वृद्धाश्रम
वृद्धाश्रम
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
आज सदाकाका खूप खुष होते. त्यांचे मित्र एका असूयेने त्यांच्याकडे पहात होते. पण तेही खूष होते. त्यांची का होईना इथून सुटका होत होती. त्यांनी पटपट कपडे बॅगेत भरले. अन् दरवाजाकडे डोळे लावून बसले. त्यांची त्यांना कधी तंद्री लागली समजलेच नाही. नकळत ते दोन वर्षे मागे गेले. दोन वर्षांपूर्वी त्यांचा मुलगा व सून त्यांना इथे सोडून गेले होते. त्यांच्या मिसेस जाऊन जेमतेम पंधरा दिवस झाले होते. मुलगा सून दोघेही नोकरीला. दोन मुले ती आता मोठी झाली, म्हणजे शाळा पूर्ण वेळ झाली. त्यांना पहायची गरज नाही. कारण सुनेची वेळ अन् मुलांच्या घरी यायची वेळ चांगली जमत होती. घरात जास्तीच्या माणसाची गरज नव्हती. आजी शेवटपर्यत चालती बोलती होती. तिची वरकड मदत होत असे. अचानक काळ तिला घेऊन जाईल असे कोणालाच वाटले नाही. तिला स्वतःलाही तसे वाटले नव्हते. ती गेली अन् घरातील हिशोब बदलले. तुटपुंजी पेन्शन असणार्या सदाकाकांना जेवण करून घालण्यास ग्लासभर पाणीही देण्यास कुणाला वेळ नव्हता. अगदी त्यांच्याच रक्तामासाच्या मुलालाही.
मग काय त्यांना जीव नकोसा करायचा सूनबाईंनी विडा उचलला. पत्नीच्या विरहाच्या जखमेवर खपली धरण्याआधीच त्याच्यावर वृद्धाश्रमाचे ओरखडे ओढले गेले. असहाय्य बिचारे काय करणार. ज्या बाळाला हाताला धरून लाडे लाडे मोठे केले, बचत न करता हवा तसा त्याच्यावर पैसा उधळला. आज तोच बाप त्याला डोईजड झाला. त्याला हात धरून चालायला लावण्याऐवजी दुसऱ्यावर सोपवून मोकळा झाला. सुरुवातीला थोडे दिवस फोन केले. मग तेही महाग झाले. कान डोळे लेकाच्या हाकेसाठी तरसू लागले.
त्या दिवशी काय झाले. सदाकाकांना चैन पडेना. लेकाच्या आठवणींनी व्याकूळ झाले.
वृद्धाश्रमांच्या लोकांची नजर चुकवून बाहेर पडले. घराच्या दिशेने निघाले. निघताना मन चुकचुकत होते. शाळेला दांडी मारुन पळाल्यासारखी अपराधी भावना मनात उचंबळून येत होती. शालेय जीवनात जे जमले नाही. ते म्हातारवयात करत होते. मुलांच्या प्रेमापोठी माणूस काय काय करत नाही. ते गपचूप बाहेर पडले. थोडे पुढे चालले असता एक लहान मुलाला गाडीने धडक दिली असती तितक्यात सदाकाकांचे लक्ष तेथे गेले. वय विसरून ते धावले अन् मुलाला वाचवले. सगळे गोळा झाले. गर्दीत त्या मुलाला ओळखणारा एक इसम होता. आजोबानी कसे वाचवले ते त्याने पाहिले होते. आता खरंतर आजोबाही भितीने थरथरत होते. तो इसम दोघांनाही घेऊन मुलाच्या घरी गेला. ते बाळ त्याच्या पालकांना पाळणाघरात ठेवावे लागत असे. किती पाळणाघरे बदलली पण ते बाळ कुठेच रमत नव्हते. असेच पळायचे. त्याच्या आईला नोकरी सोडण्याची लक्षणे दिसू लागली होती. तितक्यात हा प्रसंग घडला.
बाळाच्या आईपप्पांनी सदा काकांना त्यांची माहिती विचारली. सदाकाकांनी सगळं खरं ते सांगितले. त्यांना खरंच वाटेना. उलटपक्षी त्यांना मुलावर चांगले संस्कार होण्यासाठी घरी आजी आजोबा हवेच होते. त्यांनी सदाकाकांना त्यांच्या मुलाचे आजोबा व्हाल का विचारले. ज्यांना आपले प्रेम नको त्यांच्यामागे धावण्यापेक्षा ज्यांना प्रेम हवे त्यांच्याजवळच का राहू नये. खूप विचार करून त्यांनी होकार दिला. मुलाला कळवले. मुलगा खूप चिडला. त्यांनी त्याला भीक घातली नाही.
आज सकाळपासून ते नव्या नात्याची वाट पहात होते. जणू एका नवपर्वाची ते सुरुवात करत होते