते सांगितले. पूजाला तर विश्वासच बसेनासा झालं होतं. शिऱ्याच्या या यशस्वी प्रयत्नानंतर आता मी इंटरनेटच्या मदतीने नेहमीच काही ना काही बनवायचो आणि सगळेच आपली बोटं चाटत. इकडूनच आता मला पुढे शिकायची इच्छा झाली. मी हॉटेल मॅनेजमेन्टचे शिक्षण घ्यायचे ठरवले होते. पूजाचं मत मात्र वेगळं होतं. माझा अर्थ व्यवहार म्हणजे असं ज्याला काही तोडच नाही आणि म्हणूनच पूजाचं आणि मला ओळखणाऱ्या प्रत्येकाचं मत असंच होतं की मी ‘फायनान्स’ मधून मॅनेजमेन्टचे शिक्षण घ्यावे. पूजाने आणि इतर माणसांनी माझ्या डोक्यात भरले होते की मी जितकं उत्तम फायनान्स मॅनेजमेन्ट करू शकतो तितकं इतर काहीही नाही करू शकत. माझ्या आयुष्यात परत एक द्वंद्व होतं – डोकं म्हणत होतं फायनान्स मॅनेजमेन्ट आणि मन – हॉटेल मॅनेजमेन्ट. मला स्वतःला विश्वास होता की मी उत्तम फायनान्स मॅनेजमेन्ट करू शकतोच पण मला आता मनाचं ऐकायचं होतं आणि झालं देखील तसंच. मी यशस्वीरित्या हॉटेल मॅनेजमेन्टचे शिक्षण पूर्ण केलं. माझं मन आणि डोकं यामधील युद्धात मन जिंकले किंवा डोकं हरले हे ठरवता आले नाही पण मी मात्र खुश होतो.
– गोष्ट ४ –
माझे हॉटेल मॅनेजमेन्टचे शिक्षण पूर्ण झाले होते आणि आता मी कामावर देखील जाऊ लागलो होतो. घरात उत्पन्न देखील बऱ्यापैकी जमा होत होते. मला स्वतःचं असं काहीतरी उद्योगधंदा करायचा होता आणि म्हणूनच मला माझ्या कामावर इतके प्रेम नव्हते. मी माझे काम इमानदारीने करायचो पण उद्योजक होण्याची माझी इच्छा मला कुठेही स्वस्थ बसू देत नव्हती. माझी ही इच्छा देखील पूजाने ओळखली होती. तिचं म्हणणं होतं तुला जे करायचे ते कर पण आपला कामधंदा न सोडता कर. कामधंदा असल्यामुळे तुला महिन्याअखेरीस तुझा पगार वेळेवर मिळतो पण तुझा उद्योगधंद्याला जम बसेपर्यंत तुझ्या उत्पन्नाचं काय? माझ्या आयुष्यातील इतर महत्वाच्या व्यक्तींनी देखील हाच सूर लावला. माझ्या डोक्याला यासर्वांचं म्हणणं पटत होतं पण मन मात्र स्वस्थ बसू देईना. माझ्या आयुष्यातलं हे एक नवीन द्वंद्व होतं – डोकं म्हणत होतं कामधंदा आणि मन – उद्योजक. मी आजही कामधंदाच करतो. माझं मन आणि डोकं यामधील युद्धात डोकं जिंकले किंवा मन हरले हे ठरवता आले नाही पण मी मात्र आतून मरत होतो.
– गोष्ट ५ –
मी आता एका पंचतारांकित हॉटेलमध्ये चांगल्या हुद्द्यावर कामाला होतो. माझं पूजाशी लग्नदेखील झालं होतं. पूजासुद्धा चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावर कामाला होती. आमच्या संसाराचा गाडा अगदी आनंदात चालला होता. त्यातच पूजाची बढती झाली होती. नवीन पद अधिकच जबाबदारीचे होते. ही बढती स्वीकारणे म्हणजे पूजाचा प्रवास वाढणार होता आणि माझ्यापासून ती तितकंच लांब जाणार होती. तिने नेहमीप्रमाणे माझं मत विचारलं. माझ्या वैवाहिक आयुष्यात द्वंद्व होतं – डोकं म्हणत होतं पूजाला जाऊ दे. तिच्या कारकिर्दीसाठी ते खूप लाभदायक ठरणारं होतं आणि आमची आर्थिकपरिस्थिती देखील सुधारली असती आणि मन म्हणत होतं – तू तुझ्या बायकोपासून लांब नाही राहू शकत आणि तिला ही बढती स्वीकार असे मत नको देऊस. यावेळी मी मागचा पुढचा विचार न करता माझ्या डोक्याचं म्हणणं ऐकलं आणि पूजाला बढती स्वीकारण्याचे मत दिले. पूजाने देखील माझा शब्द पडू दिला नाही आणि तिने ती बढती स्वीकारली. माझं मन आणि डोकं यामधील युद्धात डोकं जिंकले किंवा मन हरले हे ठरवता आले नाही पण मी मात्र पूजाच्या आठवणीत असायचो.
सूर्याच्या आयुष्यातील या घडामोडी गौरवला माहित होत्या पण त्याला नेहमी वाटत होते की सूर्याने अगदी ठामपणे घेतलेले हे निर्णय आहेत. त्या निर्णयामागचं द्वंद्व आज गौरवला कळले होते. सूर्या आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणून बोलू लागला "गौरव, मला माहित आहे की माझं मन आणि माझं डोकं दोघंही माझ्यावर अपार प्रेम करतात आणि त्यांची अशीच इच्छा असते की मी खूश असावं आणि यशस्वी व्हावं पण हा लव्ह ट्रायंगल कधीही एका यशस्वी प्रेम कथेमधे रूपांतरित होणार नाही कारण परिस्थितीनुसार मला कधी माझ्या डोक्याचं ऐकावंसं वाटतं तर कधी मनाचं. ज्याला हा समतोल सांभाळता आला त्याच्या आयुष्यामधील उत्कंठात नाहीशी होणार असं मला वाटतं.”
तुमच्या इथे ही लव्ह ट्रायंगलचं द्वंद्व असेलच…