Bharati Sawant

Others

2  

Bharati Sawant

Others

आजचा विषय - जाणता राजा

आजचा विषय - जाणता राजा

2 mins
637


   आपला जाणता राजा म्हणजे सर्व मराठी माणसाची छाती गर्वाने उंचवावी अशा या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म काळ म्हणजे महाराष्ट्राचा पर्यायाने शूर मराठ्यांच्या भवितव्याचा सुवर्णकाळच होय. अस्मानी-सुलतानी, परकीय आक्रमणे यांनी भरकटलेला समाज शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या सुरक्षित छताखाली एकत्र आणला. छत्रपती शिवराय लोकांचे राजे होते. जनतेच्या भल्याचा विचार करणारा हा राजा जनतेला आपल्यातीलच एक वाटे. शिवरायांच्या महाराष्ट्राची अवस्था 'ना घर का ना घाट का' अशी होती. आदिलशाही आणि निजामशाहीच्या क्रूर विळख्यात सर्व समाज गुरफटला गेला होता. त्याचवेळी १९ फेब्रुवारी १६३० मध्ये शिवनेरी किल्ल्यावर जिजाबाईंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला. लहानपणापासून जिजाऊंनी श्रीराम, श्रीकृष्ण, अर्जुनाच्या शौर्य कथा सांगून राजांच्या मनात स्वराज्याची कल्पना फुलवली. वयाच्या अठरा वर्षांपासून शिवरायांनी सह्याद्रीच्या कड्यावरुन किल्ले गड उभारायला सुरूवात केली. मुठभर मावळे हेच त्यांचे सैन्य. राजांजवळ शौर्य, धीरोदात्तता, सहनशीलता त्याचबरोबर उत्कृष्ट गुणग्राहकता होती. त्यांनी तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, बहिर्जी नाईक या स्वामीनिष्ठ मावळ्यांना गोळा करून आपल्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात सहभागी करून घेतले. शक्तीपेक्षा युक्ती वापरून त्याला नामोहरम केले.

      रायगडावर राज्याभिषेक करून शिवराय हिंदवी स्वराज्याचे छत्रपती बनले. सामान्य माणसाच्या सोयीकरता मराठी भाषेतून 'राज्यव्यवहावकोश' बनवला.राजांनी स्वत:ची मुद्रा निर्माण केली.अष्टप्रधान मंडळ नेमून कार्यक्षम लोकांना योग्य ती कामे नेमून दिली.शिवराय सर्वजातीधर्मांना सारखाच मान देत. त्यांच्या सैन्यात हिंदू प्रमाणे मुसलमानही होते .आपल्या आरमाराविषयीही ते जागरूक होते.राजे चारित्र्यवान होते.परस्त्रीला ते मातेसमान मानत.आपल्या शिपायांनी कोणत्याही धर्माच्या स्त्रीचा अनादर केला तर ते सहन करत नसत.म्हणूनच कल्याणच्या सुभेदाराच्या सूनेला सैन्याने कैद करून आणल्यावरही तिच्या सौंदर्याची स्तुती करून परत पाठवले आणि वरून तिला साडी-चोळी चा आहेरही दिला.

     राजांनी आपल्या आयुष्यातला क्षण न् क्षण जनतेच्या भल्यासाठी वेचला. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली.परकीयांबरोबर आप्तस्वकीय यांनीदेखील त्यांच्या कार्यात नाना विघ्ने निर्माण केली, परंतु शिवरायांनी सर्व संकटे युक्तीने आणि बुद्धिचातुर्याने परतवली, शिवराय एक आदर्श पुत्र, न्यायी राजा, जबाबदार पती आणि करारी पिता होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श समाजावर उमटला होता. अफजलखानसारख्या सरदाराचा वध,पन्हाळ्यातून शत्रूला गाफील करून पलायन, पावनखिंडीतून सुटका, शाहिस्तेखानाची माघार,आग्ऱ्याहून क्रूर अशा औरंगजेबाच्या कैदेतून सुटका असे कितीतरी प्रसंग आहेत. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात हुतात्मे झालेल्या बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे यांच्या विषयी त्यांना असणारा कळवळा गौरवोद्गार काढून व्यक्त केला आहे. अशा लोकांच्या राज्याचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न पाहून माझ्या मनात समर्थ रामदासांनी त्यांचे केलेले गुणगान स्मरते.  

 शिवरायांचे आठवावे रूप 

 शिवरायांचा आठवावा प्रताप 

 शिवरायांचा आठवावा साक्षेप

  भूमंडळी 

      ३ एप्रिल १६८० रोजी रायगड मुक्कामी राजांची प्राणज्योत मावळली पण आपल्या अलौकिक कामगिरीने ते चिरंजीव झाले. अमर पदाला पोहोचले.

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

    हिंदवी स्वराज्याचा विजय असो



Rate this content
Log in