मनोगत वसुंधरेचं!! ( दीर्घ काव्य )
मनोगत वसुंधरेचं!! ( दीर्घ काव्य )
अवनी, धरती ,मही,रसा
वसुधा,वसुंधरा,धरित्री,धरा
पृथ्वी,क्षोणी,भू,भुमी
अशा अनेक नावांनी संबोधताय मला
आणि भुमाता ,धरणीआई म्हणून
मायेचं स्थानही देताय मला
अन म्हणूनच आईसारखी मी सुद्धा
करते तुमच्यावर जिवापाड माया
त्यासाठीच तुम्हा साऱ्या लेकरांच्या पालनपोषणातील मुलभूत गरजा
भागवण्याच्या प्रयत्नात असतेय मी सदा
पण पुरेपूर प्रयत्न करुनही
यश येत नाही माझ्या हाती
कारण कुशीत घेतलेल्या अंकुरांना
पुरेसा मिळत नाही ओलावा
मग ती बीजांकुरं करपतात,होरपळतात
त्यामुळे होत नाही पुरेसा धान्यपुरवठा
अन समाधानी पाहू शकत नाही मी तुम्हाला
ही आकाशाला भिडू पाहणारी महागाई
मी तर दूर करू शकत नाही
त्यामुळे तुम्हा लेकरांचे होणारे हाल
पाहून मी ही होते बेहाल
काही लेकरं माझी नोकरदार
पैसे मोजून होतात खरेदीचे हकदार
पण काही मोलमजुरी करणारी लेकरं
काय करणार? कसं जगणार?
अशा विचारांनी मी होतेय बेजार
माझी सेवा करणारा बळीराजा
राबराबतोय उन्हातान्हात
कष्ट करतोय दिनरात
नांगरणी पासुन लावून आस
घरात येणाऱ्या माणिकमोत्यांची रास
स्वप्नात बघत असतोय खास
पण हातातोंडाशी येणारा घास
कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ
हाणून पाडतोय हमखास
अन मग माझा बळीराजा
कर्जाच्या ओझ्यानं होवून हताश
न्याहळीत बसतोय मोकळं आकाश
अखेर जीवावर होवून उदार
निघून जातो जगण्याच्या सीमेपार
हे सारं पाहून घालमेल होतेय जीवाची
वाटतय अशी कशी मी लेकरांची आई ?
असा प्रश्न पडल्यावर
केलय मी सूर्याशी हितगुज
तेव्हा तो मला घाली समज
" अग,मी तर माझ काम चोख करतोय
तुझ्या भू भागावरील सर्वच पाण्याची पुरेपूर वाफ करतोय
पण अधीक वाफेसाठी
तुझ्याकडे पुरेसे पाणी नाही गं "
मग मी गेले मेघाकडे
" मेघा मेघा ,का रुसलास ?
येतांना असा का थबकलास ?"
मेघ म्हणाला,
" मी काय करू ?कसा बरसू ?
मी तर बरसण्यासाठी आतूर असतोय सदा
पण मला मिळत नाही गारगार हवा
वृक्षांवाचून ती कोण देणार मला ?
तुझ्या लेकरांनी तर जंगलतोड करून
सिमेंटची जंगलं उभारून
शितलसा गारवा हिरावून
आपल्यात आणलाय जणू दुरावा घडवून "
हे सारं ऐकून झालाय माझा हिरमोड
पण माझ्यासह सूर्य ,हवा,पाणी अशा
पर्यावरणीय रुपांनी आहे आमची जोड
म्हणून गेले होते लावून ओढ
पण माझ्या लेकरांची चूक
माझ्याही ध्यानात आली आपसूक
अरे लेकरांनो ,
या झाडांमुळेच माझी धूप थांबते,
झीज भरुन निघते,कस वाढतो
अन साऱ्या सजीव सृष्टीला जगण्यासाठी लागणारा श्वासही मिळतो
पण आज मी पाहतेय
महामार्गांचं होणारं चौपदरीकरण
त्यासाठी रचलं जाणारं झाडांचं सरण
पण त्यात होतय माझच मरण
महामार्गात येणाऱ्या जमीन मालकांना तर
मोबदल्यात मिळतोय किमती खजाना
पण माझं काय ?कोणीतरी विचार करतय का माझा ?
रस्त्यात येणारी आधी लावलेली,
काही आपोआप उगवून वाढलेली
महावृक्ष अन वेली
जेसीबी नं केली जातात
सर्रास माझ्या पासून वेगळी
तेंव्हा उन्मळून पडलेल्या वृक्षांची मुळं
माझ्यातून निघतांना
नाळ तुटल्याच्या यातना
होतात अंतरमनाला
अन हेलकावतात संवेदना
तरीही तन-मनान खचून न जाता
माझ मन मला म्हणतय
मीच अशी खचले तर
माझ्या सजीव सृष्टीचं काय होणार?
नाही ,नाही काही हरकत नाही
घेईन मी परत गरतीचा साज
पण त्यासाठी हवी मला तुमची साथ
हे बघा लेकरांनो,
होणारे अपघात टाळावेत,प्रवास सुखकर व्हावा,वेळ वाचावा
यासाठी जरुर करा महामार्गांच चौपदरीकरण
पण रस्त्यावरील अन ओसाड जागेवरील
तोडलेल्या वृक्षांच्या दुपटीनं
करायला हवय तुम्ही वृक्षारोपण
अन ' एक मूल एक झाड'
असा उपक्रम प्रत्येकानं
राबवलाय प्रतीसाल
तर मी परत हिरव्यागार वनराईनं
नटणार,सजणार,मोहरणार
मेघराजालाही गार गार हवा मिळणार
मग तो आनंदानं बरसणार
माझी सारी जलाशयं काठोकाठ भरणार
मग धोंडी बनण्याची वेळ
माझ्यावर कधीच नाही येणार
नेहमीच लाभण्या असा पर्वणी सोहळा
मागतेय मी वृक्षारोपण अन् संवर्धनाचा जोगवा !!!