कर्जमाफी हवी आम्हांला......
कर्जमाफी हवी आम्हांला......
नरेन्द्रा -उद्धवा "अच्छे दिन "
आम्ही म्हणू तरी कशाला ?
वेतन नको , पेन्शन नको
कर्जमाफी हवी आम्हांला.....
शेतकऱ्याचा आर्त टाहो कधी
तुम्हाला दिसत नाही ;
सरकार कोणतेही असो
आत्महत्या आमच्या टळत नाही .
आमच्या करुण किंकाळ्या
कानात तुमच्या शिरत नाही ;
खोट्या मलमपट्टी शिवाय तुम्ही
दुसरं काही करत नाही .
असं खोटं सांत्वन करून
जखमेवर मीठ चोळता तरी कशाला?
वेतन नको, पेन्शन नको
कर्जमाफी हवी आम्हांला......
शेतकरी वेडा खुळा असतो
अशी सर्वत्र ओरड आहे ;
सरकारशी भांडता भांडता
विरोधकांच्या घशाला कोरड आहे .
विरोधी बाकावर बसल्याविना
आमचे डोहाळे कोणाला लागत नाही ;
आमच्या कळवळ्याचे खोटे पुराण
दुसरे कोणी सांगत नाही .
अशा खोट्या सहानुभूतीने
खुर्चीचे भांडवल करता तरी कशाला ?
वेतन नको ,पेन्शन नको
कर्जमाफी हवी आम्हांला......
" आई जेवू घालीना बाप मरू देईना"
अशी आमची गत आहे ;
कृषिप्रधान देशातील शेतकरी
बुडवायचा अघोरी बेत आहे.
पिकले अन न पिकले काय
आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही;
नवा दिवस नवे संकट
आणल्याशिवाय येत नाही .
असं आम्हांला मारून स्वतःच्या
तिजोऱ्या भरता तरी कशाला ?
वेतन नको ,पेन्शन नको
कर्जमाफी हवी आम्हांला.....
पॅकेज व कोरड्या आधाराचे
शब्द सत्ताधीशांच्या गळी आहेत ;
दूरदर्शन वरील "ब्रेकिंग न्यूज "मध्ये
आमचे" लाईव्ह बळी "आहेत .
आमची कर्जमाफी म्हणजे सरकारी
तिजोरीतील" धन की बात "आहे ;
माजी मुख्यमंत्र्यांची जनतेबरोबर
थेट "मन की बात " आहे .
असे "डर्टी पॉलिटिक्स" करून
जनसेवा करतात तरी कशाला ?
वेतन नको ,पेन्शन नको
कर्जमाफी हवी आम्हांला.....
सावकार- व्यापाऱ्यांकडून नेहमी
आम्हांस " चंदन " असते ;
आमच्या कर्जमाफीवरून
लोकप्रतिनिधीत रणकंदन असते .
मल्ल्या- मोदीसारख्या कर्जबुडव्यायांना
आपल्या देशात कर्जमाफी आहे ;
त्यामानाने शेतकरी कर्जमाफी
अनेकपटीने सोपी आहे .
असा भेदभाव समतेच्या राष्ट्रात
करतात तरी कशाला ?
वेतन नको, पेन्शन नको
कर्जमाफी हवी आम्हांला........
आमच्या कष्टाचे- घामाचे
रक्त आम्ही कितीदा सांडू ?
आमच्या नरकयातना
सरकार दरबारी कितीदा मांडू ?
कृषिप्रधान भारत आपला
तेव्हाच महासत्ता होईल ;
जेव्हा शिवकाळातील रयतेची
बळीराजाची सत्ता येईल .
अशा शिवशाहीच्या खोट्या
करता तरी कशाला ?
वेतन नको, पेन्शन नको
कर्जमाफी हवी आम्हांला.....