आठवणी
आठवणी
आठवणीचं नातं प्रत्येकाचं वेगळं असतं
पुस्तकातल्या मोरपिसासारखं मनाला
ते हळुवार स्पर्श करून जातं
कधी कोवळी सकाळ तर
कधी हळवी व्याकूळ सायंकाळ
आठवणींचं मनात वेगळेच एक विश्व असतं
भर दुपारीही उन्हात कधी चांदणं दिसतं
आठवणीत मन फुलपाखरासारखं
स्वच्छंदी फिरत असतं
प्रत्येक वळणावर आठवणी आहेत
प्रत्येक आठवणीला एक वय
जणू हे आपणास सांगत असतं
आठवण येताच बालपणाची
मन अगदी निरागस होऊन जात
मनातल्या विचारांचा, गुंतलेल्या भावनांचा
आभास देऊन जातं
सौख्याचा, दुःखांचा,संगमाचा
असलेल्या आठवलेल्या आठवणीचा
थोड मागून मागे वळून बघितलं
की प्रत्येक क्षण हा सोहळा बनून जातं
आठवणी अशाच असतात
गडद फिकट रंगाच्या
धाग्यात प्रसंगानुरूप आपल्याला त्यांचा रंगत ठेवणाऱ्या
सुगंधापरी हृदयात जपण्यासाठी
सुखदुःखाच्या रिमझिम पावसात कधी भिजण्यासाठी
एकांतात खूप काही बोलण्यासाठी
पाणवलेल्या पापण्यांना मायेचा स्पर्श देण्यासाठी...
बेधुंद त्या क्षणांना घालूनी मग साद
आरक्त भावनांचा लेवून साज मनही
त्या अविस्मरणीय आठवणींत मग रमून जात..