उगीचच
उगीचच
मी वैतागतो, चिडतो, आणि पेटून उठतो..
या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बंड करण्यासाठी..
काय चूक आहे आणि ते कसं चूक आहे हे लगेच दाखवून देतो..
सोशल मीडियावर...
हां.. !
लाइक, कमेन्ट किंवा शेअर करतो एखादी 'शहाणी वाटणारी' पोस्ट..
मी माझ्या मनात असलेलं (आणि बरेचदा नसलेलंही) सगळं लिहून टाकतो फेसबूकच्या भिंतीवर..
निषेध म्हणाल तर तो वरचेवर करतच असतो की मी..
व्हॉट्सअॅपचा डीपी बदलून..
महागाईचे दर नवनवे विक्रम मोडत असताना माझा तर अगदी भडका उडतो एलपीजी सारखा..
मग सरकारची बाजू मांडणाऱ्यांविरुद्ध तर मी दंड थोपटून उभा राहतो आणि तावातावाने भांडायला लागतो..
मी असलं हल्ली काहीएक सहन करतच नाही..
सहन होतच नाही मुळी..
अपघात झाला किंवा कुणी भांडत असलं की मी मोबाईल घेऊन शूट करतो आणि सगळ्यांत आधी अपलोडही करतो बरं..
कसं आहे..! आपल्याच्याने जे शक्य आहे ते कर्तव्य पार पाडायचं आपण..
खरंच अमाप 'समाधान' मिळतं मला त्यातून..
बाकी रॅली, निषेध मोर्चे, यांना मी असा ऑनलाईन पाठिंबा देतच असतो.. काळ्या फिती बांधून सेल्फी काढून निषेध अपलोड करतो.
माझा ज्वलंत देशाभिमान आणि कर्तव्यनिष्ठा दाखवून देतो जेव्हा संधी मिळेल तेव्हा..
हां.. आता या सगळ्या धावपळीदरम्यान सिग्नलला थांबताना माझी गाडी मी झेब्रा क्रॉसींगवर थांबवली तर फार काही बिघडत नाही..
सिग्नल मोडला जात नाही..
मी मोडतच नाही..
उलट ट्रिपल सीट जाताना उन्हात उभं असलेल्या हवालदार मामांना एक बिस्लेरीची बाटली देऊन जातो..
त्यांच्या सेवेत माझाही आपला खारीचा वाटा मी उचलतो..
चित्रपटगृहात राष्ट्रगीत लागलं की आवर्जून उभं राहतो मी.. घरी मॅच बघताना राष्ट्रगीत लागलं की मी चॅनल बदलतो थोडा वेळ.. ते कसं असतं.. घरी थोडं रीलॅक्स झालेलं चालतं हो!
सकाळी उठलो आणि पेपर वाचला की मनातला निखारा असा फुलायला लागतो.. ऑफिसला जाताना व्हॉट्सअॅप वरचे फॉरवर्डेड मेसेजेस वाचून त्याची धग वाढत जाते..
मग दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत माझ्यातली धग मशाल बनून धगधगायला लागलेली असते..
उरलेला दिवस मी जमेल तितकं पोस्ट करताना आणि चहा घेत काम चालू असताना रंगलेल्या गप्पांच्या वेळेस माझ्या सोशल मीडियाच्या अभ्यासाने ज्वलंत झालेल्या विचारांची 'आग' ओकतच असतो..
संध्याकाळी गर्दीचे धक्के खात खात घर गाठेपर्यंत मात्र माझ्यातल्या मशालीची मेणबत्ती झालेली असते..
माझ्याभोवती वास्तवाचं मेण साचलेलं असतं.. जे पाहण्याची मला उसंतच मिळाली नव्हती त्या सगळ्या रहाटगाड्यात..
वाण सामानाच्या यादीतलं सगळं सामान मी 'परप्रांतीयाच्या' दुकानातून निमूट गोळा करतो आणि घर गाठतो..
आता मी फक्त नावाला फडफडत असतो..
उरला सुरला..
उगीचच..
खरंतर आता मला अजून पेटायचंच नसतं..
रात्री जेवून मी विझतो..
निखारा जपून ठेवतो आत खोलवर कुठेतरी..
उद्या सकाळी उठून मला पुन्हा पेटायचं असतं..
उगीचच..!