शहरीकरण आणि जंगली प्राणी
शहरीकरण आणि जंगली प्राणी
सध्या आपण रोजच ऐकत आहोत किंवा वर्तमानपत्रात वाचत आहोत त्या म्हणजे या शहरात जंगली प्राणी घुसून पाळीव प्राणी आणि माणसांवर हल्ले करत आहेत, शेतीवाडीचे नुकसान करत आहेत. लोकांना घराबाहेर फिरणे मुश्किल झाले आहे. याला जबाबदार कोण???
तसे पाहिले तर याला जबाबदार आपण सर्व आहोत कारण वाढत चाललेले शहरीकरण. डोंगर पोखरून, जंगले कापून मोठे मोठे अपार्टमेंट बांधणे. लोकांना शहर सोडून निवांत जागी रहायला जायची खूप हौस आहे त्यामुळे आपण आपली मर्यादा सोडून इतर ठिकाणी हौस पुरवण्यासाठी जात आहोत. हीच हौस पुरवण्यासाठी आपण मानवी वस्त्यांमध्ये न जाता निसर्गाच्या सान्निध्यात जायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरालगत असलेले डोंगर पोखरून, झाडे तोडून, जंगल जाळून आपण तेथे रहायला सुरुवात केली आहे. आपण आपल्या हौसेसाठी, मजा करण्यासाठी आपली मर्यादा ओलांडून दुसऱ्या जीवांना त्रास देत आहोत.
आत्ता आपणच बघा उदा. आपण काही वर्षे पाठीमागे गेलो आणि शहरे पहिली तर ती एका विशिष्ट ठिकाणापर्यंत वाढली होती पण सध्याची परिस्थिती पहिली तर अपार्टमेंट कुठे तर डोंगरावर, जंगलामध्ये किंवा कुठे झाडे तोडून बांधलेली दिसतात. मग आपणच विचार करू या की मग हे प्राणी कुठे बरं जातील? प्राणी शहरामध्ये येत नाहीत उलट आपण माणसे त्या बिचाऱ्या प्राण्यांची घरे उध्वस्त करून त्यांच्या भागावर अतिक्रमण करत आहोत.
मग ते बिचारे कुठे बरं जातील? त्यांना आपल्यासारखे दुसरे तिसरे अपार्टमेंट नाही किंवा दुसरे कोणते शहर नाही. मग ते कुठे जातील त्याना दुसरा कोणता पर्याय उरला नाही म्हणून ते त्यांच्या जुन्या जागेवर, जुन्या घरी म्हणजेच शहरामध्ये येत आहेत. यामध्ये त्यांची काही चूक नाही ते त्याच्या सवयीनुसार वागत आहेत आपणच त्यांच्या जीवनात अडथळे निर्माण करत आहोत.
सध्याची परिस्थिती लक्षात घेता कोरोनामुळे पूर्ण जगात संचारबंदी झाली. शहरे ओस पडली, दळणवळण साधने बंद झाली. त्यामुळे शहरात एकदम शांतता प्रस्थापित झाली आणि पुन्हा एकदा याच जंगली प्राण्यांची बळकावली गेलेली घरे त्यांना साद घालू लागली. हीच शहरातील शांतता पाहून त्यांनी शहराकडे कूच केली. त्यांनी शहरे ही आपलीच आहेत समजून तसा वावर सुरूच ठेवला. जशी संचारबंदी उठली तसे हे प्राणी त्यांच्या सवयीनुसार शहरामध्ये येऊ लागले. तेवढ्यात तेथे त्यांना माणसांचाही वावर दिसू लागला. मग त्यांनाही समजलं नाही की माणसे जंगलात आहेत की जंगली प्राणी शहरात येत आहेत. त्यामुळॆ प्राण्यांचे हल्ले सध्या जादा दिसत आहेत.
सध्या पुणे आणि कोल्हापूर शहरामध्ये गवे आले, महाराष्ट्राच्या कित्येक शहरांमध्ये बिबट्याचे हल्ले दिसत आहेत, गुजरातच्या गीर प्रांतात सिंह दिवसात आहेत. हरणे, काळवीट यासारखे प्राणी शहरात दिसत आहेत. एक कळकळीची विनंती... यांना मारू नाका किंवा ईजा होईल असे त्यांच्यासोबत वागू नका. ते आपल्या शहरात आले नाहीत आपण त्यांच्या शहरात आलो आहोत.
