Shobha Wagle

Others

3  

Shobha Wagle

Others

यशोदा

यशोदा

12 mins
773


साडेपांच वाजून गेले. कारखान्याचा भोंगा वाजला . सगळ्यांनी कामे आवरती घेतली. आता मुकादम कडून पैसे घ्यायचे व घरी जायचा विचार यशोदेच्या मनात आला. तिही लगबगीने बाकीच्या बायकां बरोबर निघाली व रांगेत उभी राहिली. आज मुकादम एक एक नाव पुकारून त्यांना बोलवत होता. यशोदाचे नाव पुकारणार असे तिला वाटले पण, त्याने दुसरीचेच नाव घेतले. ती दोन पावलं मागं सरकली. थोडं माग पुढे झालं असेल म्हणून गप्प राहिली. पण आता दोनच बायका राहिल्या तरी तिच नाव मुकादम घेईना. तिला आता शंका येऊ लागली. हो बाप्या जाणून भुजूनच करतया असे तिला वाटले व न राहून तिने विचारले " साहेब माझा नं?" मुकादमने न एकल्या सारखे केले. व आपण कामात मग्न असल्याच दाखवू लागला

आता शेवटची एक बाई राहिली. तिलाही अंगठा घेऊन पैसे दिले. व नंतर बोलला यशोदे तू जरा थांब. "कशा पाई, मला भी घरला जायची घाई हाय. लई वगत झालायं साब.'अगं तुझ्या नवऱ्याचच काम आहे. दोन यिनिटं थांब." पण साहेब त्या बाया थांबल्यात की माझ्या पाई" त्यांना जायला सांग. "आता मोठे साहेब येणार आहेत. त्यांना तूझ्याशी बोलायचं आहे. थांब मी आलोच." अस सांगून मुकादम निघाला. सगळ्याजणी निघाल्या पण तिची खास मैत्रीण निशा मात्र तिच्या संगत राहिली. दोघी गप्पा मारत होत्या एवढ्यात मुकादम चहाचे दोन गाल्स घेऊन आला. व एक यशोदेला दिला. "निशा तू कां नाही गेली घरी? आता तुला पण उशीर होईल ना? " हो साब पण यशोदेला कशी एकटी ठेवायची. आम्ही दोघं भी संगतीन जाऊ घरला.' "बरं बाबा 'घ्या माझ्यातला पण थोडा चहा ' असे म्हणून मुकादमने आपल्या कपातला थोडा चहा त्याने तिच्या गाल्सात ओतला. मुकादम चहा पित होता पण त्याचा तिळपापड झाला होता. आज नामी संधी साधली होती पण निशा बयेने सारा घोटाळा केला. प्रत्येक बाईला पैसे देताना अंगठा लावायच्या वेळी तो त्यांचा हात घरायचा व त्या बायांना पण लई राग यायचा. पण यशोदेचा त्याला हात धरता यायचा नाही. पहिल्या दिवशी बाकीच्या बाया प्रमाणे तिचा अंगठा पकडायला लागला तेव्हा यशोदेने हात माग सारला व बोलली साहेब पेन द्यावा की मी सई करतेयं. तेव्हा तो चक्रावला होता.

  

गेल्या दिवाळीच्या वेळेची गोष्ट. नंदन, यशोदेचा नवरा कारखान्यात कामाला होता. चांगला होतकरू व प्रामाणिक कामगार होता. साहेबाची पण त्याच्यावर मर्जी होती. त्याला सगळीच कामे अवगत होती व त्यामुळे कारखान्यात तो सर्वांचा आवडता होता. कुणाचे काही अडले तर तो मदत करायला तत्पर असायचा व त्याच्या अशा वागण्यानेच त्या दिवशी तो अपघात घडला. काळू ज्या मशिनवर काम करत होता त्यात काहीतरी बिघाड झाला. त्याने खूप प्रयत्न केले, त्याला ते नीट करता येईना व त्यामुळे बाकिच्यांची कामे अडत होती. त्याने नंदनला हाक मारायचा अवकाश. नंदनचे त्याच्या खटाटोपाकडे लक्ष होतेच. तो त्याच्या मदतीला धावला. तो तेथे पोचे पर्यन्त मोठा आवाज झाला व वरची मोठी ट्रॉली कोसळली ती नेमकी धावत येणाऱ्या नंदनवरच. नंदनचे दोन्ही पाय त्याखाली चिरडले गेले. सगळीकडे हाहाकार माजला. धोक्याचा भोंगा वाजला. काम थप्प झाले. अँबुलन्स मागवली व नंदनला हॉस्पिटलमध्ये नेले. मालकांनी सगळे सोपस्कार केले पण नंदन दोन्ही पाय गमावून बसला व एक दीड महिन्यानी घरी परतला. जिवावरचे पायावर निभावले होते.

‌तो दीड महिन्यांचा काळ यशोदेने कसा काढला फक्त देवाला माहीत. किती आनंदात होती ती! ती छोट्या कृष्णाशी बोलत बोलत कामे उरकत होती. "आता कृष्णुल्याचा बा येनार हाय. चाय घेऊन छान दुकानामंदी जाऊ, छान छान कापडं आनू. दिवालीला सायबावानी दिसंल माझं लेकरू", असे सुंदर मनसुबे ती रचत होती. पण विपरीत घडले. नंदनच्या अपघाताने सगळा गोंधळ व घाबरगुंडीत दिवाळी सरली. तिला सुरुवातीला सगळ्यांनी मदत केली पण नंतर हळूहळू सगळे पांगले. कारखान्यातल्या साहेबांनी सगळा हॉस्पिटलचा खर्च व थोडे जास्तीचे पैसै दिले व नंतर यशोदेला कारखान्यात कामावर पाठव असे सांगितले.

तीन चार महिने यशोदाची खूपच धावपळ झाली. नंदन कॉटवर झोपलेलाच असायचा. कृष्णाला शेजाऱ्यांकडे देऊन यशोदा बाहेरची कामे करायची. मालकाने दिलेले पैसे संपायला आले होते. नंदन आता काम कसे करेल? सगळ्या संसाराची जबाबदारी यशोदेलाच सांभाळावी लागणार होती. आता हात पाय हलवल्या शिवाय काही होणार नाही, हा विचार तिच्या मनात आला. तशीच ती नंदनला बोलली, "अवो, मी काय म्हनते, तुमच्या कंपनी मंदी जाऊन येती. त्यांनी म्हटलं व्हतं, नोकरी देनार हाय. आज जाऊन येती. काम गावलं तर बरं व्हईल. बाजूच्या आजी म्हनल्या जा म्हनून. त्या कृष्णाला सांभाळतील व तुम्हांसनी बी काही लागलं सवरलं तर बघीन म्हनत्यात." "बरं हाय, पण अजून थोडं दिस थांब." नंदन ने तिला थांबवलं. नंदनचा ठाम विश्वास होता, आज ना उद्या साहेब यशोदेला कामावर बोलवणार. तिनं स्वतः जाऊन कामाचं विचारणं काही बरोबर नाही, म्हणून त्यानं तिला थांबायला सांगितले.

आणि खरोखरच दुसऱ्या आठवड्यात कंपनीचा माणूस निरोप घेऊन आला. आता सोमवार पासून यशोदेला कामावर जावं लागणार होतं. ती आनंदली त्याच बरोबर तिला काळजी ही वाटू लागली. आताच नंदन कुबड्या घेऊन चालायच बघतोयं पण त्याला खूप त्रास होतोय. आपण गरीब माणसं, तो लाकडाचा पाय आपणास कुठून परवडणार? आणि तिथं काम तरी काय असेल म्हणा? असे सगळे विचार एकामागे एक तिच्या डोक्यात येऊ लागले व तिचा जीव वर खाली होऊ लागला. समोरची निशा पण त्याच कंपनीत कामाला होती. ती तिच्याकडे गेली. तिच्याकडून काम विचारून घेतलं व सोमवार पासून दोघांनी बरोबर जायच ठरवलं.

नंदनने पण कंपनीची माहिती तिला करून दिली. कसं काय बोलायचं, कसा साहेबाचा मान ठेवायचा, मुकादम विचित्र माणूस आहे, त्याच्यापासून सांभाळून रहा, अशा सगळ्या सुचना तिला दिल्या गेल्या.

सोमवारी भल्या पहाटे उठून यशोदाने सगळी कामे आटोपली. नंदनला चहा नाश्ता दिला. कृष्णाची पण सगळी खाण्या पिण्याची व्यवस्था केली. दुपारचं जेवण गरम करून दोघे पण जेवा असं सांगून ती निशा बरोबर कंपनीत जायला निघाली.

कंपनीत अगोदर मुकादमशी तिची मुलाखत घडवली. त्याने तिला सांगितले, दोन महीने ते बघतील तिला कसं काम जमतंय ते. काम पण दिवसाच्या पगारावर असेल. खाडा केला तर पैसे मिळणार नाहीत. अर्ध्या दिवसाच्या कामाचे अर्धेच पैसे मिळतील. ह्या सगळ्या गोष्टी ऐकून तिने काम स्वीकारले. काम काही जास्त कष्टाचे वा जास्त जोखमीचे नव्हते. इकडचा माल तिकडे, आणि तिकडचा इकडे. हे उचल, ते उचल. पण उसंत मुळीच नव्हती. दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत जेवणाची सुट्टी व साडेपाचला काम बंद. आपला दिवसाचा पगार घ्यायचा व घरी जायचं.

पहिल्या दिवशी अंगठा लावण्यासाठी मुकादम तिचा हात धरू लागला तेव्हा तिने सांगितले, "साब, पेन द्यावा की, म्या सई करतय", तेव्हा तो चक्रावला होता. तेव्हापासून तिचं मुकादमवर बारीक लक्ष होतं. "ह्यो मुकादम लई वंगाळ वागतुया. लई बेकार मानुस हाय", असं ती येताना निशाला बोलली. तेव्हा निशा म्हणाली, "अगं, समदीकडं अशीच मानसं हायत, आपण. जपून राहायचं. त्यासनी दुकवायचं नाय, नायतर नोकरी जाईल नं?" यशोदेला तिच म्हणणं पटलं नाही, पण ती त्यावर आणखी काही बोलली नाही. दोघी घरी परतल्या व घरच्या कामात गुंतल्या. पहिल्यांदाच ती कृष्णाला सोडून गेली होती. कसं काय जमलं असेल याची धाकधूक तिला होती. पण सगळं नीट झालं होतं. शहाण्या पोरासारखं कृष्णाने नंदन कडून सर्व करून घेतलं होतं. जेवल्या नंतर आईच्या कुशीत झोपतो तसा तो नंदनच्या कुशीत झोपला होता. नंतर उठल्यावर आजी त्याला आपल्या घरी घेऊन गेली होती. यशोदा घरी गेली तेव्हा सुद्धा तो आजीकडेच खेळत होता. नंदन तिला म्हणाला सगळी कामं आधी करून घे, मग त्याला आणायला जा. त्याप्रमाणे ती काम करू लागली आणि कामाबद्दल नंदनशी बोलू लागली. तिने त्याला दिवसाचे काम कसे केले ते सविस्तर सांगितले. मुकादम बद्दलही सांगितले. तेव्हा नंदन तिला म्हणाला, "लई बेकार हाई तो, त्याच्यापासून सावध रहा."

असे दिवसामागून दिवस सरू लागले. तिच्या कामाने तिने नंदनसारखच लोकांना प्रभावित केले. नंदन ची बायको शोभतेय असं लोक म्हणू लागले. यशोदा चार बुकं शिकली होती. तिला लिहिता वाचता येत होतं. मुकादम बाकीच्या बायकांना फसवतो हे तिला कळत होतं. काही जणींच्या कागदावर वेगळं लिहितो आणि हातात वेगळं देतो हे तिच्या लक्षात आलं होतं. पण निशा ने सांगितले म्हणून ती गप्प राहिली. एकदा मोठे साहेब आले होते पैसे वाटत असताना, तेव्हा मुकादम जाम चपापला होता व यशोदा ने ते नीट निरखले होते. साहेब जुजबी बोलले व लगेच गेले होते. कागदांची अदलाबदल केलेली यशोदाने बरोबर टिपले होती. " मेला लोकांच्या जीवावर दिवाली करतोया" असा मनात विचार येऊन तिचा जळफळाट झाला होता.

इथं घरी पण सगळं नीट चाललं होतं. नंदन स्वतः करता येतील तितकी कामं करून आजीला व यशोदाला मदत करत होता. यशोदा पण त्याच्यावर खुश होती. कधी कधी कामं उलटी सुलटी व्हायची, पण यशोदा त्याला समजून घायची. "दोन्ही पाय नसून बी किती काम करतोया बायावानी" असं ती आपल्या मैत्रिणींना सांगायची.

एक दिवस मुकादम ने यशोदाला कामानंतर थांबायला सांगितलं. तिच्या बरोबर निशा पण थांबली होती. थोड्या वेळाने 'साहेब आले नाहीत म्हणून तुम्ही घरी जा' असं त्यांना सांगितलं. एवढा वेळ फुकट गेल्याने दोघांची चिडचिड झाली होती. घरी येऊन पाहते तर सगळा गोंधळ झालेला. दुधाचे भरलेले पातेले, सावरता न आल्याने, सगळे दूध जमिनीवर सांडले होते. आत्ताच चालू लागलेला कृष्णा त्यात पाय घसरून पडला होता व त्याच्या कपाळाला भली मोठी खोक पडली होती. आजीने त्याच्या डोक्याला पट्टी बांधली होती. हे सगळं बघून यशोदाचा पारा चढला. तिने पोराला छातीशी घट्ट कवटाळले व नंदनला वाईट साईट बोलू लागली. "आजी हाय ना, कशा पाई काम करायचं. किती रगत सांडलं माझ्या पोराचं! दूध बी नाई मिलालं त्यास प्यायला तुमच्या पाई." बराच वेळ ती बडबडत राहिली. ती कृष्णाचेच पाहत होती. सगळ्यांसमोर तिने नंदनचा पाणउतारा केला होता. तो गप्पच राहिला. दूध सांडलेली जागा नंदननेच साफ करून ठेवली. तिला एकही शब्द न बोलता तो गुमान अश्रू पित राहिला. आतल्या आत कुढत राहिला. आपल्या नशिबाला दोष देत राहिला.

रात्रीची जेवणे आटोपली. तिची आवरा आवर होई पर्यंत कृष्णा नंदनच्या कुशीत झोपला होता. बरेच रक्त वाहून गेल्याने त्याचा चेहरा वेगळाच दिसत होता. त्याच्या गालाची पापी घ्यायला गेली तेव्हा तिचे लक्ष नंदनकडे गेले. तोही झोपी गेला होता. त्याचेही डोळे रडून सुजले होते. कृष्णाचे पांघरून नीट करत असताना तिचे लक्ष नंदाच्या हाताकडे गेले. नंदनची बोटे बरीच भाजली होती. त्यावर पाण्याचे फोड आले होते. तिला चर्र झाले. तिने त्याचा दुसरा हात बघितला तर तो ह्यापेक्षा जास्त भाजला होता. "अरेरे! किती वाईट केलं म्या. किती बोलले मी ह्याला, पण हा जरा बी मला काही बोलला नाई. याला पण किती लागलंया, ते बी नाई सांगितलं ह्याने. कृष्णावानी हा बी रडून झोपलाय. दोन्ही निरागस माझी लेकरं." तिला राहवलं नाही. जशी कृष्णाची पापी घेतली तशीच नंदनची पण तिने घेतली. ह्या तिच्या प्रेमात ती एक पत्नी नसून तिच्यात आईची माया भरली होती. "लहान कृष्णा बोलता येत नाही म्हणून बोलला नाही, तर हे माझं दुसरं लेकरू, एवढं सगळं सहन करून छोट्या लेकरावानी गुमान राहिलं." तिला रडू आवरले नाही. तिच्या डोळ्यातले अश्रू नंदनच्या चेहऱ्यावर पडू लागले. त्याला जाग आली. त्याने विचारले, "कशापायी रडतेया." तिला रडू आवरले नाही. एखाद्या लहान मुला सारखा तिने त्याचा चेहरा हातात धरला व त्याच्या चेहऱ्यावर चुंबनाचा वर्षाव करू लागली. यशोदेतली माता जागृत झाली होती. नंदन ने तिला सावरले. "अग, काय नाई, जरासं लागलंय. तू झोप आता." यशोदा उठली. औषध आणून तिने त्याच्या हाताच्या बोटांना लावले व बोलली, "धनी, पुन्हा नाही चूकी करायचे म्या. लई वाईट झालंय. लई तरास दिला मी आज. समदं त्या मुकादमा पाई झालया. माझ्या देवावानी धन्याला खूप दुखावलं मी आज". असं म्हणून ती त्याला लहान मुलासारखे थोपटू लागली. पण मनात निश्चय केला, ह्या मुकादमाला धडा शिकवायचाच.

रोजच्या प्रमाणेच कंपनीत काम चालू होते. अचानक तेथे मुकादम आला व निशाला म्हणाला, "साहेबांनी तुला ते दुसरं काम करायला सांगितलंय. आजपासून तुझं काम तू दुसऱ्या मशीनवर करायचं." निशाही खूप आनंदित झाली. नवे काम मिळाल्याने तिचा उत्साह वाढला. नंतर तो यशोदा पाशी आला व बोलला, "खरं म्हणजे हे काम तुलाच द्यायला हवं होतं. साहेबांनी तसं सांगितलं ही होतं, पण तू माझं काही ऐकत नाही, मग नाईलाजाने मी ते काम निशाला दिलं. आता तुझी व निशाची कामाची वेळ वेगळी असेल. तिला पगारही जास्त असेल. आता तिला दिवसाचा पगार नसून महिन्याचा असेल." यशोदा यावर काही बोलली नाही, मुकाट आपलं काम करत राहिली. नंदनला पण तिने काही सांगितले नाही. पण मनातून तिचा जळफळाट होत होता.

आता निशा पण मुकादमासमोर हांजी हांजी करत होती. तिची वागणूक पण बदलली होती. आता ती मुकादमाच्या मर्जीतली होती. तिला वेळेचे पण बंधन नव्हते. एवढ्या सगळ्या परिवर्तनाचे यशोदाला नवल वाटले. हळू हळू बाकीच्या बायकांकडून तिला कळले की मुकादमाच्या मर्जीतल्या बायकांना अशीच सवलत मिळते,

व त्या बायका काम व पैशांकरिता त्याच्या म्हणण्या प्रमाणे वागतात. आता ह्या मुकादमला अद्दल घडवायची असे तिने मनाशी ठाम ठरवले.

एक दिवस साहेब नंदनच्या घरावरून जात होते. नंदनचे घर येताच त्यांनी गाडी थांबवून त्याची विचारपूस करायचे ठरवले व ते घरात आले. नंदनला खूप आनंद झाला. तेवढ्यात यशोदा कामावरून आली. त्यांनी तिला कामाबद्दल विचारले. तेव्हा तिने ही दैनिक मजदुरीचे सांगितले. साहेब खूप रागावले. " अरे काय केले मुकादम ने! तुला मी वेगळं काम दिलं होतं. हे असलं काम तुझ्यासाठी नव्हतं". तेव्हा यशोदाने पण मुकादमचे सगळे प्रताप सांगितले. त्याची बायकांकडे बघायची नजर, त्यांना कामाचे सगळे पैसे न देणं, काही बायकांना कामातून सवलत देणं, सगळं. ह्या सगळ्या गोष्टी कळल्यामुळे साहेबांना मुकादमचा राग आला. त्याला काढून टाकायचा विचार त्यांच्या मनात आला. पण तो खूप जुना होता, व पुराव्या शिवाय कसा काढायचा असा त्यांना प्रश्न पडला. तेव्हा यशोदा म्हणाली, "म्या देती तुम्हांसनी पुरावा ह्या दोन दिसात." तिने त्यांना आपण काय करणार व त्या जाळ्यात त्याला कसं पकडायचा ते सांगितले. साहेबांनी पण तिला परवानगी दिली. आपल्या कंपनीला बदनाम करणाऱ्या मुकादमला ते सोडणार नव्हते.

साहेबानी आपली काही खास माणसें मुकादमवर नजर ठेवायला ठेवली. जेथे जेथे मुकादम बायकांच्या कामाकडे असे तेव्हा ही माणसे त्याला आपल्या नजर कैदेतच ठेवायची.

मुकादमला पण त्या लोकांची चुणचुण लागली होती. तो ही त्याच्या हालचालीवर लक्ष ठेऊन होता. यशोदाची मैत्रीण निशा हल्ली हिरमुसल्या सारखी दिसत होती. तरी यशोदेने तिच्या कडे लक्ष दिले नाही. तिचा व मुकादमचा सलोखा तिला आवडत नव्हता. पूर्वी तिने एक दोनदा तिला समजावले होते पण निशा आपल्या नवीन कामाच्या उर्मीतच होती. यशोदेला बाकीच्या बायकाकडून समजले की, मुकादम निशावर ओरडत असतो. तिचं व मुकादमच काही वावग झाल तर ते यशोदेला हवंच होतं. त्याची ती वाटच पहात होती व आज तिला ती संधी मिळाली.

रोज निशा उशीरा घरी निघायची पण ह्या दोन चार दिवसात ती बाकीच्या बायाकाबरोबरच निघत असे. यशोदेने तिला सरळच विचारले ,"काय निशे ह्या दिसांला घरा जायची घाई करतय? मुकादमच काम नसतं काय? निशा नुसती चूप राहिली काही बोलली नाही. तिचे डोळे पाण्याने भरले. यशोदेने तिच्या खाद्यांवर हात ठेवला व तिला दिलासा देत ती बोलली,"तू कशा पाई रडतेया? काय झालयं?

निशाला राहवलं नाही ती रडत रडत सांगायला लागली, "यशोदे,चुकलं माझं म्या तुझं एकलं नाही. म्या नोकरी व पैश्याच्या जाळ्यांत फसले. मुकादम लई वाईट हाय. म्या तेच्याकडून पैसे घेतले होते. सावकास परत कर नाही केले तरी चालेल बोलला व्हता पन आता तो तगादा लावतोया. पैसे दे आठ दिसात नाही तर तेची इच्छा पुरी कर म्हनतोया." असे सांगून ती मोठ्याने रडायला लागली. यशोदेने तिला शांत केले व विचारले, "काय इच्छ पुरी कराया हवी हाय त्याची" "हलकट मेला लई वंगाळ हाय साला तेच्या मुडदाच पाडतेयां आता."

यशोदेला कळून चुकले. ती संधीची वाटच पाहत होती व निशामुळे तिला ती आयती साधून आली होती. तिच्या डोक्यात नामी कल्पना आली व ती लगेच अमलात आणायचे तिने ठरवले. तिने निशाला सांगितले," निशे म्या आय तुझ्या पाठीशी तेशनी सांग पैसे नाय परवडत द्यायला पन इच्छा पुरी करतयं' निशा ओरडली "अरे यशोदे काय बोलतया तू" "म्या सांगतयं तसंच करायचे आय निशे. उद्या कारखाना सुटल्यावर येते सांग. चल तेसनी सांगून ये". असे म्हणून तिने निशाला आत पाठवले व सगळ्यां बायाना एकत्र करून तिने कुजबुज केली. बाकीच्या बायांनी पण तिच्या हां ला हां मिळवली. व निशा आल्यावर सगळी आप आपल्या घरी परतली. निशा एकसारखी यशोदेला विचारत होती."काय करनार हाय तू  लई घाबराया होतया" " निशे गुमान घरला जायचे काय भी इचारायच नाय."असे बोलून यशोदा घरी जायला भरभर निघाली.

दुसऱ्या दिवशी रोजच्या प्रमाणे कामाला सुरुवात झाली. जेवायच्या वेळेला यशोदेने सगळ्यां बायांना कसे काय करायचे ते सांगितले. तेव्हां निशाचा जीव ही भांड्यात पडला रात्रभर झोप उडाली होती तिची. तिला यशोदेचा खूप अभिमान वाटला व तसं तिने बोलून पण दाखवलं. जेवणे आटोपल्यावर परत सगळी आप आपल्या कामाला भी लागली.

बरोबर साडे पांच वाजता काम संपले. मुकादमने घाई घाईने सर्वांचे पैसे चुकते केले व सगळा गाशा गुंडाळुन तो लगबगीने आत गेला.

थोड्या वेळांने निशा भी वरून आली. तिच्या चेहऱ्यावर भितीचे सावट होते.पण यशोदा व बायांकडे पाहुन तिने धीर धरला. ती दबत दबत मुकादमच्या खोलीकडे गेली. तिला पाहिल्या बरोबर मुकादम जाम खुष झाला व बोलला, "आलीस ना शेवटी? किती भाव खात होतीस. आता नाही सोडणार तुला" असे म्हणेन तो तिच्याकडे झेपावला. ती थोडी बाजूला सरकली. "काय नखरे करतेया असं म्हणून त्यांने तिच्या पदराला हात घातला व तिला जवळ ओढली ,एवढ्यात यशोदा व साऱ्या बायका आत घुसल्या. मुकादमला फरफरटत बाहेर खेचून घेऊन आल्या व एक एक त्याच्यावर अशा काही तुटून पडल्या की पळता भुई थोडी झाली मुकादमला. सगळ्यां बायांनी त्याला असा झोडपला की त्याची हाडे खिळखिळी झाली. प्रत्येक जण आपल्यावर झालेल्या अन्यायाची भरपाई करत होती व तोंडाला येईल तशा शिव्या ही हासडत होत्या.

साहेबांची माणसें व बाकीचे साऱे कामगार सुध्दा ते दृष्य पाहुन अंचबिंत झाले. नारी एक स्त्री अबला की,चंडिका, दूर्गा,काली ,महिशाशूर मंद्रिनी त्या पंधरा बायकांचे रोद्र रूप पाहुन ते सारे अव्वाक झाले होते. सगळ्यां बायका हात धुऊन घेत होत्या.मुकादम अर्धमेला झाला होता.

एवढा वेळ यशोदा बाजूला उभी राहून ते सारे दृष्य पाहत होती. मुकादम रक्त बंबाळ झाला होता.तिने बायकांना थांबवले व जवळ पडलेली लोखंडी सळी उचलली व मुकादमच्या दोन्ही पायांवर एवढ्या जोराने मारली की, त्याचे दोन्ही पाय निकामी केले सळी फेकली व सुटकेचा, समाधानाचा एक सुस्कार सोडला व निशाला घेऊन "चला गो बायांनो " असे म्हणून मुकादमकडे पाठ केली.

आज सगळ्यां बायकांच्या चेहऱ्यावर बदला घेतल्याचे समाधान झळकत होते. साहेब आपल्या गाडीत बसून हे दृष्य पाहत होते. त्यांनी यशोदेला शाबासकी दिली. मुकादमला दवाखान्यात भरती केले त्याला कामावरून ही कमी केले."नारी शक्ती जिंदाबाद.चे नारे सगळे मोठ मोठ्याने गाऊ लागले.

                 


Rate this content
Log in