ताई...
ताई...
आज घरी साफसफाई करता करता अचानक लहानपणीच्या फोटोंचे अल्बम हाती लागले.त्यातील प्रत्येक फोटो मागे एक आठवण दडलेली होती.अल्बम हाताळता हाताळता ताई आणि माझा तिच्या लग्नातील फोटो माझ्या नजरेस पडला.आई नंतर ताई ही अशी व्यक्ती असते की तिला आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगता येतात,तिला आपले सगळे सीक्रेट माहीत असतात.पण जेव्हा तिचा लग्न ठरता आणि ती आपल्याला सोडुन सासरी जाते तेव्हा आपल्याला फार दु:ख होते. मला अजुनही आठवतोय तो दिवस जेव्हा ताई मला सोडून जाणार होती.
“ मी गाढ झोपेत होतो.अचानक माझ्या कानावर आवज आला, ‘गौरव.... गौरव उठ लवकर शाळेत नाही का जायचे तुला?’परंतु मला काही जाग येई ना.काही वेळा नंतर ताई माझ्या बाजुला येउन बसली आणि डोक्यावर हात फिरवत तिच्या गोड आवाजात म्हणाली ‘गौरव उठ बाळ वाजले बघ किती ? शाळेत नाही का जायचे?’ तिच्या स्पर्शात जणु मी वेगळ्याच प्रकारची जादु होती.डोळे उघडताच तिचा मनमोहक चेहरा माझ्या नजरेत पडला आणि माझी झोप जशी उडूनच गेली.ताईला एक घट्ट मिठी मारली आणि मी अंघोळीला गेला.ताईने माझ्या साठी छानसा नाश्ता करुन ठेवला होता.मी नेहमी प्रमाणे नाश्ता करुन शाळेत गेलो.शाळेत आम्हााला 'माझी बहीण’ ह्या विषयवार निबंध लिहिण्याचा गृहपाठ दिला.
मी खुप आनंदात होतो.मी ताईला ह्या बद्दल सांगण्यास उत्सुक होतो.मी घरी आलो,परंतु आमच्या घरी काही पाहुणे आले होते.बाबांनी मला जवळ बोलावले आणि पाहुण्यांना माझी ओळख करुन दिली.मी बाबांना विचारले ‘बाबा हे दादा कोण आहेत?’ बाबा बोलले ‘तुझ्या ताईचे आणि ह्या दादांचे लग्न ठरला आहे.’मला लग्ना बद्दल फार काही माहीत नव्हते कारण मी तेव्हा फक्त 12 वर्षाचा होतो,परंतु इतके माहीत होते की ताई आपल्याला सोडुन जाणार आहे कारण आमच्या शेजारच्या ताईचे ही काही दिवसांपूर्वी लग्न झाले होते,परंतु त्यानंतर पुन्हा ती घरी आलीच नाही.
पाहुणे जाताच मी ताई च्या खोलीत गेलो.ताई काही तरी विचार करत होती.मी निरागस नजरेने ताई कडे पाहत होतो.तेवढ्यात ताईची ही माझ्या कडे नजर गेली.आम्ही काही क्षण एकमेकांकडे पाहतच होतो.कदाचित ताई ही मला सोडुन जाण्याच्या विचारात असावी.ताई ने मला जवळ बोलावले आणि विचारले, ‘गौरव काय झाले? आज तु नाराज दिसतोयस? शाळेत काही झाला का?'मी ताई ला एकच प्रश्न विचारला, ‘ताई तु मला सोडुन जाणार आहेस का?’ताई ने मला टाळण्याचा प्रयत्न केला,परंतु मी पुन्हा ताईला तोच प्रश्न विचारला.तेव्हा मात्र ताईला तिचे अश्रु आवरता नाही आले.ताई खोलीतून बाहेर निघुन गेली.
तिचे अश्रुच मला खुप काही सांगुन गेले.कारण वयाच्या 4 थ्या वर्षी माझी आई गेली.मला सांभाळण्यासाठी ताईने आपले कॉलेज सोडले.बाबा कामला असायचे.ताईने माझी खुप काळजी घेतली.माझा अभ्यासही घेतला.मला आई प्रमाणे माया दिली,माझ्यावर चांगले संस्कार केले,मला नेहमी चांगल्या गोष्टी सांगितल्या.मी माझ्या शाळेतल्या सगळ्या गोष्टी तिला सांगायचो.मला ठेच जरी लागली तरी ती माझी खुप काळजी घ्यायची.पण आता ती मला सोडुन जाणार होती.
मी बाबांना खुप समजावण्याचा प्रयन्त केला.परंतु बाबा बोलले ‘गौरव ताईने तुझ्यासाठी खुप केला.ताईला एक नवीन जीवन जगू दे.तिला ही नवीन प्रवास सुरु करु दे आणि ती काही आपल्याला कायमच सोडुन नाही जाणार.ताई आपल्याला भेटलायला येइल आणि तु तिच्याशी फोन वर पण बोलु शकतोस.’बाबा बोलल्या प्रमाणे मी ताईला थांबवण्याचा प्रयत्न नाही केला.हळूहळू लग्नाचा दिवस जवळ येत गेला.लग्नाच्या आधल्या रात्री मी फार रडलो.मी ताईला त्या दिवशी एका क्षणासाठी ही एकट सोडले नाही .अखेर तो दिवस आलाच.ताईच्या लग्नाचा आनंद होताच परंतु तिच्या पासुन दुरावण्याचे ही तवढेच दु:ख होते.सासरी जाण्याच्या वेळी मी आणि ताई खुप रडलो.”
आज चोवीस वर्षानंतर ही ताई आणि मी एकमेकांवर तेवढच प्रेम करतो.आज रक्षाबंधन आहे.आज मी ताई साठी एक छानशी भेट घेतली.आज मी माझ्या ताई कडे पुन्हा एकदा जाणार आहे. मी ताईला खुप काही गोष्टी सांगणार आहे.
मी ताईच्या घरी पोहचलो.ताई च्या घरची बेल वाजवली.ताईने घरचा दरवाजा उघडला.आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारली.आम्ही खुप आनंदात रक्षाबंधन साजरा केला.ताईला मी दिलेली भेट सुद्धा खुप आवडली.