नारी तू नारायणी
नारी तू नारायणी
अनादी काळापासून स्त्रीचे होते एकच भावविश्व
चूल व मूल सांभाळत जगणे एवढेच होते तिचे अस्तित्व.
एका बंदिस्त चौकटीत राहण्याची होती लक्ष्मणरेषा
उंबरठा ओलांडणे, अभिव्यक्त होणे ही अप्राप्य आशा.
मग स्त्रीच्या दबक्या हुंदक्यांचे शब्दरूप बनले फुले, आगरकर
हळूहळू स्त्रियांचाच बसू लागला विश्वास स्वशक्तीवर.
स्त्री वेदना , संवेदना प्रकट केल्या शांताबाईंच्या काव्यात
स्त्रीशिक्षणाची मशाल धरली सावित्रीबाईंनी हातात.
तळपू लागल्या आसमंती राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी, जिजाबाई
वैद्यकीय क्षेत्रात आनंदी तर न्यायदानात अव्वल ठरल्या रमाबाई.
उत्तुंग एव्हरेस्ट सुद्धा बचेंद्री, कृष्णा, अरुणिमा ने केला सर
कल्पना चावला, सुनीता ने तर अंतराळातच मारला सूर.
सुवर्णकन्या पी टी उषा ,मेरी कोम, अंजलीने गाजवले मैदान
सर्वच क्षेत्रात स्त्रीशक्तीने घातले धुमशान.
कालची अबला नारी ,आजची तलवार, लेखणी हाती घेतलेली नारायणी
घेतली उत्तुंग भरारी लखलखती जणू जिवंत सौदामिनी.
वेचले तिने वाटेतले काटे, हिमतीने केली दूर स्वअगतिकता
आत्मसन्मानाची ज्योत घेऊन नेले पाऊल पुढे दाखवली निर्भीडता.
तीच अन्नपूर्णा, तीच लक्ष्मी, तीच नवदुर्गा, तीच महिषासुरमर्दिनी
आता तरी जीवनाची सर्व सुखे, हक्क, आदर अर्पू तिच्या चरणी.