शाळेतील आठवण
शाळेतील आठवण


माझ्या शाळेतील आठवण आजही माझ्या मनात रेंगाळत असतात. माझे गाव तालुक्याच्या ठिकाणी असून बरीच भरगच्च वसाहत होती. आमची शाळा प्रशस्त होती. माझ्या मैत्रीनिंची, माझ्या शाळेची मला प्रत्येक क्षण आठवण येत असते. त्या शाळेच्या प्रांगणावर आमचे विशेष प्रेम होते. आमचे गुरूजी खूप छान होते. आणि कड़क पण तेवढेच होते. शाळेला कधी उशिर झाला असता वेगवेगळ्या शिक्षा व्हायच्या .
शाळा जरा लांब होती शाळेतून आम्ही धावत पळत नागमोडी वाटेवरून पायीच जात होतो, मधेच एक खूप भलेमोठे चिंचेचे झाड होतं. तिथून जाताना आम्हाला थोडी भिती वाटायची. कुणीतरी जुन्या लोकांच्या किवदंती कथा ऐकून एक दूसऱ्याला भूता प्रेताच्या गोष्ट सांगितल्या होत्या. मुलांनी आपसात चर्चा करून ती बातमी पसरवली होती . तेव्हा या चिंचेच्या झाडावर भूत प्रेत असतात म्हणुन सर्वांना माहित झाले.त्यामुळे तिथून जाताना आम्हाला थोडं दचकल्यासारखं व्हायचं. मी जेव्हा घरी येऊन आईला ही गोष्ट सांगितली तेव्हा आमची आई म्हणायची भूत-प्रेत काही नसतं ती सर्व आपल्या मनाची खेळ असतात त्याला आपण घाबरायचं नाही. तेव्हापासून आम्ही अजिबात कोणत्याच गोष्टीला घाबरत नव्हतो.
आमची शाळा खूप छान होती तिथे प्रशस्त ग्राउंड होते. खेळाचे मैदान होते मी पण व्हालीबॉल, लंगडी ,लगोरी, खोखो इत्यादी खेळ खेळत असायचो आम्ही सर्वच खेळात प्राविण्य मिळवले होते. तो काळ विसरता विसरत नाही आमच्या मित्र मैत्रिणी भेटले की शाळेच्या जुन्या आठवणी हमखास काढत असतात. ते बालपण मनावर कोरुन ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा आढावा घेत असते. किती मस्ती किती किती भांडण आम्ही मैत्रिणीने केले असतील.कधी कट्टी घ्यायची तर कधी दो करायची. हा क्रम आमचा दैनंदिनीचा होता.असा काळ आता कुठे उरला. आता फक्त आठवणी करायच्या.
आपल्या घराची, गावाची जिथे मी लहानाची मोठी झाली, माझ्या जीवलग मैत्रीनिंची, माझ्या शाळेची, मला प्रत्येक वस्तूची आठवण क्षणो क्षणी येतेय. कुंडीमधल्या गुलाबाची सुरेख झाडांची, किती हौसीने मी ती रोज पाणी घालून ,खत देवून जगवली होती, मी सासरी येतांना बघितले होते वळून साऱ्यांच्या डोळ्यात पाणी होते आणि गुलाबाने आपली मान खाली टाकली होती. जणू मला मोठ मन करून उदास होवून निरोप देतो आहे.
भारतीय संस्कृतीची आमच्या मनावर एक वेगळीच छाप होती. कारण या संस्कृतीने आम्हाला खुप काही दिलेले आहे. आजही एकतेमध्ये गुंफुन ठेवलेले आहे. या देशात विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. प्रत्येक जातीचे, धर्माचे एक वेगळेपण या पारदर्शकता दिसून येते. अनेक प्रकारचे खान, पान वैभव व वेशभूषा, परंपरा आणि बोली भाषा या गोष्टीचे प्रामुख्याने प्रदर्शन लक्षात येत असते. अप्रतिम नैसर्गीक वातावरण तेव्हा आमच्या भावना जुळून होत्या.
मला आजही आठवतो तो काळ,लहानपणी भांडन वगैरे झाले असता कसे रूसून बसायचो आणि सर्व घरची बाहेरची लोके खुप मस्का लावायचे. मला आठवतंय, जेव्हा कधी मी लहानपणी खेळतांना पडली तर, खूप गळा ताणून रडायला लागायची. किंवा कोणत्यातरी वस्तूमुळे जखंम होताच, आकडा तांडव करायची. आई-बाबा मला जवळ घ्यायचे आणि कोणत्यातरी दिशेला बोट दाखवुन माझ लक्ष इकडे-तिकडे कुठेतरी केंद्रित करायचे. म्हणायचे काही झाल नाही, आणि आपणही त्या नसलेल्या वस्तूकडे किंवा त्या आभासी वृत्ताकडे बघत आपल दु:ख विसरुन जायचो आणि पुन्हा खेळायला, हसायला लागायचो. ज्या वस्तूमुळे लागलं त्या वस्तूला आई-बाबा हळूच पाय आपटून मारायचे. आणि त्या जागेकडे वस्तूकडे डोळे वटारून रागवायचे आणि असं केल्यावर आपल्यालाही आनंद व्हायचा, वाटायचं की आपल्याला कोणी काही केलं तरी त्याला ओरडायला आपले आई-बाबा आहेत आणि आपण ती जखम, ते दुःख विसरून जायचो. अस आपल लहानपण आणि अशी आपली कृती असायची.
पण का कुणास ठाऊक जसे जसे मोठे होत गेलो तसं तसं आई-बाबांना या शब्दांची आवश्यकता वाटेनाशी झाली. त्यांनी ते शब्दही बोलणं बंद केलं, खरच ते प्रेम आणि त्यावर ठेवलेला विश्वास किति प्रगाढ होता. मिळतंय का पुन्हा जीवनात अस बालपण? आणि मिळतं का आई-बाबाच ते प्रेम, वात्सल्य, ममत्व आपल्याला किती पोरके झालो आपण या अलौकिक जगाला.
जसे मोठे झालो तसे आपण आपल्या जगात गुरफटलोय. शाळा कॉलेज, वेगवेगळ्या छंदात, स्पर्धेत, व्यवसायात आणि अशा अनेक गोष्टींमधें गुरफटत गेलो. कधी कधी आपण आपल्या छंदासाठी पण वेळ देवू शकत नाही. करियर घडवतांना अनेक व्यत्यय येतात. कधी शारीरिक, कधी मानसिक तर कधी ह्रदयातले मर्मबंध विसरू शकत नाही.
रोज नवीन आव्हाने समोर येऊ लागतात. कृत्रिम जगण व बनावटीपणा जीवनात आलेला आहे.कधीतरी वाटतं की आपण कशाला मोठे झालोय आणि त्या अनोख्या लहानपणीच्या दुनियेत पुन्हा जगायचे. त्या अदृश्य वलयात पुन्हा जाऊन रहायचे.