गाव
गाव
मनाच्या कप्प्यात दूर कुठेतरी
वसते आठवणीतले गाव
बालपणीच्या सुखद क्षणांचा
घेतला जातो तेथे ठाव
साध सरळ सोप
जीवन होतं अप्रुप होतं फार
माणसं होती मायेची, प्रेमळ
व्यवहार नव्हता न होता व्यापार
प्रमाणात पैसा, सुख होते अमाप
सुविधा कमी पण संस्कार खूप
लोक कमी पण
सहवास लाभे भरपूर
घड्याळ्याच्या काट्यावर चालणारे जग नव्हतं
तरीही वेळेवर सगळ
बिनचूक होतं
काळ बदलला, वेळ बदलली, माणसं बदलली
बदलत्या काळानुसार गावही बदलत गेले
आपुलकीच्या ओलाव्याला अलगदपणे पुसत गेले
काल जिथे मैदानी होती
आज तिथे मॉल आहे
हरवलेले बालपण चार भिंतीच्या आत आहे...
वाटे अजूनही जावे
आपल्या त्या गावास
हरवलेल्या गावांमध्ये आपुलकीचा शोध घ्यावयास
पण बदलले जरी गाव तरी बदलली नाही नाती
अजूनही साद घालते
गावाकडची माती...