स्वातंत्र्यवीर सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर
मी मुक्तामधले मुक्त, तू कैद्यांमधला कैदी।
माझे नि तुझे व्हायाचे, ते सूर कसे संवादी?
माझ्यावर लिहिती गीते, या मंद-समीरण लहरी।
माझ्यावर चित्रित होते, गरूडाची गर्द भरारी।।
जड लंगर तुझिया पायी, तू पीस कसा होणार?
माझ्याहून आहे योग्य, भूमीला प्रश्न विचार।।
आभाळ म्हणाले ‘नाही’, भूमिही म्हणाली ‘नाही’।
मग विनायकाने त्यांची, आळवणी केली नाही।।
पापण्यांत जळली लंका, लाह्यांपरि आसू झाले।
उच्चारून होण्याआधी, उच्चाटन शब्दां आले।|
दगडाची पार्थिव भिंत, तो पुढे अकल्पित सरली।
‘मी कागद झाले आहे, चल लिही’ असे ती वदली।|
-कवी मनमोहन
[संग्रहीत] यापुढे ...
माझ्या लेखणीने प्रयत्न केलाय यापुढील कथा काव्यात मांडण्याचा .
घेऊन सिद्ध तो झाला, अद्भूत लेखणी हाती
मग दीपशिखा शब्दांची त्या भिंतीवर अवतरली
निपजली काव्यरत्ने ती त्या निव्वळ एकांतात
शब्दांच्या सामर्थ्याची जणु ठेव मर्मबंधात
रोषाची तपती ज्वाला घेऊन कुणीसा आला
क्षणभरात पुसुनी काव्ये विजयोत्सव करून गेला
यःकश्चित नव्हते दुःख पुसल्याचे विनायकाला
कोरला शब्द अन् शब्द होताच मुखोद्गत त्याला
तो क्रांतीकारक योद्धा तो असीम प्रतिभावंत
तो गेला लिहून काव्ये जी अमर्त्य कालातीत
आकाश अता खंतावे अन् झुरते धरा मनाशी
ये नकार जिव्हेवर का पण कागद होण्यासी