लिहून ठेवलं होतं
लिहून ठेवलं होतं
लिहून ठेवलं होतं वहीच्या एका कोपऱ्यात नाव तुझं..
आजूबाजूच्या सगळ्या 'द्वैत' जगात आपल्यातलं 'अद्वैत' जपता येईल अशी एक जागा शोधत होतो मी, ती तिथं मिळाली मला..
आणखीन काहीच नव्हतं त्या कोपऱ्यात तुझ्याविषयी..
फक्त नाव होतं तुझं...
खूप वर्षं ते पान जपून ठेवलं होतं मी..
लेखकाला मनातलं सगळं मांडायची संधी असते...
पण मला खूप लिहायचंच नव्हतं तेव्हा... गरजच नव्हती त्याची...
कारण तेव्हा तू प्रत्यक्ष होतीस आयुष्यात...
तुझं लिहलेलं नाव ही माझ्यासाठी तेव्हा फक्त एक खूण होती तुझ्या अस्तित्वाची..
पण आता मात्र खूपच अर्थ मिळालाय, महत्व आलंय त्या वहीच्या कोपर्याला...
काळाच्या ओघात सगळंच बदललं..
पण मनाच्या कोपऱ्यात मात्र त्या वहीच्या कोपऱ्याची आठवण अजूनही तशीच ताजी आहे...
त्या दिवशी भेटलो तेव्हा तीन-चार वाक्य जास्त बोललो होतो आपण एरवीपेक्षा..
त्या आनंदात माझ्या आयुष्याचं तेव्हाचं ध्येय उतरवलं होतं मी कागदाच्या कोपऱ्यावर....
असो...
आज तू नसलीस म्हणून काय झालं ?
वहीचा कोपरा ही तसाच आहे.. त्यावरचं नावही तसंच आहे..
मात्र आता ते अदृश्यात आहे... तुझ्यासारखंच....