Bharati Sawant

Others

2  

Bharati Sawant

Others

आजचा विषय- गुरूचे महत्त्व

आजचा विषय- गुरूचे महत्त्व

2 mins
676


  ज्ञानसागरातुनी अक्षर मोती

  वेचलेत मी अंजूली भरुनी

  चरणी अर्पण गुरू दक्षिणा

  सुमनांची ज्ञानार्जन करूनी


 'गुरुविना कोण दाखविल वाट' या उक्तीप्रमाणे गुरु म्हणजे शिक्षण देणारा, ज्ञानाची वाट दाखवणारा व प्रसंगी शिक्षा देणारा शिक्षक होय. पुराण काळापासून गुरु-शिष्याची परंपरा चालत आली आहे. 'गुरु म्हणजे माऊली' ' गुरु म्हणजे कल्पतरू' जन्मल्यावर बोट धरून चालायला शिकवणारी माऊली म्हणजे पहिला गुरू होय. ती लहानपणापासून आपणास संस्कारांचे, सदाचाराचे धडे देते. चुकल्यास समजावून सांगते, ओरडते आणि काठीने मारते देखील. पण तिच्या सद्वर्तनाचे धडे देऊन आपण शाळेत पाऊल टाकतो. गुरूजवळील ज्ञानाचा साठा शिष्याला वाटुन वाढतच जातो.

   गुरुची महती सांगून सरणार नाही. प्रत्यक्ष ब्रम्हा-विष्णू-महेश याचे एकत्र रूप म्हणजे गुरू .आपणा सर्वांना गुरुबद्दल नितांत आदर असतो. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हणतात. गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचे फल म्हणून आपण गुरुपौर्णिमेला त्यांना फूल किंवा एखादी भेट देऊन कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच एकलव्यासारखे शिष्य गुरुदक्षिणा म्हणून त्यांच्या इच्छेप्रमाणे आपल्या उजव्या हाताचा अंगठा क्षणाचाही विचार न करता कापून देतात.

 'धन्य ते गुरु ,धन्य ते शिष्य आणि धन्य त्यांची गुरुभक्ती'‌. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी आश्रम शाळा चालवायचे.त्यामुळे शिष्यांना आश्रमातच रहावे लागे. त्यानुसार सर्व कामे स्वावलंबी पद्धतीने करावी लागत. त्यामध्ये सरपण गोळा करून आणणे,सडासारवण, साफसफाई व स्वयंपाक पाण्यात ऋषिपत्नीना मदत करणे या कामांचा समावेश असे. त्यांना वेद ,शास्त्रे, पुराणे तसेच धनुर्विद्या ,सदाचार यांचे ऋषी धडे देत. वरचेवर परीक्षा देऊन शिष्याच्या बुद्धिमत्तेची चाचणी होई.

   चाचणीत पास होणारा विद्यार्थी सर्वगुणसंपन्न होऊन आश्रमातून आपल्या घरी जात असे. महाभारत कालीन मोठे विद्वान वेदव्यास हे प्रचंड प्रसिद्ध आचार्य होते. त्यांचे इतके ज्ञानी, व्यासंगी गुरु आजपर्यंत झालेले नाहीत अशी आपली श्रद्धा आहे. आपण ज्यांच्याकडून ज्ञानार्जन करतो त्यांचा आदर राखणे, त्यांना मान देणे व त्यांच्या कार्याची कीर्ती वाढवणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे परम कर्तव्य आहे. गुरूंनी दिलेल्या विद्येमुळे आपण समाजात, कुटुंबात राहायला आर्थिक प्राप्ती करण्यास सक्षम झालेलो आहोत याचे सदोदित स्मरण रहायला हवे.

      आपली प्रगती कुठवर आली किंवा पुढच्या शिक्षणाविषयी माहिती आपल्या गुरूला सांगणे किंवा आपल्या सद्वर्तनाचे दर्शन गुरूला दिल्याने गुरूला ते सुखावह वाटते. आपल्या शिष्याची प्रगती गुरूला त्याचे कार्य करण्याची प्रेरणा देते. पूज्य साने गुरुजींनी म्हटले आहे की गुरू आपणास ज्ञानाच्या गाभाऱ्यात घेऊन जातो व ज्ञानाशी एकरूप करून टाकतो. विद्यात विद्या आत्मविद्या, गुरुत गुरु अध्यात्म गुरु,गुरूपूजन ,गुरु स्मरण म्हणजे सत्याचे, ज्ञानाचे पूजन होय. हीच गुरूच्या महान कार्याची, महान स्थानाची ऋणमुक्तता होय. म्हणूनच कवी म्हणतात 'गुरुविण कोण दाखविल वाट '


Rate this content
Log in