Jyoti gosavi

Others

5.0  

Jyoti gosavi

Others

ते गतवैभव

ते गतवैभव

3 mins
650


आठवणी असतात, वारूळतल्या मुंग्यां सारख्या, एक बाहेर पडली त्यापाठोपाठ असंख्य बाहेर पडतात. आठवणी असतात मधमाशाच्या पोळ्या सारख्या, एखादा दगड पडायचा अवकाश सगळ्या चवताळून बाहेर येतात.

आठवणी असतात एखाद्या काळ्याशार गुढ डोहा सारख्या,वर वाटायला सारं शांत एखादा दगड कुठे आत पडला की सार ढवळून वर येतं . आठवणी या अशा असतात की त्या विसरता येत नाहीत आणि कोणाला देता येत नाहीत. स्वतःच्या वेदने सारख्या स्वतःलाच भोगायला लागतात. आठवणी असतात अनेक प्रकारच्या चांगल्या-वाईट कडू-गोड जेव्हा मनाचा मोर आनंदी असतो तेव्हा तो आठवणींचा पिसारा लावून थुई थुई नाचतो. तसाच माझ्या लहानपणातल्या आठवणी आज माझ्या भोवती फेर धरून नाचत आहेत आता मी वयाची पन्नाशी ओलांडली आहे ,परंतु माणसाला आपलं बालपण आणि स्त्रीला आपले माहेर कधीच विसरता येत नाही.


वैभव काही फक्त पैशातच मोजता येते असे नाही .ते कधी मनाच्या श्रीमंतीत असते. ते कधी संस्कारात असते. ते कधी आपल्या सुंदर सुंदर आठवणीत असते.

सातारा जिल्ह्यातील एक छोटेसे खेडेगावात माझा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला. माझे आई-वडील पैशाने अत्यंत गरीब कशीतरी दोन वेळा हातातोंडाची गाठ पडायची. त्यासाठी त्यांनी अपरिमित कष्ट केले .ते शिलाई मशीन चालवत, भिक्षुकी करत, शेती करत, कुटुंबाचे पोट भरण्याकरता मैलोन् मैल पायपीट करून ते परगावी देखील जाऊन पूजा सांगत.

घरी पांडुरंगाचे देऊळ पूजेला होते .त्यांची पांडुरंगावर आढळ श्रद्धा ,कोजागरी पौर्णिमेपासून कार्तिक स्नानाचा नित्यनेम कडाक्याच्या थंडीत देखील पहाटे उठून विहिरीवरून पाणी आणणे, आंघोळी करणे आणणे मग संपूर्ण कुटुंब आम्ही देवळात  विठ्ठलाच्या पायाशी. काकड आरती चा सोहळा त्याच्या भक्तीत आम्ही सर्वजण रमून जायचो अगदी वयाच्या दहा-बारा वर्षापासून हे आम्हाला बाळकडू मिळालेले होते .हळूहळू इतर भाविकही जमू लागले, बघताबघता वीस पंचवीस लोक पहाटेच्या काकडा ला येऊ लागले 

त्या मोठ्या सुखद आठवणी डोळ्यासमोर जशाच्या तशा उभ्या राहतात. विठ्ठलाची ती काळीभोर पाषाणाची मूर्ती, त्याला दह्या दुधाने अंघोळ घालताना खूप सुंदर दिसायची .त्याच्या मुख्य प्रक्षाळण्यापासून ते अंघोळ, जेवण, रांगोळी, पोशाख, विडा, दृष्ट, निरोप अशी भक्तिरसात ओतप्रोत भरलेली गाणी आम्ही मन लावून म्हणायचो आता फक्त आठवणी उरल्यात. आमच्या सार्‍या कुटुंबाचा तोच एक आधार .सुखदुःख आनंद साऱ्याच भावना त्याच्या पायी वाहिलेल्या.

 माझे आई-वडील सुखात उतले नाहीत, दुःखात गुंतले नाहीत. माझी आई म्हणजे तुकारामांची जिजाऊ, पतीच्या सुखदुःखाची खऱ्या अर्थाने अर्धांगिनी.

 माझ्या वडिलांना 30 जून 1997 साली पॅरालीसीसचा अटॅक आला त्यात ते बिछान्याला खेळले पुढे सात वर्षे माझ्या आईने त्यांची मनोभावे सेवा केली. त्यांच्या निधनानंतर एक वर्षाने ती पण पाठोपाठ गेली त्यांच्या जाण्याने काही क्षण तरी करंजखोप च्या देवळातील विठ्ठलाच्या पायाखालची वीट नक्कीच हलली असेल. खऱ्या अर्थाने आम्ही पोरके झालो .विठोबा मात्र आमचा आधार त्याने तेही दिवस पाहिले आज हेही दिवस पाहतो आहे. आज कोणी भक्त पहाटेचा काकडा ला येतो किंवा नाही ते माहीत नाही पण दरवेळी कोजागिरी पौर्णिमा आली की आपोआप तोंडातून काकड्याची गाणी बाहेर पडतात आणि त्या दिवसाची आठवण येते मला वाटतं कधी कधी कालचक्र वीस-पंचवीस वर्षे मागे फिरवावं .पुन्हा माझे आई-वडील जुनी सारी तीच माणसे जीआता काळाच्या पडद्याआड गेली असतील सर्वांनी विठोबा पुढे जमावं मोठ्या भक्तिभावाने तसाच काकडा त्याला करावा

विठोबा तू सर्वसाक्षी परमेश्वर ना रे? तुझ्या इच्छेने सारा सृष्टीचा कारभार चालतो.

"तुझिया श्वास पान हालते, हर्षे तुझिया फुलही फुलते,

तेज झळाळत गगनही डुलते 

रविचंद्रा चा तू निर्माता"

मग तुला काय रे अशक्य? "फिरव ना ते कालचक्र उलट ,जास्त नाही अगदी एखाद्या तासासाठी, "भेटव माझे आई-वडील मला आणि अनुभवू दे पुन्हा एकदा ते गतवैभव! तुझ्या भक्ती  सकट.


Rate this content
Log in