जाती अंत
जाती अंत
माणूस म्हणून सांगा इथे कुणास आहे स्थान ?
जातीच्या नावाखाली इथे पेटले आहे रान
जो तो उठतो अन जातीचे मोर्चे काढतो
जाती बंद करण्याचा विषय मात्र कटाक्षाने टाळतो
उच्च वर्णीयाच्या पोटी जन्मला जरी करंटा तरी तो असतो उच्चच
शूद्रांच्या पोटी जन्मलेला महापुरुषही ठरतो नीच्चच
कुठले हे समीकरण अन कुठला हा न्याय ?
वर्षानुवर्षे होत आहे जातीच्या नावाखाली फक्त अन्यायच अन्याय
देवाचीच सारी लेकरे असे तुम्हीच म्हणता ना ?
मग देव्हाऱ्यात देवाच्या आमचा विटाळ होतो का ?
एक रिंगटोन वाजली म्हणून एका निष्पापाचा नाहक बळी गेला
सांगा तेव्हा तुमच्यातला माणूस का मेला?
मग आहे का अजूनही या देशात स्वातंत्र्य अन सुरक्षितता?
मानवतेला गाडून आजही मिरवतेय फक्त जातीयता
अरे या जातीच्या नावावर आपण महापुरुषांनाही सोडलं नाही
विचार त्यांचे पायदळी तुडवून देतो आहोत त्यांचीच ग्वाही
माणसांचे काय घेऊन बसलात राव आपण तर या जातीच्या वाटणीत कुणालाच नाही सोडलं
गाय , नारळ , सूर्य झाले हिंदूंचे
अन बकरा , खजूर , चंद्र यांना मुसलमान म्हणून घोषित केलं
संविधानाने दिलीय आम्हाला समान संधी जगण्याची
पण शिकून कितीही मोठे झालो तरी जात नाही जात शाळेच्या दाखल्यावरची
खरंच जर आपण सुशिक्षित भारतीय असू तर एक मात्र करू या
लहानसहान मोर्चे काढण्यापेक्षा आता जातीअंतासाठी एक महामोर्चा काढू या
कॅशलेस भारत करण्यापेक्षा कास्टलेस भारत घडवू या ,
आता भारतीय हीच जात अन मानवता हाच धर्म मानू या