आजी...
आजी...
आदरणीय मंगेश पाडगावकर म्हणतात
आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं. शेवटचं पान मृत्यू अन् पहिलं पान जन्म असतं खरचं आहे..... आयुष्य हे क्षणभंगुर असतं ....
आजी नुकतीच आमच्यातून निघून गेली.अन् जाता जाता बालपणापासून घालवलेले ते अविस्मरणीय क्षण, त्या आठवणी ह्रदयाच्या कप्पात कुठेतरी ठेवून गेली. प्रत्येकाच्या जीवनातला आजी हा हळवा कोपरा असतो तिच्या बटव्यामुळे आरोग्य तर गोष्टीमुळे बालपण समृद्ध होतं...आज आजी बद्दलची दुःखद वार्ता ऐकून आठवण झाली आजीकडे सुट्टी मध्ये रंगलेल्या त्या गप्पांची, आजीने सांगितलेल्या विविध गोष्टींची तिच्यासोबत जगलेल्या त्या अविस्मरणीय क्षणांची मुद्दामून मी तिच्या काढलेल्या खोडयांची त्या गोड रुसव्याची, त्यांच्यासोबत साजरा केलेल्या प्रत्येक आनंदी क्षणांची .
आजी... आमच्या सर्वांवर मनापासून निस्वार्थ प्रेम करणारी. आत्मियतेने विचारपूस करून कुणाचे दुःख पाहून चटकन हळवी होणारी . नात्यातील ऋणानुबंध अगदी अलगदपणे जपून बंध आयुष्याचे विणणारी
मायेचा स्पर्श तिचा अगदी नेहमीच वाटायचा उबदार नेहमीच देत होती आश्वासक आधार, सुंदर आवाजात म्हणत होती भजन, भावगीत स्वतःची चिंता न करता सुख दुःखात धावून जाऊन निभवत होती नात्यातील प्रीत चैतन्य आणि उत्साह, उदारता
हृदयामध्ये होती आजीच्या आकाशाची भव्यता.
प्रत्येक कृतीत डोकावत होती विनम्रता किती बरं ..मनाची विशालता... किती दमली असली तरी आवर्जून विचारपूस करायची नवीन-नवीन पदार्थ बनवून खायला आणायची .
तिच्या हाताला अस्सल चव असायची. मायेचा घास ती आम्हाला भरवायची . "अतिथी देवो भव" या वाक्याचे करत होती सार्थ
कुटुंबातील असो वा बाहेरचे सर्वच होत होते तिच्यामुळे संतुष्ट... नेहमीच देत होती प्रोत्साहन पाठीवरती कौतुकाची थाप... आज अचानकच आम्हा सगळ्यांना सोडून गेली. आजी हृदयात कायम राहील तुझी वासल्यरुपी मूर्ती
डोळे पाणावले आज तुझ्याबद्दल लिहिताना...शेवटी भेट नाही झाली याची राहील खंत....कसं सांगू... केवढा राहील जीवाचा आकांत.. पण आजी तुझ्यासोबतच्या आठवणी देतील जगण्याला अर्थ, तु दिलेल्या संस्कारमुळे होईल आमच्या जीवनाचे सार्थ...
