मी ना अमृता ..
मी ना अमृता ..
अमृतासारखं ..
तुझ्या उघड्या पाठीवर
मी 'साहिर'लिहिणार नाही .
किंवा तू चहा पिऊन ठेवलेल्या
कपाला मी ओठही लावणार नाही .
अशरीरी प्रेम ..
वगैरे वगैरे उपाध्यापण लावणार नाही .
मी अमृता नाही अन् तू इमरोज ..
कारण ..माझ्या आयुष्यात ..साहिर नव्हता .
थोडंसं धाडसच हेही म्हणण्याचं .
पण आता हे सगळं
बदलायला हवं ना?
'मैत्री' च्या व्याख्येचा परीघ
थोडा रुंदावायला हवा ना?
त्याच त्या रुढी, कल्पना
आकुंचित वृत्ती ..
सगळं स्वच्छ असून ..
आक्रसायला होतं .
मनातल्या विचारांना
अभिव्यक्ती स्वातंत्र्य
मिळायला हवं ना ?
हे बोलण्याचं 'धाडस'
करतेय मी ..
कारण ..
सखा फक्त 'कृष्ण'च होऊ शकतो ..
असं नाहीये हे उमगलं होतं
स्वानुभवानं ..
तुझ्या रुपानं सखा मिळाला तेव्हाच ..