शिर्षक : हिऱ्याची ओळख
शिर्षक : हिऱ्याची ओळख
नमस्कार बाल मित्रांनो कसे आहात आपण , दिवाळीच्या सुटीत मजा केली की नाही. नक्कीच केली असणार बरोबर न अच्छा तर मग आज मी तुमच्यासाठी एक छोटी आणि मनोरंजक गोष्ट घेऊन आले आहे. आवडते न तुम्हाला गोष्ट वाचायला, तर मग सुरवात करूया आपल्या गोष्टीला.
चंपकलाल नावाचा सभ्य आणि नेहमी दुसऱ्याच्या मदतीस धावून येणारा एक सोनार होता. एक दिवस त्याला अचानक सुचलं की आपण गावोगावी फिरून लोकांना काही प्रश्न विचारावे आणि जो त्याच्या प्रश्नाचे खरं उत्तर देईल त्याला तो बक्षीस ही देईल. त्याने सुरवातीला दोन हिरे सोबत घेतले.त्यातला एक हिरा असली होता आणि दुसरा नकली होता. ते दोन हिरे घेऊन चंपकलाल गावोगावी फिरत होता आणि गावकऱ्यांना गोळा करून त्यांच्या समोर हिरे ठेवत होता. त्या दोन हिऱ्यापैकी कोणता हिरा असली आहे नी कोणता हिरा नकली आहे ते विचारत होता. जो ओळखेल त्याला तोच हिरा बक्षीस देण्यात येईल असे त्याने सांगितले. मग काय प्रत्येकाला वाटत होते आपल्याला तो असली हिरा मिळायला पाहिजे म्हणून सगळे प्रयत्न करायला तयार होते. पण यामध्ये मोठ मोठे लोक निष्कर्ष लाऊ शकले नाहीत. तर सामान्यांना हिरे कधी पाहायला भेटलेच नव्हते म्हणून त्यांनी प्रयत्न न करताच हार मानली. चंपकलाल विचारात पडला कोणीही नकली आणि असली यामधला फरक ओळखू नाही शकत.पण फायदा ही त्याचाच होता न सगळे हारत होते आणि त्याचा हिरा ही त्याच्याजवळ राहत होता.
फिरत फिरत एक दिवस तो निलंगा या गावी पोहचला. हे गाव सुंदर आणि स्वछताप्रिय गाव होते. या गावात ही काही मंडळी थंडीच्या दिवसात बाहेर उन्हात बसलेली होती. मग काय आपले सोनार बुआ ही बसले त्यांच्या सोबत गप्पा मारत. गप्पा मारता मारता त्याने आपल्या गाठोडीतून दोन्ही हिरे काढले आणि सर्वांसमोर उन्हात ठेवले. आणि त्यांना असली हिरा कोणता विचारले. लोक त्या दोन्ही हिऱ्याला सारखे पाहत होते. ते दोन्ही हिरे दिसायला सारखेच होते. अगदी वर पासून खालच्या टोकापर्यंत सारखे दिसत होते यापैकी असली कोणता हे ओळखणे कठीण होते. बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले पण त्यांना नाही सांगता आले. त्यापैकी एका म्हाताऱ्या आजोबांचं आवाज आला त्यांनीही प्रयत्न करायचं ठरवलं. जस "कोळशाच्या खाणीत हिरा सापडतो न तसेच त्या गर्दीतून आजोबा बाहेर आल्यासारखे वाटत होते. "लोक त्यांना हसू लागले ज्यांना डोळ्यांनी रस्ता बरोबर दिसत नाही ते आजोबा हिरा ओळखणार म्हणून चिडवू लागले. पण कोणत्याही कामाकरीता प्रयत्न करून पाहिला तरच आपण यशस्वी होऊ शकतो किंवा हरलो तर अनुभव नक्कीच मिळतो,बरोबर न बाल मित्रांनो.
आजोबा जवळ असलेली व्यक्तीच्या मदतीने समोर आले आणि त्यांनी दोन्ही हिरे हाच्या स्पर्शाने निरीक्षण करायला सुरवात केली. आणि सगळ्यांना आचर्य वाटले कारण आजोबाने असली हिरा कोणता आहे ते सांगितले. म्हणून कधीही कोणाला कमी समजू नये आणि कोणाचीही टिंगल घेऊ नये. सगळे लोक मग आजोबांना विचारू लागले की त्यांनी एवढ्या पटकन कसे ओळखले यातल्या असली हिरा कोणता आहे ते. आजोबा म्हणाले एकदम सोपे आहे आपण सगळे उन्हात बसलेलो आहोत. हिरेही उन्हात आहेत. उन्हामुळे दोन्ही हिरे गरम व्हायला पाहिजे होते पण हिरा हा गरम होत नाही. गरम होतो तो काच यातला जो गरम झाला नाही तो असली हिरा आहे हे मला समजले आहे म्हणून मी सांगू शकलो यातला हिरा कोणता ते.
तात्पर्य. :
जसा खरा हिरा उन्हात गरम होत नाही त्याचे अस्तित्व तो थंड राहण्याचे कायम ठेवतो.त्याचप्रमाणे जीवनात कीतीही वाईट प्रसंग आले किंवा अडचणी आल्यात खचून न जाता आपले कर्तव्य आणि आपला चांगुलपणा टीकुन ठेवावा.
चंपकलाल यांनी तो हिरा आजोबांना बक्षीस म्हणून दिला आणि त्यांचे अभिनंदन केले. आपली कथा मित्रांनो इथे संपली कशी वाटली बालमित्रांनो तुम्हाला ही कथा आणि यामधून तुम्हाला काय समजले ते नक्की सांगा मला.
