कविता म्हणजे....
कविता म्हणजे....
कधी रिमझिम तर कधी मुसळधार पाऊस...
कधी ग्रीष्मातलं ऊन तर कधी वसंतातला बहर...
कधी अवसेचा काळोख तर कधी शरदातलं चांदणं...
कधी प्रेमाचा वर्षाव तर कधी लालबुंद संताप...
कधी मायेचं वात्सल्य तर कधी मनातलं शल्य...
कधी अलवार मोरपीस तर कधी धारदार शस्त्र...
कधी सुखदायी झरा तर कधी निराळ्या रंगाची होळी....
कधी पानझड तर कधी नवं पल्लवीत वृक्ष...
कधी नवा जन्म तर कधी वार्धक्यातलं जगणं....
कविता म्हणजे,
प्रत्येकाच्या मनातल्या भावनांचा वाहणारा पुर....
प्रत्येकाच्या आयुष्याच्या बासरीतला फुंकरीचा सुर...
कविता म्हणजे,
प्रत्येकाच्या अनुभवाची सप्तरंगी उधळण...
प्रत्येकाच्या सुख - दुःखाची मुक्त अशी कोसळण....
कविता म्हणजे,
यशापयशाचे हेलकावे घेणाऱ्या लाटा....
फुललेल्या निवडूंगाने भरलेल्या वाटा...
कविता म्हणजे,
भावनांच्या असण्याची जाणीव,
जी मोजताही येत नाही
अन् त्यापासून पळताही येत नाही...
कविता म्हणजे,
आयुष्य, ज्याची सुरुवात अन् अंत असतोच,
पण तो ठरवता येत नाही....
कविता,
संपूर्ण जीवनाचं सार याच "कविता" नावाच्या असंख्य, अमाप पानांच्या पुस्तकात असतं...
ज्याचं प्रत्येक पान निराळं असतं... निर्मळ असतं.... निःस्वार्थ असतं...
अशी पुस्तकं बांधताही येत नाही अन् सोडताही येत नाही....
कारण,
तिच्या आयुष्याची पानं विस्कटलेलीच बरी असतात...
पान पान एकत्र करून अनेक आयुष्य शब्दांशाने तिच्याच (कवितेच्या) उदरात जगविण्यासाठी......!!
