घुसमट
घुसमट
का कुणास ठाऊक पण आज भयंकर उदास वाटू लागलंय...
कुठेच मन लागत नाही
मित्राने मन मोकळे करताना एक मोठा सुस्कारा सोडला
सालं सारं काही न मागता मिळालंय रे आयुष्यात पण...
खरं सांगू आई - वडिलांना सुखाचे क्षण नाही देता आले याची खंत आहे,
नोकरी निमित्त सततची भटकंती करावी लागली
ज्यांनी जन्म दिला, शिक्षण करून पायावर उभे केले, त्यांनाच विसरलो
यार शपथ कधी कधी ना स्वतःची लाज वाटते यार
आपण साले होपलेस...
आई-वडिलांना साधा वेळ देऊ शकत नाही
की त्यांच्या नातवंडांना घेऊन गावाकडे यावे त्यांच्याशी हितगुज करावे,
गतकाळातील चांगल्या - वाईट गोष्टींना उजाळा द्यावा, आई-बाबांच्या
अपेक्षा असतील ना रे आपल्याकडून त्यांच्या?
तो अंतःकरणातून बोलत होता...
मी उगाच त्याला समजावण्याच्या सुरात
आपल्याकडे वेळ कुठे असतो यार म्हटले...
पण तो सांगत होता ते ही खोटे नव्हते...
वेळ काढला तरच मिळेल ना?
हा प्रश्न मनाला चाटून गेला...
खरंच ज्यांनी अंगा खांद्यावर खेळवले, पोट पाण्याला लावले
काहीही अपेक्षा न करता आपल्या सुखातच सुख मानले...
अन आपण त्यांना सुखाचे काही क्षण देऊ शकत नाही
मी विचारात पडलो
तसे त्याने खांद्यावर हात ठेवत म्हटले...
तसं पाहिले तर सर्वकाही आहे माझ्याकडे
पण मी आई शेवटचे आयुष्य सुखी समाधानाचे क्षण नाही देऊ शकलो रे
हे शल्य मला शेवटपर्यंत राहील यार तो म्हणाला...
मी जाऊ दे ना यार झालं गेलं ते उगाळून काय हाशील?
तो आणखीनच भावुक झाला...
नाही यार माझ्या आईने माझ्याकडे शेवटपर्यंत काहीही मागितले नाही...
एवढेच काय कधी गावाकडे येत जा बाबा माझ्या नातवंडांचे तोंड दाखवत जा म्हणत राहिली
पण मी वेळ नाही सुट्टी नाही कारणे शोधत तिची ही छोटीशी इच्छासुद्धा पूर्ण करू शकलो नाही...
कायम तिच्या भावना, मन यांचा विचार न करताच आपलाच हेका करत राहिलो...
गेली बिचारी एकदाची...
आई जाऊन एक वर्ष झाले पण अजूनही तिचा फोन येईल, असे सारखे वाटते...
म्हणत तो डबडबल्या डोळ्यांनी दूर पाहत राहिला...